मुंबई : विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी नाकारून भाजपने पक्षासाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई मतदारसंघात मोदी-शहा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी दिली असली तरी गतवेळचे मताधिक्य राखण्याचे आव्हान गोयल यांच्यासमोर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी हे ४,६५,२४७ एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते. हे मताधिक्य महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे होते. शेट्टी यांना यंदा पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. या वेळी भाजपचे पियूष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत आहे. वरकरणी ही लढत गोयल यांच्यासाठी सहज आणि सोपी वाटत असली तरी भूमिपूत्र विरुद्द उपरा, मराठी-अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा राजकारणात दबदबा नाही. पाटील हे बोरीवलीतील स्थानिक उमेदवार असून गोयल हे या मतदारसंघात ‘ आयात ’ किंवा ‘ पॅराशूट ’ उमेदवार असल्याचा प्रचार पाटील यांनी सुरु केला आहे. गोयल हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवीत असून ते आतापर्यंत राज्यसभेचे खासदार होते. त्यांचा या मतदारसंघाशी काहीच संबंध नसून येथे जनसंपर्कही नाही. या मतदारसंघातील प्रश्नांविषयीही त्यांना फारशी माहिती नाही, असा प्रचार पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा…मतदारसंघ आढावा – दिंडोरी,कांदा प्रश्न कोणाला रडवणार ?

या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमधून बोरीवलीत सुनील राणे, दहिसरमध्ये मनीषा चौधरी, कांदिवलीत अतुल भातखळकर, चारकोपमधून योगेश सागर हे भाजपचे आमदार असून मागाठाणेतील प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आहेत. मालाड (प.) चे आमदार अस्लम शेख हे काँग्रेसचे आमदार असून या मतदारसंघातून पाटील यांना मताधिक्य मिळण्याची अपेक्षा आहे. उत्तरमुंबईत संमिश्र लोकवस्ती असून मराठी मतदारांबरोबरच गुजराती, उत्तर भारतीय, कोळी आदींचे प्रमाण मोठे असून सुमारे दीड लाख मुस्लिम व सुमारे ५० हजार ख्रिश्चनही आहेत. गेल्या निवडणुकीत सुमारे ९ लाख ८८ हजार मतदान झाले होते आणि शेट्टी यांना सात लाख पाच हजार तर काँग्रेसच्या उमेदवार सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना केवळ २ लाख ४१ हजार मते पडली होती. यंदा उद्धव ठाकरे गट काँग्रेसबरोबर सक्रिय असून आप, कम्युनिस्ट पक्ष व अन्य पक्षांमुळे पाटील यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पाटील हे स्थानिक नेते असल्याने त्यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून कोळीवाडे, झोपडपट्ट्यांसह मुस्लिम, दलित आणि मराठी-गुजराती भाषिकांमध्येही त्यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. त्यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली असली तरी स्थानिक विषयांची जाण व जनसंपर्क याबरोबरच ठाकरे गटाकडून त्यांच्या प्रचारात करण्यात येत असलेली मदत आणि मुस्लिम-खिश्चनांची मते यावर त्यांची मदार आहे.

गोयल यांची उमेदवारी एक-दीड महिन्यांपूर्वी जाहीर झाल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेऊन मतदारसंघ पिंजून काढला आहे. भाजप-शिवसेनेकडे (शिंदे) असलेले पाच आमदार, त्यांचा जनसंपर्क, केंद्र-राज्य सरकारची कामे, मतदारसंघातील भाजपची संघटनात्मक ताकद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार (कमिटेड व्होटर) ही गोयल यांची मोठी जमेची बाजू आहे. गोयल हे मतदारसंघ पिंजून काढत असून त्यांना विविध व्यापारी संघटना, दुकानदार, संस्था आणि सर्वसामान्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचारफेऱ्यांनाही उदंड प्रतिसाद आहे. खासदार गोपाळ शेट्टी हेही गोयल यांच्यासाठी जोमाने प्रचारात उतरले आहेत.

हेही वाचा…पंजाबमधील शेतकऱ्यांचा भाजपाला विरोध; प्रचारफेरी विरोधात निदर्शने आणि काळे झेंडे!

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात २००४ मध्ये काँग्रेसचे उमेदवार व चित्रपट अभिनेते गोविंदा यांनी राम नाईक यांचा पराभव केला होता. तर २००९ मध्ये संजय निरुपम या मतदारसंघातून निवडून आले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये गोपाळ शेट्टी हे निवडून आले आहेत. २०१४ व १९ मध्ये जशी लाट होती, तशी लाट यंदा नाही. त्यामुळे शेट्टी यांना गेल्या निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड मताधिक्याएवढे मताधिक्य पुन्हा मिळविणे, गोयल यांच्यासाठी खूप अवघड आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Piyush goyal faces the challenge of maintaining a large majority of votes in north mumbai print politics news psg
Show comments