Mumbai Toll Waiver Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही तास आधी राज्यातील महायुती सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारांवर असलेल्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईत दररोज ये – जा करणाऱ्या अडीच ते तीन लाख वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. या टोलमाफीमुळे मुंबईच्या वेशींवर होणारी वाहतूक कोंडी, टोल भरण्यासाठीच्या वाहनांच्या रांगांपासून नागरिकांना सुट्टी मिळणार आहे. इंधन व वेळेची बचत होणार आहे. मात्र यामुळे सरकारच्या तिजोरीवर ८०० ते १००० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे.

टोलमाफीचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आमदार झाल्यापासून या टोलमाफीची मागणी करत आलो आहे. या टोलनाक्यांविरोधात मी न्यायालयातही गेलो आहे. आम्ही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’नंतर ‘मुख्यमंत्री लाडका प्रवासी योजना’ घेऊन आलो आहोत. या निर्णयामुळे वाहतूक व्यवस्था सुलभ होईल, इंधनाची व वेळेची बचत होईल, पर्यावरणाचं होणारं नुकसान कमी होईल. तसेच, मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं की निवडणुकीच्या आधी घेतलेला हा निर्णय कायमस्वरुपी असेल.

६० मतदारसंघांवर लक्ष

महायुती सरकारने या निर्णयाद्वारे मुंबईतील ३६, ठाणे जिल्ह्यातील १७ आणि रायगडमधील सात विधानसभा मतदारसंघांमधील लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महानगर भागात राहणाऱ्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Elections 2024: राज्यातील प्रमुख पक्षांपुढील आव्हानांचा लेखाजोखा…

उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीला शह

मुंबई महानगर परिसरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं (ठाकरे) वर्चस्व आहे. तसेच या भागात शिवसेना (शिंदे) व भाजपाचंही मोठं प्रस्थ आहे. येथील मतदारसंघांवरील पकड मजबूत करण्यासाठीच शिंदे-फडणवीसांनी ही खेळी केल्याचं बोललं जात आहे. कारण, पक्ष फुटल्यानंतरही ठाकरे गटाची या भागावरील पकड मजबूत असल्याचं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं. महाविकास आघाडीने मुंबई, ठाणे आणि रायगडमधील १० पैकी पाच जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीला या तीन जिल्ह्यांमध्ये शह देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा >> ‘मोदीबागे’त भेटीगाठींना जोर; अजित पवारांचे शिलेदार शरद पवारांच्या भेटीला

राज ठाकरेंकडूनही श्रेय घेण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरेंना फटका?

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण महाराष्ट्रभर टोलनाक्यांविरोधात आंदोलनं केली होती. २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने मनसेच्या आंदोलनांनंतर राज्यातील ४० हून अधिक टोलनाके बंद केले होते. या विजयानंतरही मनसेने त्यांचं टोलविरोधी आंदोलन चालूच ठेवलं. मनसे सातत्याने इतर टोलनाक्यांविरोधात आंदोलनं केली आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सहभागी होईल असं बोललं जात होतं. मात्र, राज ठाकरे यांच्या पक्षाने यंदाच्या निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यानंतर महायुतीने हा निर्णय घेतला आहे. मात्र टोलमाफीच्या या निर्णयाचा मनसे देखील प्रचारात प्रभावीपणे वापर करू शकते. राज ठाकरे यांच्या पक्षामुळे अनेक मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडू शकते. यामुळे मुंबई, ठाणे व रायगडमध्ये महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >> जाहीरनाम्याऐवजी ‘अंमलबजावणी आराखडा’; भाजपकडून ३० सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन

दरम्यान, राज ठाकरे यांनी टोलमाफीच्या निर्णयानंतर सरकारचं अभिनंदन केलं. तसेच हा निर्णय निवडणुकीनंतरही लागू राहिला पाहिजे, अशी आठवण करून दिली. यासह त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की “आपलं आंदोलन यशस्वी झाल्याची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या आंदोलनाचं लोकांना स्मरण करून द्या”.