Jayant Patil in Legislative Council Election : नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातील उरणमधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या मताधिक्क्याने महायुतीसमोर आव्हान उभे केले होते. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने मतदान न केल्याने आणि काँग्रेसची मते फुटल्याने शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर मविआमध्येही उरणच्या जागेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघाचा भाग असलेल्या उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला जवळपास १५ हजारांचे मताधिक्य मिळाले. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष आणि उरणच्या ग्रामीण पट्टयात अजूनही ताकद राखून असलेला शेतकरी कामगार पक्ष एकत्र लढले. विधानसभेतही या एकजुटीची पुनरावृत्ती होईल अशी शक्यता होती. मात्र, विधान परिषदेच्या निकालानंतर मविआमध्येही मतभेदाचे वारे वाहू लागले आहेत.

हेही वाचा >>> डावपेचातील मतभिन्नतेमुळे जयंत पाटील यांचा पराभव; शरद पवार यांचे स्पष्टीकरण

विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांच्या पराभवाला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत अशा प्रतिक्रिया उघडपणे उरण, पेण पट्टयातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते देऊ लागले आहेत. उरणसारख्या शहरी आणि ग्रामीण अशी मिश्र वस्ती असलेल्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाबरोबरच शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद आहे. काहीही झाले तरी उरणमध्ये उद्धव सेनेला साथ द्यायची नाही आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची अशी भाषा आता शेकापचे नेते करू लागले आहेत. महेश बालदी यांच्यासारख्या प्रभावी आमदारासोबत लढायचे असेल तर महाविकास आघाक्ची एकजूट असायला हवी असे विरोधी पक्षांमधील एका मोठ्या गटाचे म्हणणे आहे. परंतु जयंत पाटीलच दुखावले गेल्याने ही एकजूट आता साधायची कशी, असा प्रश्न ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे.

मतविभागणीमुळे बालदी विजयी

मागील विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ तेव्हाच्या एकसंध शिवसेनेला सुटला आणि येथून भाजपचे नेते महेश बालदी यांनी बंडखोरी केली. येथे एकसंध शिवसेनेचे तत्कालीन आमदार मनोहर भोईर, शेकापचे नेते विवेक पाटील आणि अपक्ष बालदी अशी तिरंगी लढत झाली होती. यामध्ये शिवसेनेला ७० हजार तर शेतकरी कामगार पक्षाला ६० हजारांच्या घरात मते मिळाली होती. भाजपने आपले बळ छुप्या रीतीने बालदी यांच्या मागे लावले. त्यामुळे पाच हजार मतांनी बालदी विजयी झाले.

रायगडमधील पराभवामुळे नाराजी

रायगड लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांना अलिबाग, पेण यासारख्या शेकापची ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघांनी पुरेशी साथ दिली नसल्याचे स्पष्ट झाले होते. अलिबाग हा एकेकाळी जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जात असे. येथून गीते मोठया मतांनी पिछाडीवर गेले. सुनील तटकरे यांनी येथून बाजी मारताना शेकापचा गड असलेल्या अनेक प्रभागांमधून मोठे मताधिक्य मिळविले. हा पराभव अर्थातच उद्धव सेनेच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जाते. विधान परिषद निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवत असताना उद्धव सेनेने जयंत पाटील यांची साथ करायची नाही, असा निर्णय घेतला. ठाकरे यांच्या भूमिकेमुळे जयंत पाटील यांचा मोठा पराभव झाल्याचा सूर आता अलिबाग, उरण, पेण पट्टयात उमटू लागला आहे. याचे पडसाद या संपूर्ण पट्टयात आगामी विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mva worry regarding uran seat after defeat of jayant patil in legislative council elections print politics news zws
Show comments