मुंबई: रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदावरून हटविण्याची मागणी काँग्रेसने केली होती त्या मागणीला यश आले. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले त्याबद्दल धन्यवाद पण झारखंड व पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना तात्काळ हटवले होते, रश्मी शुक्ला यांना हटवण्यास एवढा उशीर का लागला? असा प्रश्न उपस्थित करताना रश्मी शुक्ला यांना निवडणूकसंदर्भातील कोणतेही काम देऊ नये, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

रश्मी शुक्ला या वादग्रस्त अधिकारी आहेत, त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते, त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत, असे असतानाही देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या फायद्यासाठी रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची बेकायदेशीर मुदतवाढ दिली होती. मात्र काँग्रेसने तीन वेळा मागणी करूनसुद्धा शुक्ला यांना हटवले नाही. त्यानंतर ३१ ऑक्टोबर व ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवले होते. अखेर निवडणूक आयोगाने उशिराने का होईना रश्मी शुक्ला यांना हटवले आहे, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा >>>Amit Shah : UCC बाबत अमित शाह यांची मोठी घोषणा, आदिवासी बांधवांना काय दिलं आश्वासन?

आता आयोगावर खापर फोडू नका’

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या निर्णयावर मत व्यक्त करणार नाही असे सांगून फडणवीस म्हणाले, या निर्णयाचे शरद पवार, उद्धव ठाकरे गटातील आणि काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले आहे. आता त्यांना निवडणूक आयोग योग्य व चांगला निर्णय घेत असल्याचे वाटत आहे. हरियाणामध्ये भाजपला यश मिळाल्यावर विरोधकांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. राज्यातही महायुतीला यश मिळाल्यावर विरोधकांनी आयोगावर खापर फोडू नये, एवढीच अपेक्षा आहे. कोल्हापूरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून घडलेल्या घटना आश्चर्यकारक असून आता उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस हद्दपार झाली असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

Story img Loader