पुणेकरांना कायम दूरचा वाटणारा पण उपनगरांतील रहिवाशांना आपलासा वाटणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची १९९९ मध्ये स्थापना झाल्यानंतर या पक्षाची पायामुळं खोलवर रुजण्यासाठी विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना आणि महापालिकांच्या प्रभागांच्या रचनेत बदल हे दोन हुकमी मार्ग या पक्षाने अवलंबलेले दिसतात. राज्यात असलेल्या सत्तेचा वापर करून आपल्या सोयीचे मतदारसंघ तयार करण्यावर या पक्षाने प्रारंभीच्या काळात भर दिला. समाविष्ट गावांचा परिसर हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा होता आणि आहे. त्यामुळे संबंधित भागाच्या जोरावर महापालिकेत शिरकाव करण्याचे धोरण या पक्षाने सुरुवातीच्या काळात राबविले. स्थापनेनंतर झालेल्या २००२ च्या महापालिका निवडणुकीत या पक्षाला फारसा प्रभाव टाकता आला नाही. मात्र, त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत हा पक्ष ४८ जागा घेत अल्पावधीत प्रथम स्थानावर जाऊन पोहोचला. अर्थात त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची घौडदौड सुरू होती. तोपर्यंत पुण्यावर माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे प्राबल्य होते. कलमाडी आणि अजित पवार यांच्यात सख्य नसल्याने कोणत्याही परिस्थितीत कलमाडींना महापालिकेच्या सत्तेवरून पायउतार करण्याचा ‘पण’ अजित पवार यांनी केलेला होता. त्यामुळे २००७ च्या निवडणुकीत कलमाडी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि भाजपशी हातमिळवणी केली आणि राजकारणातील ‘पुणे पॅटर्न’चा जन्म झाला. राष्ट्रवादीच्या ४८ जागा, शिवसेनेच्या २० आणि भाजपचे २५ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचे ३६ नगरसेवक होते. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असूनही पुण्यात काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर आणि उपमहापौरपद व स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेकडे आले.

हेही वाचा : जम्मू काश्मीरमध्ये गुलाम नबी आझादांच्या पक्षाचे राजकारण संपुष्टात? विधानसभा निवडणूक कामगिरीनंतर चर्चांना उधाण

‘पुणे पॅटर्न’मध्ये असूनही विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे होते. २००९ ची विधानसभा निवडणूक जवळ आल्यावर मतदारांच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाल्याने ‘पुणे पॅटर्न’ला तिलांजली देण्याचा निर्णय तत्कालीन शिवसेनेने घेतला. त्यानंतर झालेल्या २०१२ च्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ५१ जागा पटकावल्या. मात्र, शिवसेनेला फटका बसला. त्यांच्या जागा २० वरून १५ वर आल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि पुढील पाच वर्षे सत्ता उपभोगली. दरम्यानच्या काळात देशात भाजपचे वारे वाहत होते. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व राखून एकहाती सत्ता मिळविली. त्यामध्ये काँग्रेसची वाताहात झाली. काँग्रेस अवघी नऊ नगरसेवकांवर आली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस ही ३९ नगरसेवक निवडून आणून दुसऱ्या स्थानावर राहिली. एकंदरीत पुण्याच्या स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी ही कायम बेरजेचे राजकारण खेळत राहिली. सत्तेसाठी काळानुरुप मैत्रीमध्ये बदल करत राहिल्याचा राष्ट्रवादीचा पुण्यातील राजकारणाचा इतिहास आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेस ही वडगाव शेरी आणि हडपसर या दोन मतदार संघांमध्येच ताकद राखून आहे. खडकवासला मतदार संघ या एकेकाळी काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र, या भागात झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे हा मतदार संघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांच्याही हातातून निसटला आहे. एके काळी दुसऱ्या पक्षांमध्ये दुफळी माजविण्यात तरबेज असलेल्या या पक्षाची राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) असे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना काही ठिकाणी स्वकियांशी झुंज द्यावी लागणार आहे.

sujit.tambade@expressindia. com