नीरज राऊत / सुहास बिऱ्हाडे
पालघर :
हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी (बविआ) पक्ष पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरल्याने पालघर (राखीव) मतदारंसघातील तिरंगी लढतीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि बविआ आपापल्या बालेकिल्ल्यात कशी कामगिरी करतात आणि मतांचे विभाजन कशा प्रकार होते यावर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ठाकूर यांच्या पक्षाने रिंगणात उडी घेतल्याने भाजप आणि ठाकरे गटाची सारी समीकरणे बदलली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर लोकसभा मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात असले तरी शिवसेनेच्या भारती कामाडी, भाजपचे हेमंत सावरा आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील या तिघांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळते. महायुतीमधील जागा वाटपाचा झालेला घोळ, विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना नाकारण्यात आलेली उमेदवारी, गावितांच्या नाराजी नंतर त्यांनी भाजपात केलेला प्रवेश यामुळे येथील लढत रंगतदार ठरु लागली आहे. हितेंद्र ठाकूर हे नेहमी सत्ताधारी पक्षाला साथ देतात हा आजवरचा अनुभव. भाजपने त्यांची मनधरणी करण्याचा बराच प्रयत्न केला. पण ठाकूर रिंगणात उतरले आहेत. ठाकूर यांच्यामुळे भाजपचाच फायदा होऊ शकतो, असे गणित मांडले जाते. कारण सरळ लढतीत भाजपच्या विरोधातील एकगठ्ठा मते शिवसेनेकडे गेली असती. ठाकूर यांच्या उमेदवारामुळे ही मते विभागली जातील. तसेच ठाकूर यांचा उमेदवार निवडून आलाच तर त्याचा पाठिंबा भाजपने गृहित धरला आहे.

आणखी वाचा-मतदारसंघाचा आढावा – उत्तर मुंबई, पियूष गोयल यांच्यासमोर मोठे मताधिक्य टिकविण्याचे आव्हान

महाविकास आघाडीने निवडणूका जाहीर होताच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व शिवसेनेच्या भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर केली. त्या आधीच उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन प्रचाराला आरंभ केला होता. पालघर तसेच आसपासच्या परिसरातील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने दिलेला पाठिंबा, मराठी मते ही कामडी यांची जमेची बाजू मानली जाते. याशिवाय वसई विरार मधील खिस्ती आणि मुस्लिम मतांची सहानभूती आपल्याबाजूने वळविण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्यामुळे तलासरी, डहाणू परिसरातील अतिरीक्त साथ यंदा उद्धव गटाला मिळेल अशी या पक्षातील नेत्यांना अपेक्षा आहे. शिवसेना, राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे पक्ष संघटना काही प्रमाणात कमकुवत झाली आहे. अशा परिस्थितीत निवडणूक रिंगणात असणाऱ्या इतर पक्षांविरोधात असलेल्या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडीसाठी वसई, पालघर, विक्रमगड, डहाणू आणि बोईसर हे विधानसभा क्षेत्र अनुकूल असले तरी या भागात हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडीची कामगिरी कशी रहाते यावरही बरेच काही अवलंबून आहे.

महायुतीत घोळ, तरीही मोदींच्या नावे जोगवा

महायुतीचा जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत होता. विद्यमान खासदारांनी दावेदारी सांगितली होती. मात्र महायुतीने गावित यांची उमेदवारी नाकारून निवडणूक अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी जाहीर केली. पाठोपाठ राजेंद्र गावित यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना भाजपा प्रवेश दिला गेला. या गोंधळातून महायुती अजूनही सावरत आहे. त्याशिवाय या दोन्ही पक्षांना अंतर्गत गटबाजीने ग्रासले आहे. अमित शहा यांच्या सभेनंतर हे चित्र बदलेल अशी अपेक्षा भाजपला आहे. डॉ. हेमंत सवरा हे राजकारणात नवखे आहेत. त्यांचे वडील दिवंगत विष्णु सवरा यांच्या कामाची पुण्याई तसेच भाजपाने उभारलेली पक्ष संघटना या पार्श्वभूमीवर विजय संपादन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपासाठी नालासोपारा, डहाणू आणि विक्रमगड या तीन मतदारसंघातील कामगिरी महत्त्वपूर्ण ठरेल अशी शक्यता आहे. या मतदारसंघात मोठया संख्येने असलेल्या उत्तर भारतीय मत एक गठ्ठा मिळावी यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे.

आणखी वाचा-मतदारसंघाचा आढावा : दक्षिण मुंबई, शिंदे गटासाठी उमेदवाराची वादग्रस्त प्रतिमा अडचणीची ठरणार ?

हितेंद्र ठाकूर नेहमीप्रमाणे स्पर्धेत

या मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे सर्वाधिक तीन आमदार आहेत. त्यामुळे ठाकूरांना या मतदारसंघात कमी लेखण्याची चुक कोणताही मोठा पक्ष करत नाही. बहुजन विकास आघाडीने बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचा पहिल्याच दिवशी अर्ज सादर करून प्रचारात वेग घेतला होता. विकास कामे हा मुद्दा घेऊन ते रिंगणात उतरले आहेत. यंदा डावे पक्ष आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत नसल्याने ती मते मिळविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी वसई, नालासोपारा आणि बोईसर या मतदारसंघात बविआचे आमदार आहे. संपूर्ण जिल्ह्यातील २१ लाख मतदारांपैकी ६० टक्के मतदार हे बविआच्या वर्चस्वाखाली असणार्‍या तीन मतदारसंघात आहे. त्यामुळे या मतदारसंघाची मते निर्णायक ठरणार आहेत. बहुजन विकास आघाडीने वाढवण बंदराच्या विरोधातील भूमिका अधिक स्पष्ट केली असून महायुतीच्या विरुद्ध असलेल्या या बंदराशी निगडित मच्छीमार, शेतकरी व भूमिपुत्रांची मत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

मतदारसंघातील काही प्रमुख समस्या

या मतदारसंघातील लाखो रेल्वे प्रवाशांच्या समस्या समस्या, पालघर- त्र्यंबकेश्वर- सिन्नर- घोटी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला अजूनही अपेक्षित वेग मिळाला नसून सागरी महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. मुंबई- बडोदा द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत झालेले गैरप्रकार, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेले पाण्याचे दुर्भिक्ष व त्यामुळे होणारे स्थलांतर, कुपोषण व आरोग्य संदर्भातील समस्या, पारंपारिक मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच बीएसएनएल व डाक विभागाशी संबंधित समस्या प्रलंबित आहे. रोजगाराची मर्यादित उपलब्धता असल्याने शहरी व गुजरात राज्याकडे होणारे स्थलांतर जिल्हा स्थापनेच्या १० वर्षानंतर देखील होत आहेत. शहरी भागात सुसस्ज रुग्णालय नाही, पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही. वाहतूक कोंडी, वाढती अनधिकृत बांधकामे त्यामुळे नागरी सोयीसुविधांवर पडणारा ताण आदी प्रमुख समस्या आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar loksabha constituency review hitendra thakurs party benefits to bjp or thackeray group print politics news mrj
Show comments