सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर: ‘इंडिया’ आघाडीत येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून ‘प्रस्ताव’च येत नाही. ॲड्. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेले पत्र समाजमाध्यमांमध्ये वाचले. पण अशी खूप पत्रे आली आहेत. वंचित बहुजन आघाडीला नक्की काय हवे आहे, याचा प्रस्ताव काही आलेला नाही, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित आघाडीला हाताच्या अंतरावर ठेवण्याची राजकीय प्रक्रिया मागील पानावरुन पुढे चालू ठेवली आहे.

दलित मतांच्या मतपेढीसाठी काँग्रेसचे एक पाऊल पुढे, एक मागे असेच धाेरण दिसत आहे. तर हातमिळवणी करूनही शिवसेना आणि वंचित आघाडीची बोलणी पुढे सरकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. विभागीय बैठका घेत काँग्रेसने काही प्रादेशिक प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र राजकीय पटलावर दिसू लागले आहे.

आणखी वाचा-आक्षेपार्ह विधान प्रकरण : विशेषाधिकार समितीसमोर हजर राहण्याचा आदेश, रमेश बिधुरी मात्र राजस्थानच्या दौऱ्यावर

मराठवाडा एकेकाळी काँग्रेसचा गड होता. शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण हे चार मुख्यमंत्री मराठवाड्याने दिले. त्यामुळे अनेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. आता मात्र ते केवळ लातूर, नांदेड या जिल्ह्यांपुरते मर्यादित झाले आहे. जालना शहरातून निवडून येणारे कैलास गोरंट्याल वगळता काँग्रेसचे प्रभावक्षेत्र असणारे मतदारसंघ बोटावर मोजता येतील, अशी सध्याची अवस्था आहे. लातूर ग्रामीणमधून निवडून आलेले धीरज देशमुख हे काँग्रेस पक्षाच्या मोठ्या कार्यक्रमांनाही हजर नसतात. विधान परिषदेवरचे राजेश राठोड, कळमनुरीच्या प्रज्ञा सातव ही मंडळीही संघटनात्मक बैठकांना गैरहजरच असतात. राजेश राठोड हे बंजारा समाजाचे प्रश्न मांडतात, पण ते माध्यमांमध्ये पोहोचत नाहीत.

काँग्रेसचे बहुतांश नेते आपापल्या मतदारसंघात अडकलेले आहेत. मतदारसंघ बांधणी करताना सामाजिक सलोखा निर्माण करणारे नेतृत्व काँग्रेसमध्ये दिसून येत नाही. विशेषत: दलित, भटक्या समूहाचे नेतृत्व तयार होऊ शकले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे सहकार्य मिळविण्याकडे काँग्रेसचा कल असतो. त्यामुळे वाटाघाटीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ‘बोलणी सुरू आहे’ असा सूर आळवला जातो. मराठवाड्यात काँग्रेसचा प्रभाव असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला एक लाख ६६ हजार १९९ मते मिळाली होती. वंचित बहुजनची ही मते आपल्या बाजूने वळावित असे प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात येत आहेत का, याविषयी साशंकता व्यक्त होत आहेत. पण मुंबई महापालिकेच्या हद्दीपर्यंत ही बोलणी तरी सुरू आहे. महाविकास आघाडीतील तुलनेने ‘कट्टर‘ ठरविल्या गेलेल्या उद्धव ठाकरे गटाशी चर्चा सुरू असताना काँग्रेसला मात्र अद्यापि वंचितबरोबर आपली बोलणी सुरू करता आलेली नाही.

आणखी वाचा-बसपाचे नवे ‘सोशल इंजिनिअरिंग’; मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये दलित-आदिवासींची मोट बांधणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयप्रकाश दांडेगावकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलावे असे ठरविण्यात आले होते. परभणी जिल्ह्यातील हरिभाऊ शेळके, जयप्रकाश दांडेगावकर आणि ॲड. प्रकाश आंबेडकर अशी एक बैठकही नुकतीच घेण्यात आली आहे. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसच्या कोणत्याही मोठ्या नेत्याचा सहभाग नव्हता. मात्र, हरिभाऊ शेळके आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यामध्ये चांगले संबंध असल्याने सुरू असणाऱ्या हालचाली काँग्रेसच्या बाजूनेही सकारात्मक होऊ शकतील, असे सांगण्यात येत आहेत. प्रत्यक्षात काँग्रेस वंचितपासून हाताचे अंतर ठेवून वागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Policy of congress is to keep the vanchit bahujan aghadi at distance print politics news mrj
Show comments