कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होताच चार मतदारसंघात बंडाचे झेंडे लागले आहेत. काही ठिकाणी नाराजी उफाळून आली आहे. कोल्हापूर उत्तर मधील उमेदवारीवरून तर जिल्हा काँग्रेस भवनावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला. यामुळे महाविकास आघाडी अंतर्गत बंडखोरांची नाराजी दूर करण्याचे कडवे आव्हान निर्माण झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस पक्षाकडे सर्वाधिक पाच जागा गेल्या आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात रात्री उशिरा राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सामाजिक अभियांत्रिकीकरण करण्याचा सल्ला राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिला होता. त्यातूनच इतर मागासवर्गीय असलेले लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्र सेवा दलात जडणघडण झालेले लाटकर यांनी राष्ट्रवादीला रामराम करीत लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे काम सुरू केले. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद उमटले. मध्यरात्री जिल्हा काँग्रेस भवनावर दगडफेक झाली. शहर अध्यक्ष सचिन चव्हाण समर्थकांनी हा प्रकार केल्याचे सांगितले जाते. तेथे हॅशटॅग चव्हाण पॅटर्न असे फलक रंगवले गेले. यावर सचिन चव्हाण यांनीही अजूनही वेळ गेलेली नाही उमेदवारी बदलावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे कोल्हापूरचा तिढा आणखीनच वाढला आहे.

हेही वाचा >>>Nalasopara Vidhan Sabha Constituency : कॉंग्रेसची उमेदवारी हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या पथ्थ्यावर

राधानगरी मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार के. पी. पाटील यांनी मशाल हाती घेतली आहे. नाराज झालेले त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी चालू केली आहे. येथे शिवसेना ( ठाकरे), काँग्रेस मध्ये नाराजी दिसत आहे. इचलकरंजी मतदारसंघ काँग्रेस कडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला आहे. येथे काल प्रदेश सचिव मदन कारंडे यांची उमेदवारी जाहीर झाली. स्पर्धेत असलेले गतवेळचे उमेदवार राहुल खंजिरे, शहर अध्यक्ष संजय कांबळे, स्मिता संजय तेलनाडे असे इच्छुक नाराज झाले आहे. तर राष्ट्रवादीचेच माजी आमदार अशोक जांभळे यांचे पुत्र सुहास जांभळे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची हालचाल सुरू केली आहे. चंदगड मध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने नंदाताई बाभुळकर यांना रिंगणात उतरवले असले तरी आघाडीतील सर्वच इच्छुक नाराज झाले आहेत.

हेही वाचा >>>Palghar Vidhan Sabha Constituency : पालघरमध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार भाजपमधून आयात

एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात महा विकास आघाडीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा वाद अधिक वाढणार नाही असा विश्वास आघाडीचे नेते व्यक्त करीत आहेत. लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीकडे लोकांचा कल असल्याने उमेदवारीची स्पर्धा जोरदार होती. त्यामुळे इच्छुकांच्या समर्थकांकडून काही प्रकार घडले आहेत. सर्वच इच्छुकांची समजूत घातली जात आहे. त्याला निश्चितपणे यश येईल. आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाऊ, असा विश्वास काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.