कोल्हापूर : शहरी भागाला नदीतून पिण्याचे पाणी देण्यास विरोध होत असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अदानी समुहाच्या प्रकल्पाला पाणी देण्यास संघटित विरोध होऊ लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाटगाव धरण बचाव कृती समितीच्या वतीने गारगोटी येथील तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय आंदोलन झाले. स्थानिक नेतृत्वाने एक थेंबही पाणी देणार नाही असा निर्धार केला असल्याने ८ हजार ५०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या २१०० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पाच्या उभारणीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते या प्रश्नी कोणती भूमिका घेणार यावर या आंदोलनाची तीव्रता ठरणार आहे.

हेही वाचा – तटकरे यांचे विश्वासू सहकारी सुरेश लाड भाजपमध्ये राष्ट्रवादीला धक्का

इचलकरंजी महापालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड येथून नळ पाणी योजना राबवली जाणार आहे. या पाणी योजनेला कागल तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला आहे. तर हे पाणी मिळवणारच असा निर्धार करीत इचलकरंजीकर दोन कृती समितीच्या माध्यमातून संघटित झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचा हा लढा चर्चेत असताना पाणी प्रश्नावरून आणखी एका आंदोलनाची धग वाढली आहे.

प्रकल्पासाठी हालचाली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यातील अंजीवडे वाशी येथे या प्रकल्पासाठी हालचालीही सुरू आहेत. जिल्हा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भात कमालीची गुप्तता पाळली जात आहे. वाशी हे गाव फार पूर्वी प्लेगच्या साथीमुळे निर्मनुष्य झाले होते. येथे जंगल फोफावले आहे. या गावाच्या बरोबर वर पाटगाव (जि. कोल्हापूर) असून तेथील मौनीसागर धरणाचे पाणी खाली आणून यातून २१०० मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती होणार आहे. १४० हेक्टर क्षेत्रांपैकी ७० हेक्टर क्षेत्रात जलसाठा केला जाणार आहे. पाटगाव धरणाचे पाणी टनेलसदृश पाईपलाईनद्वारे आंजिवडे गावातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या धरणात सोडले जाणार आहे. तेथे टर्बाइन्स बसवून त्याद्वारे वीज निर्मिती केली जाणार आहे. त्याला पंप स्टोअरेज प्रोजेक्ट असे म्हटले जाते. मात्र उत्पादित वीज कुणाला पुरवली जाणार आहे? याबाबत काहीच स्पष्टता होत नाही. उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी कंपनीच्या प्रकल्पातून कोकणात उद्योगाचे नवे पर्व उभारले जाणार असले तरी त्याला कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग उजाड होण्याची भीती नव्याने उभारलेल्या आंदोलनातून व्यक्त केली जात आहे.

आंदोलनाला तोंड फुटले

पाटगाव धरण क्षेत्रातील लोकांनी या प्रकल्पाच्या विरोधात संघटित आंदोलन सुरू केले आहे. पाटगाव धरणातील पाणी कोकणात अदानी जलविद्युत प्रकल्पाकडे वळवल्याने भुदरगड तालुक्यातील अनेक गावे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. धरणातील पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात जलविद्युत प्रकल्पाकडे वळवले जाणार असताना या बाबतची माहिती स्थानिकांना दिली नाही. त्यांना विश्वासात न घेता या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता कशी दिली, राज्य सरकारनेही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे मुद्दे गारगोटी तहसील कार्यालयासमोर बुधवारी झालेल्या ठिय्या आंदोलन प्रसंगी उपस्थित करण्यात आले. या धरणातील पाण्याचा एक थेंबही अदानी किंवा अन्य कोणत्याही प्रकल्पाला देणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा – राम मंदिर सोहळ्याचे सोनिया गांधी, खरगेंना आमंत्रण; उपस्थितीची शक्यता मात्र कमी?

ग्रामस्थ-शासन संघर्षाची चिन्हे

या आंदोलनामध्ये पाटगाव धरण क्षेत्रातील गावकऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. याबरोबरच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक माजी आमदार के. पी. पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश पाटील आदी प्रमुखांचा समावेश होता. मात्र या मागणीला, आंदोलनाला जिल्ह्यातील नेत्यांचा कितपत पाठिंबा आहे यावरही तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. हाच मुद्दा ठाकरे गटाचे प्रकाश पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थित केला. पाटगाव धरण पाणी बचाव कृती समिती या आंदोलनात सहभागी झाली आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि पालकमंत्री स्वतः सहभागी होऊन पाठिंबा देणार का हे जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्य सरकारने या प्रकल्पावर ठोस निर्णय घेतला नाही तर टोकाची लढाई केली जाईल, असा निर्धार कृती समितीने केला आहे. त्यांचा हा पवित्रा पाहता आगामी काळात अदानींच्या या वीज प्रकल्पाविरोधात पाटगाव धरण क्षेत्रातील ग्रामस्थ आणि शासन यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition from all parties in kolhapur to give water to hydroelectric project in konkan print politics news ssb