मुंबईः महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी गेल्या १८ वर्षांपासून झटणाऱ्या राज ठाकरे यांच्या नवनिर्माण पक्षाचे इंजिन पुन्हा एकदा यार्डातच रुतले आहे. विधानसभेच्या शनिवारी जाहीर झालेल्या निकालात पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील आणि ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह पक्षाच्या सर्वच- १२५ उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला असून अनेक उमेदवारांना आपली अनामतही वाचविता आलेली नाही. त्यामुळे १५ व्या विधानसभेत मनसेचे अस्तित्वच राहणार नसल्याने येत्या काळात पक्षाचे अस्तिव टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान ठाकरे यांच्यासमोर असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्याशी सुरु झालेला संघर्ष आणि पक्षात होणारी घुसमट याला वैतागलेल्या राज ठाकरे यांनी जानेवारी २००६ मध्ये शिवसेनेला जयमहाराष्ट्र करीत मार्च महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात राज ठाकरे यांचा करिष्मा आणि पक्षातील तरुणांची फळी, मनसेच्या विविध आंदोलनाला जनतेला मिळणारा प्रतिसाद यामुळे सन २००९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला दणदणीत यश मिलाले होते. त्यावेळी मुंबई, ठाणे, पुणे येथून पक्षाचे १३ आमदार विधानसभेत निवडून आले होते. त्यानंतर सन २०१२च्या महापालिका निवडणुकीतही मनसेच्या यशाचा आलेख उंचावला होता. मुंबई महापालिकेत २८, ठाण्यात ७ पुण्यात १९ तर नाशिक महापालिकेत ४० जागा जिंकत पक्षाने तेथे सत्ताही मिळविली होती. मात्र गेल्या काही वर्षात राज ठाकरे यांची धरसोड भूमिका, कधी भाजपासोबत युती त कधी विरोधात, जनतेच्या जिव्ह्याळ्याच्या प्रश्नापेक्षा जातीय, धार्मिक विषयांना प्राधान्य, वर्षभरात कोणत्याही ठोस कार्यक्रमांचे आयोजन न करणे, पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष आणि धोरण सातत्याचा अभाव, पक्षात दुसऱ्या फळीतील नेत्यांचा अभाव आणि एकूण ठाकरे यांची हम करे सो भूमिका यामुळे गेले एक तप राज ठाकरे यांच्या सभांसाठी मैदाने भरली असली तरी त्यांचे मतात रुपांतर होऊ शकलेले नाही. त्यामुळेच सन २०१४ आणि २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला जेमतेम एका जागेवर विजय मिळविता आला. यावेळी स्वबळावर १२५ जागा लढविणाऱ्या मनसेला एकही जागा जिंकता आली नसून पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांना माहीममध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले असून पक्षाचे अन्य दोन प्रमुख नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांचाही पराभव झाला आहे.

हेही वाचा – सोलापुरात काँग्रेस गलीतगात्र

हेही वाचा – चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य टिकवून ठेवण्यात काँग्रेसला अपयश; नेत्यांमधील चढाओढ कारणीभूत

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या राज ठाकरे यांनीच राज्यात भाजपाची सत्ता येईल आणि फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे भाजपाची सत्ता येणार असेल आणि मनसे भाजपाची बी टीम म्हणून निवडणूक लढणार असेल तर त्या पक्षाला मते कशी द्यायची ही मतदारांची भावनाच मनसेच्या दारुण पराभवास कारणीभूत असल्याचे पक्षातीलच नेते बोलू लागले आहेत. एकीकडे विधिमंडळातील अस्तित्व संपुष्टात आले असतानाच मनसेचा जनाधारही घटू लागला आहे. सन २००९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला ५.७१ टक्के मते मिळाली होती. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हा टक्का ३.१५ टक्क्यांवर घसरला. पुढे २०१९ च्या निवडणुकीत मनसेला जेमतेम २.२५ टक्के मतांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी त्यात आणखीन घट झाली असून पक्षाच्या १२५ उमेदवारांना मिळून १० लाख २ हजार ५५७ मते मिळाली असून पक्षाचा जनाधार आता अवघ्या १.५५ टक्केवर आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raj thackeray amit thackeray raju patil failure existence questions print politics news ssb