लातूर- लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये आलेल्या माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकुरकर यांनी भाजपकडे उमेदवारी मागितल्यानंतर त्यांना विरोध केला जात आहे. अनेक कार्यकर्ते एकत्र आले असून चाकूरकरांऐवजी कोणालाही तिकीट द्या, आम्ही सगळे एकत्र काम करू अशी भूमिका ते मांडत आहेत. लातूर शहर भाजपात अन्य पक्षातील व्यक्तीला पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाते त्यातून पक्षातील मूळ कार्यकर्त्यावर अन्याय केला जातो, असा अन्याय आम्ही किती दिवस सहन करणार अशी भूमिका पक्षातील हे कार्यकर्ते मांडत आहेत .

यापूर्वी सलग दोन वेळा काँग्रेस मधून आलेले शैलेश लाहोटी यांना भाजपने उमेदवारी दिली व आता नव्याने डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचे नाव चर्चेत आहे. शहरातील शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्यासह १५ जणांनी लातूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी केली आहे. चार दिवसापूर्वी राज्यात सर्वच मतदारसंघात भाजपने चिठ्ठीचा प्रयोग केला असा प्रयोग लातूरातही झाला. काहीजणांनी आपलीच नावे चर्चेत यावी यासाठी अन्य मंडळीची अडवणूक केली यातून लातूर शहर भाजपात हाणामारीचा प्रसंग उद्भवला. पक्षनिरीक्षक म्हणून धाराशिवचे मिलिंद पाटील यावेळी उपस्थित होते .

हेही वाचा >>>मीरा भाईंदरमध्ये राजकारण्यांची धार्मिक चढाओढ

लातूर भाजपा हा सतत काँग्रेस सोबत तडजोड करत असतो हा जुना इतिहास आहे. विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांची मैत्री होती मात्र या मैत्रीत भाजपची कोंडी झाली. विलासराव देशमुख अडचणीत येणार नाहीत अशाच खेळी भाजपने सातत्याने केल्या. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर तीच पद्धत पुढेही चालू असून अमित देशमुख यांना अडचण होणार नाही असेच उमेदवार त्यांच्या विरोधात भाजपकडून दिले जातात.

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडवरील अजित पवारांची पकड सैल?

यावेळी डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना पक्षप्रवेश देऊन त्यांचे नाव चर्चेत सुरू झाल्यानंतर भाजपातील पक्षांतर्गत अनेक जण आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह करू लागले आहेत.असा आग्रह यापूर्वी का केला गेला नाही, पक्षश्रेष्ठींनी निर्णय केल्यानंतर कार्यकर्ते कामाला लागत. २०१९ च्या निवडणुकीत अहमदपूर विधानसभा मतदारसंघात आमदार विनायक पाटील यांच्या विरोधात भाजपतील सर्वजण एकत्र आले. पक्षाने विनायक पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपातील दोघांनी बंडखोरी केली विनायक पाटलांचा पराभव झाला त्यानंतर दोन्ही बंडखोरांना भाजपने पक्षात घेतले . एका बंडखोराला पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद दिले, भाजपने हा नवा पायंडा पाडला असल्यामुळे लातूर शहरात इच्छुकांपैकी काहीजण बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीनंतर पुन्हा पक्ष प्रवेश देईल व पुन्हा चांगले पद मिळेल अशीही अशा या मंडळींना आहे.