मुंबई : केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या वतीने मंगळवारपासून मुंबईत दोन दिवसीय ई गव्हर्नन्स परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या २७ व्या राष्ट्रीय परिषदेत ‘विकसित व सुरक्षित भारत आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावर विचारविनिमय करण्यात येणार आहे.

२८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांचे एक हजार प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रशासकीय सुधारणा विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास व राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे.

हेही वाचा >>>RSS चे जातनिहाय जनगणनेला समर्थनाचे संकेत, पण…

१६ अनुकरणीय उपक्रमांना पुरस्कार

या परिषदेत १६ अनुकरणीय उपक्रमांना ई-गव्हर्नन्स २०२४ चे राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. केंद्र, राज्य, जिल्हा आणि शैक्षणिक व संशोधन संस्थांना देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांमध्ये ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि १ ज्युरी पुरस्कारांचा समावेश आहे.