अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या अकोला जिल्हा दौऱ्यामध्ये वाद निर्माण होण्याचे समीकरणच तयार झाले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्याकडून मातीने माखलेले पाय धुवून घेतल्याची कृती केल्याने नाना पटोलेंवर चौफेर टीका झाली. जाहीर कार्यक्रमात देखील त्यांनी विरोधकांविषयी अपशब्दाचा वापर केला. यापूर्वी नाना पटोले यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप नेते संजय धोत्रे यांच्या विषयी वादग्रस्त विधान करून भर लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची नाराजी ओढवून घेतली होती.

आक्रमक नेते म्हणून नाना पटोले यांची ओळख आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आल्यापासून विरोधकांना घेरण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. बोलण्याच्या ओघात कधी नको ते शब्द निघाल्याने नाना पटोलेंवरच डाव उलटतो. नाना पटोलेंनी अकोला जिल्ह्याचा दौरा केल्यावर काही ना काही कारणांवरून नवा वाद निर्माण होण्याचे सत्रच सुरू झाले आहे. जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी नाना पटोले सोमवारी आले होते. दरम्यान, पंढरपूर वारीसाठी निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी देखील वाडेगाव येथे असल्याने नाना पटोले दर्शनासाठी गेले. मैदानावरील चिखलामुळे त्यांचे पाय मातीने माखले. पाय धुण्यासाठी पाणी मागितले असता बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ता विजय गुरव यांनी नाना पटोलेंचे पाय धुतले. पटोले देखील पाय धुवून घेतांना चित्रफितीमध्ये दिसत आहेत. या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटले. विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर नाना पटोलेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, तर तो कार्यकर्ता देखील ‘आपल्या दैवता’च्या बचावासाठी समोर आला. दरम्यान, वाडेगाव येथील जाहीर कार्यक्रमात नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागतांना काही वैदर्भीय अपशब्दांचा देखील वापर केल्याचा आरोप होत आहे.

आणखी वाचा-पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यास केव्हापासून सुरुवात झाली? युतीच्या राजकारणाचा काय आहे इतिहास?

यापूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान अकोला येथील सभेत नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करतांना भाजप नेते संजय धोत्रे यांच्या प्रकृतीविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ४ एप्रिलला शहरातील स्वराज्य भवन येथील सभेत बोलतांना नाना पटोले म्हणाले होते की, ‘अकोल्याचे विद्यमान खासदार आता व्हेंटिलेटरवर आहेत. व्हेंटिलेटर केव्हा काढतील मला माहिती नाही. पण ते निवडणुकीतच काढतील.’ नाना पाटोलेंच्या या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्यावर असंवेदनशीलतेची टीका भाजप नेतृत्वाने केली होती. राज्यात ‘मविआ’चे सरकार असतांना बाळापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात नाना पटोलेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ‘मविआ’मध्ये अंतर्गत नाराजी निर्माण झाली होती. नाना पटोलेंचा अकोला जिल्हा दौरा आणि वाद याचा जवळचा संबंध राहिला आहे.

आणखी वाचा-विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेआधी महायुती-मविआची परिक्षा; अजित पवारांच्या अडचणीत मात्र वाढ

वादग्रस्त विधानाचा निवडणुकीत काँग्रेसला फटका?

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेसचे उमेदवार मराठा समाजाचे असल्याने मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले. नाना पटोलेंनी संजय धोत्रे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने काही प्रमाणात मराठा समाजात नाराजी होती. निवडणुकीमध्ये अटीतटीच्या लढतीत भाजपने ४० हजार ६२६ मतांनी काँग्रेसवर विजय मिळवला. नाना पटोलेंच्या वादग्रस्त विधानाचा निवडणुकीत अकोल्यामध्ये पक्षाला फटका बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.