संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी बंडखोरांवर चढविलेला हल्ला आणि आता निवृत्ती स्वीकारा, असा अजित पवार यांनी थोरल्या पवारांना दिलेला सल्ला यातून पवार काका-पुतण्यातील संघर्ष चिघळेल अशी चिन्हे वर्तविली जात होती. पण बंडखोर मंत्री व आमदारांनी पवारांची घेतलेली भेट, दोन्ही गटांकडून टाळली जाणार टीका यातून परस्परांमध्ये तह झाला का, अशी चर्चा रंगली आहे. मात्र पाऊस कमी झाल्यावर शरद पवार पुन्हा बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर उभय बाजूने कडवटपणा जाणवत होता. ५ जुलै रोजी दोन्ही गटांच्या मुंबईत सभा झाल्या. शरद पवार यांनी भाजपबरोबर जाणारे संपतील, असे भाकित वर्तविले. तसेच १९८० मध्ये आपल्याला सोडून गेलेेले तेव्हाच्या समाजवादी काँग्रेसमधील बहुतांशी आमदार पुढील निवडणुकीत पराभूत झाले होत याची आठवण करून देत बंडखोरही असेच पराभूत होतील, असा अंदाज वर्तविला. अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या आमदार व पदाधिकाऱ्यांना स्वत: पवारांनी दूरध्वनी करून संपर्क साधला होता. अजित पवार गटाच्या मेळाव्यात अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले होते.

हेही वाचा… पश्चिम वऱ्हाडाला मंत्रिपदाची हुलकावणीच

पवारांनी आता निवृत्ती स्वीकारावी, असा थेट सल्ला अजित पवारांनी दिला होता. तसेच कोणाच्या पोटी जन्म घ्यावा इथपर्यंत कडवट भाषा केली होती. २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये भाजपबरोबर जाण्यासाठी शरद पवार यांनीच कसा पुढाकार घेतला होता व चर्चांच्या कशा फेऱ्या झडल्या होत्या याची माहिती दिली होती. प्रफुल्ल पटेल वा भुजबळ यांनीही पवारांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून शरद पवार यांना हटवून अजित पवार यांची करण्यात आलेली नियुक्ती, पक्षाचे नाव व चिन्हावर केलेला दावा यातून हा वाद आणखी चिघळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

हेही वाचा… मराठवाड्यातील ताकदवान भाजपमध्ये अस्वस्थताच अधिक

बंडखोरांच्या मतदारसंघांत सभा घेण्याचे शरद पवार यांनी ठरविले होते. त्यासाठी छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघाची निवड करण्यात आली. या सभेत पवारांनी येवलाकरांची दिलगिरी व्यक्त केली पण थेट हल्ला चढविला नव्हता. त्यानंतर दोन्ही बाजूने तलवारी म्यान केल्या गेल्या आहेत. गेल्या रविवारी आणि सोमवारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री व आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी बंडखोर गटाने पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी पवारांना विनंती करण्यात आली. पण पवारांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. फक्त शिवसेनेसारखा राष्ट्रवादीत कडवटपणा नव्हता. पवार आणि बंडखोरांमध्ये संवाद घडला. पवारांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांतील पाऊस पाण्याची चौकशी केली.

हेही वाचा… धुळ्यात अजित पवार गटात पदांसाठी चुरस

अजित पवार यांच्या बंडानंतर एका बडा उद्योगपती पक्ष एकसंघ राहावा म्हणून मध्यस्थी करीत असल्याची चर्चा आहे. या उद्योगपतीने दोन्ही नेत्यांची भेट घेतल्यावर दोन्ही गटांनी परस्परांना इशारे देण्याचे थांबविले आहे. शरद पवार कालांतराने आमच्याबरोबर येतील, असे बंडखोर गटाचे नेते ठामपणे दावा करीत आहेत.

हेही वाचा… जयंत पाटील यांना मतदारसंघातच भाजपचे आव्हान

सध्या पाउस असल्याने पवारांनी दौरे टाळले आहेत. पण ऑगस्टमध्ये पाऊस कमी झाल्यावर दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगाव व प्रफुल्ल पटेल यांच्या भंडारा-गोंदिया या मतदारसंघांमध्ये शरद पवार हे सभा घेणार असल्याचे सांगण्यात येते. या सभांमधून पवारांनी टीका केल्यास पुन्हा कडवटपणा येऊ शकेल.

कोणीही पक्ष सोडून जावे. पण पक्षाचे नाव व चिन्हावर बंडखोरांनी दावा केल्याने शरद पवार व्यथित झाल्याचे सांगण्यात येते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now both group of ncp are on backfoot print politics news asj