नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या, निकाल लागला आणि नवीन सरकारही स्थापन झाले. यंदाच्या निवडणुकीत भीषण उष्णतेची लाट पहायला मिळाली. देशातील अनेक भागांत तर पारा ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचला. या भीषण उष्णतेच्या लाटेत देशातील मतदान केंद्रावर आपले कर्तव्य बजावणार्‍या अनेक कर्मचार्‍यांनी आपला जीव गमावला. यात मिर्झापूरच्या पाच होमगार्डचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या ५० ते ५५ वर्षे वयोगटातील पाच होमगार्डचा ३० ते ३१ मेदरम्यान मृत्यू झाला. या काळात उष्णतेचा पारा ४६ अंशांपर्यंत जाऊन पोहोचला होता. त्यांच्या मृत्यूस एकूण व्यवस्था जबाबदार असल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे.

कडाक्याच्या उन्हातही मतदान केंद्रांवर कूलर नाही

१९ एप्रिल २०२४ रोजी सुरू झालेल्या सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीदरम्यान उष्णतेमुळे संपूर्ण भारतात सर्वाधिक होमगार्डच्या मृत्यूची नोंद मिर्झापूरमध्ये झाली. अनेकांनी भीषण उष्णतेची लाट असूनही मतदान केंद्रांवर कूलर न पुरवल्याबद्दल अनेकांनी जिल्हा प्रशासनाला दोष दिला. मिर्झापूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. एल. वर्मा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, मिर्झापूरच्या विंध्यवासिनी स्वायत्त राज्य वैद्यकीय महाविद्यालयाचे (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय म्हणूनही ओळखले जाते) प्राचार्य डॉ. राज बहादूर कमल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने उष्माघातच मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी गमावली १६.४ कोटींची अनामत रक्कम; सर्वाधिक रक्कम गमावणारे उमेदवार कोणत्या पक्षाचे?

डॉक्टर्सचा निष्काळजीपणा

३१ मे रोजी मिर्झापूर येथील एका प्राथमिक शाळेबाहेर २८ होमगार्ड असलेली बस थांबली. इतर सर्व जण वाहनातून खाली उतरले, तर बांदा येथील पुनाहूर गावातील श्याम सुंदर गर्ग बसमध्येच थांबले. काही क्षणांनंतर जेव्हा दोन होमगार्ड आत गेले, तेव्हा श्याम सुंदर थरथरत होते आणि त्यांचे संपूर्ण शरीर तापले होते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यांना जवळच्या एका रुग्णालयात नेण्यात आले, पण या रुग्णालयातील डॉक्टर्सने त्यांना वाराणसीतील रुग्णालयात नेण्यास सांगितले.

श्याम सुंदर यांना त्यांच्या बांदा येथील घरी पाठवण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबाला वाराणसीला ताबडतोब जाण्यास सांगितले. सुमारे २५० किमी दूर असलेल्या वाराणसीमध्ये उपचारादरम्यान रात्री ८.३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि त्यांची दोन किशोरवयीन मुले असा परिवार आहे. “त्यांचा मृत्यू आमच्यासाठी धक्कादायक होता. ते ३० वर्षे होमगार्ड होते आणि अनेक स्थानिक व राज्यांच्या निवडणुकांमध्ये सर्व हवामान परिस्थितीत कर्तव्य बजावत होते,” असे त्यांची पत्नी मनीषा देवी म्हणाल्या.

उत्तर प्रदेश होमगार्ड विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, राज्यात सध्या ७७,००० होमगार्ड आहेत. दशकभरात कोणतीही नवीन नियुक्ती झाली नसल्याने यावेळी जवळपास प्रत्येक होमगार्ड निवडणूक ड्युटीवर होता. एका होमगार्डला सामान्यतः मतदान कर्तव्यासाठी दररोज ९०० रुपये मिळतात.

गोंडाच्या बडागाव येथील गृहरक्षक अरुण कुमार श्रीवास्तव यांचाही मिर्झापूर येथे निवडणूक कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. ते आणि त्यांचे सहकारी ३० मे रोजी गोंडा येथून जवळपास ३०० किमी दूर मिर्झापूर येथे आले होते. प्रशासनाने स्थानिक प्राथमिक शाळेत त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली असली तरी या शाळांमध्ये कुलरची व्यवस्था नव्हती. ३० मे रोजी दुपारी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले; ज्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मुलगा सुगंध सौरभ याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “त्यांना निवडणुकीनंतर माझे लग्न करायचे होते. आता कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर असल्याने मी दिल्लीतील माझी खासगी नोकरी सोडून गोंडा येथे जाईन. मी अनुकंपा तत्त्वावर होमगार्डची नोकरीही नाकारणार नाही.”

योग्य व्यवस्थेचा अभाव

३१ मे रोजी मिर्झापूर मतदान केंद्रावर जात असताना बसमध्ये बेशुद्ध पडल्यानंतर होमगार्ड सत्य प्रकाश पांडे यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. मिर्झापूरमध्ये त्यांच्याबरोबर कर्तव्यावर असलेल्या त्यांच्या मेहुण्याने दिलेल्या माहितीनुसार, सत्य प्रकाश ३१ मे रोजी सकाळी बरे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि त्यांची दोन मुले आहेत. त्यांचा मुलगा परमात्मा प्रकाश म्हणाला की, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मिर्झापूर निवासस्थानात योग्य व्यवस्था नसल्याबद्दल तक्रारही केली होती.

रायबरेलीच्या लालगंज येथील होमगार्ड श्याम सुंदर सिंह यांनादेखील ३१ मे रोजी मिर्झापूर येथे निवडणूक कर्तव्यावर असताना अस्वस्थ वाटू लागले आणि ते बेशुद्ध पडले. रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची मुलगी शालिनी म्हणाली की, त्यांनी ३० मे रोजी त्यांच्या शेवटच्या संभाषणात मिर्झापूरमधील भीषण उष्णतेचा उल्लेख केला होता. तिचा भाऊ सचिन म्हणाला, “आम्ही भाड्याच्या घरात रहात असल्याने ते स्वत:चे घर बांधण्यासाठी अनेक वर्षांपासून बचत करत होते. शालिनीचे लग्न करण्याचाही त्यांचा विचार होता. त्यांच्या निधनाने आता कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली आहे,” असे तो म्हणाला.

हेही वाचा : राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी; महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एनडीएसमोर ‘ही’ आव्हाने

गोंडाच्या सांभरी गावातील ५५ वर्षीय होमगार्ड रामजियावान यादव यांचाही ३१ मे रोजी मिर्झापूरमध्ये मृत्यू झाला. ३० मे रोजी ते मिर्झापूरमध्ये आल्यानंतर तीव्र उष्णतेमुळे त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य व्यवस्था करण्याची विनंती केली होती, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला. ३१ मे रोजी दुपारी बसमधून मतदान केंद्रावर जात असताना रामजियावान यांना अस्वस्थ वाटू लागले. एक तासानंतर ते बेशुद्ध पडले आणि दोन तासांनंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा मुलगा चहाची टपरी चालवतो. “माझ्या वडिलांचे त्यांच्या नोकरीवर प्रेम होते, कारण त्यामुळे त्यांना समाजात आदर मिळाला. या हिवाळ्यात घराचे बांधकाम करण्याचा त्यांचा विचार होता. आता काय करावे आम्हाला कळत नाही,” असे तो म्हणाला.