उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय वाराणसीमध्ये प्रचारात व्यस्त असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ते निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे गांधी भावंडांनी आतापर्यंत फक्त एक रॅली अन् रोड शोला संबोधित केल्यामुळे काँग्रेसने निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात आपला उत्तर प्रदेशमधील प्रचार वाऱ्यावर सोडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यत्वे राज्याचे प्रभारी AICC सरचिटणीस अविनाश पांडे यांनीसुद्धा प्रामुख्याने जिल्ह्यांमध्ये इंडिया आघाडीसाठी समन्वय बैठका घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२६ एप्रिलपर्यंतच्या तीन आठवड्यांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ३८ रॅली आणि प्रबुद्ध संमेलनांना संबोधित केले होते. एआयसीसीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी सहारनपूर येथे पक्षाचे उमेदवार इम्रान मसूद यांच्यासाठी आयोजित केलेल्या एका रोड शोचे नेतृत्व केले. तर पंतप्रधान मोदींनी २६ एप्रिलपर्यंत सात सार्वजनिक सभांना संबोधित केले आणि दोन रोड शोचे नेतृत्व केले. या कालावधीत राहुल गांधी यांनी अमरोहा येथे सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमवेत काँग्रेस उमेदवार दानिश अली यांच्यासाठी फक्त एका रॅलीला संबोधित केले.

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व गांधी भावंडांनी केले आहे, परंतु यंदा तिथे प्रचारात त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. पक्षाचे कार्यकर्ते अमेठी आणि रायबरेलीमधून त्यांच्या नावांच्या घोषणेची वाट पाहत आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील २६ जागांपैकी आतापर्यंत १६ जागांवर दोन टप्प्यांत मतदान झाले आहे. उर्वरित १० जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. १७ जागांवर काँग्रेस संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीचा भाग म्हणून सपाबरोबर आघाडी करून लढत आहे, तर ६ जागा पश्चिम उत्तर प्रदेशात आहेत. पहिल्या दोन टप्प्यात यापैकी पाच ठिकाणी मतदान झाले आहे.

इंडिया आघाडीचा भागीदार सपा आपला प्रचार वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. तो प्रामुख्याने अखिलेश यादव यांच्यावर अवलंबून आहे. अखिलेश यांचे काका शिवपाल बदायूंमधून लढत असलेला मुलगा आदित्य यादव यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. १२ एप्रिल रोजी पिलीभीत येथून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणारे अखिलेश गेल्या १४ दिवसांत बिजनौर, मेरठ, अलीगढ, मुझफ्फरनगर, मुरादाबाद, गौतम बुद्ध नगर आणि एटाह अशा केवळ आठ जाहीर सभांना संबोधित करू शकले. अखिलेश यांनी २४ एप्रिल रोजी मैनपुरी मतदारसंघांतर्गत इटावा येथे भारतीय संघबंधन कार्यकर्ता संमेलनालादेखील संबोधित केले, जिथून त्यांची पत्नी डिंपल यादव निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचाः काँग्रेसचे नसीम खान कोणती भूमिका घेणार ?

तिसरा टप्पा सपासाठी देखील महत्त्वपूर्ण असेल, कारण निवडणुकीत तीन जागा हे त्यांचे बालेकिल्ले आहेत, डिंपल यादव मैनपुरीमधून आणि अखिलेशचे चुलत भाऊ अक्षय आणि आदित्य अनुक्रमे फिरोजाबाद आणि बदायूंमधून निवडणूक लढवत आहेत. इंडिया आघाडीच्या उमेदवारांना अखिलेश आणि राहुल यांच्या संयुक्त रॅलीचा फायदा होईल अशी आशा असताना पहिल्या दोन टप्प्यात फक्त एकच रॅली झाली असून, तीसुद्धा काँग्रेसच्या उमेदवारासाठी घेण्यात आली आहे. याउलट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक मतदारसंघांत दोनदा, काहींनी तीनदा प्रचार सभा किंवा प्रबुद्ध संमेलनांना संबोधित केले आहे. त्यांनी सुमारे चार आठवड्यांपूर्वी मथुरा येथे प्रबुद्ध संमेलनाची सुरुवात केली आणि मेरठ, गाझियाबाद, शामली, सहारनपूर, बिजनौर, अमरोहा, हाथरस, बुलंदशहर, गौतम बुद्ध नगर, पिलीभीत, बदायूं, बरेली आणि आग्रा येथे अशा संमेलनांना संबोधित केले.

गेल्या दोन आठवड्यांत आदित्यनाथ यांनी मथुरा, बागपत, अलीगढ, सहारनपूर, बिजनौर, नगीना, रामपूर, हापूर, मुझफ्फरनगर, कैराना, मुरादाबाद, पिलीभीत आणि गौतम बुद्ध नगर आदी ठिकाणी जाहीर सभांना संबोधित केले आहे. नगीना, बागपत आणि सहारनपूर यांसारख्या मतदारसंघात त्यांनी गेल्या महिनाभरात दोनहून अधिक सभांना संबोधित केले. केरळमधील राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान झाले, त्यानंतर उर्वरित पाच टप्प्यांमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा प्रचार राज्यात तीव्र होण्याची आशा काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More rally in uttar pradesh than narendra modi and yogis opponents vrd