संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. तीन आठवडे चालणारे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. यादरम्यान, मुख्य विरोधीपक्ष असलेला काँग्रेस पक्ष बेरोजगारी, महागाई यासारख्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. अशातच सत्ताधारी भाजपासमोर अनेक विधेयकं पारीत करण्याचे आव्हान असणार आहे.

हेही वाचा – Delhi MCD Election Result : अनेक मंत्री- सहा मुख्यमंत्र्यांसह कार्यकर्त्यांची फौज उतरवूनही दिल्लीत भाजप पराभूत

विरोधकांकडून ‘या’ मुद्द्यांवर चर्चेची मागणी

या अधिवेशनादरम्यान काँग्रेस पक्ष बेरोजगारी, महागाईसारख्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. तसेच ईडी- सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा दुरुपयोग, अरुणाचल प्रदेशमध्ये चीकडून करण्यात आलेली घुसखोरी, न्यायव्यवस्थेबरोबर सरकारचा सुरू असलेला संघर्ष, मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, स्वायत्त संस्थांचे पतन यासह अनेक मुद्द्यांवरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात बोलताना, आम्ही निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी असेलले आरक्षण यासंदर्भात चर्चा करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली असल्याची माहिती राज्यसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद सय्यद नसीर हुसेन यांनी दिली.

तृणमूल काँग्रेसनेही बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच पश्चिम बंगाल सरकार अस्थिर करण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केला आहे. सरकारने या मुद्यावरही चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बीजेडीने महिला आरक्षण विधेयक, तर आम आदमी पक्षाने वृद्धांची पेंशन आणि शेतकऱ्यांना धान्यांवर मिळणाऱ्या किमान आधारभूत किंमतीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचा – Himachal Pradesh Election 2022 : अपक्ष उमदेवार ठरणार ‘किंगमेकर’?, भाजपा-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी अटीतटीची लढाई!

”विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चर्चेची तयारी”

दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप, राष्ट्रवादी काँग्रेस यासह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी सरकारकडून अधिवेशनादरम्यान मांडणात येणाऱ्या विधेयकांबाबत माहिती देण्यात आली. तसेच विरोधकांनी या विधेयकांना समर्थन द्यावे, अशी मागणी करण्यात आली. याबरोबच विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेण्यात आली असून संसदेच्या कार्यपद्धीनुसार चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते.

हेही वाचा – Gujarat Election 2022 : …म्हणून गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील एका गावातील मुस्लिमांनी मतदानावर टाकला बहिष्कार

तीन आठवडे चालणार अधिवेशन

संसदेचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू झाले असून हे अधिवेशन तीन आठवडे चालेल. यादरम्यान, २५ विधेयकं पारित करण्याचा भाजपा प्रयत्न आहे. यापैकी सात विधेयकं जुने असून १७ विधेयकं नवीन आहेत. तर एक वित्त विधेयक आहे.

Story img Loader