राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकात सध्या सुरू असलेल्या सनातन धर्माच्या वादावर टिप्पणी करण्यात आली आहे. मार्क्सवाद्यांनी अंगीकारलेल्या अब्राहमवादी (अब्राहम यांच्यावर श्रद्धा ठेवून निर्माण झालेले धर्म) आणि नास्तिक यांच्या परस्परसंबंधाच्या षडयंत्रातून सनातन धर्माचा वाद निर्माण झाला, अशी भूमिका मांडताना यापुढे निवडणूक आयोग आणि नीती आयोगाने राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांची तपासणी करावी, अशी सूचना ‘ऑर्गनायझर’मधून करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लेखक डॉ. अमरनाधा रेड्डी मंचुरी यांनी ‘मार्क्सिस्ट द्राविडवाद : त्यांचा त्रासदायक वारसा’ (Marxist Dravidianism : A Troubled Legacy) या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात म्हटले की, उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या टीकेमुळे भारत आणि परदेशातील असंख्य हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मार्क्सिस्ट संघटना TNPWAA (तमिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स आर्टिस्ट असोसिएशन)ने आयोजित केलेल्या ‘सनातन धर्माचे निर्मूलन करा – २०२३’ (Eradicate Sanatan Dharma 2023) या चर्चासत्रात द्वेषाची पेरणी झालेली आपण सर्वांनी पाहिली. तसेच उदयनिधी स्टॅलिन जे काही म्हणाले; त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

“मार्क्सवादाने अब्राहमवादी आणि नास्तिकांशी संगनमत करून सनातन धर्मासारख्या मूळ संस्कृतीविरोधात द्वेष पसरविणे आणि जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र रचले आहे का? द्रमुक पक्षाने २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूमधील ८७.९ टक्के हिंदू जनतेला आकर्षित करणारा जाहीरनामा तयार केला होता का? भारतातील राजकीय पक्षांचे निवडणूक जाहीरनामे आणि त्याची अंमलबजावणी होते की नाही, याची तर्कशुद्ध तपासणी करण्यासाठी आता निवडणूक आयोग किंवा नीती आयोग अशा तत्सम प्राधिकरणाची आवश्यकता आहे का”, असे काही प्रश्न या लेखात उपस्थित करण्यात आले आहेत.

अब्राहमिक किंवा अब्राहमवादी हा शब्द ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम या एकेश्वरवादावर विश्वास असणाऱ्या धार्मिक अनुयायांसाठी वापरला जातो. या तीनही धर्मांची उत्पत्ती अब्राहम या नावाशी जोडली गेलेली आहे. सनातन धर्मावरून निर्माण झालेला वाद तापत ठेवण्याचा निर्णय भाजपाने केला असल्याचे दिसून येते. या माध्यमातून द्रमुक पक्ष ज्या इंडिया आघाडीचा घटक आहे, त्या आघाडीवर भाजपाला वारंवार निशाणा साधता येणे सोपे झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लीच आपल्या मंत्रिमंडळाला या विषयावर कडक उत्तर देण्याची सूचना केली होती. इंडिया आघाडीने सनातन धर्माला हद्दपार करण्याचे षडयंत्र रचले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या भोपाळ येथील सभेत केली होती.

या लेखात पुढे म्हटले आहे की, २०२१ साली आयोजित केलेल्या ‘जागतिक हिंदुत्वाचा नायनाट’ (Dismantling Global Hindutva) या परिषदेच्या संकल्पनेवरच या वर्षी सनातन धर्माचे निर्मूलन ही परिषद आयोजित करण्यात आली होती. २०२१ ची परिषद हिंदूविरोधी विचार पेरणे, बुद्धिवंतांमध्ये चुकीची माहिती पसरवणे आणि कट्टरतावादी कार्यासाठी चालना देणे यासाठी आयोजित करण्यात आली होती, असा आरोप लेखातून करण्यात आला आहे. मंचुरी यांच्या मते, या परिषदेला अमेरिकेतील ४० विद्यापीठे आणि काही हिंदूफोबिक व्याख्यात्यांनी सहप्रायोजकत्व दिले होते.

‘ऑर्गनायझर’च्या या लेखात मंचुरी यांनी उदयनिधी यांच्या इतर काही वक्तव्यांचाही दाखला दिला आहे. मार्क्सवादी शक्ती आणि द्रमुक यांच्यात हिंदूविरोधी संगनमत झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच उदयनिधी यांच्या एका विधानाचा उल्लेख केला गेला आहे. “चला, तमिळनाडूमधील सर्व ३९ लोकसभा मतदारसंघ आणि पुद्दुचेरीमधील एका मतदारसंघात विजय मिळवू या. (२०२४ लोकसभा निवडणूक) सनातन धर्म पडू दे, द्रविडम जिंकू दे” आणि “सर्व बाबतीत परिवर्तन निश्चित आहे; काहीच शाश्वत नाही. द्रमुक आणि कम्युनिस्ट चळवळीची स्थापनाच मुळात प्रत्येक बाबीवर प्रश्न निर्माण करण्यासाठी झाली आहे.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organiser article raises sanatan row sees abrahamic atheist nexus seeks screening of party manifestos kvg
Show comments