नाशिक – इगतपुरी विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये काँग्रेसला सक्षम उमेदवार सापडत नव्हता. अखेरच्या क्षणी शरद पवार यांनी हिरामण खोसकर यांना एकसंघ राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये पाठविले. लगोलग त्यांना उमेदवारी मिळून ते विजयीही झाले. आमदार बनलेल्या खोसकरांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह अनेकांशी जमले नाही. विधान परिषद निवडणुकीत मतांच्या फाटाफुटीमुळे खोसकर संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचे पक्षांतर अटळ होते. स्वगृही परतताना त्यांनी मात्र ज्या शरद पवारांमुळे ते आमदार झाले, त्यांच्याऐवजी राष्ट्रवादी अजित पवार गटाची निवड केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खोसकर यांनी पक्षांतरासाठी सर्वच पक्षांमध्ये चाचपणी केली. शिवसेना (शिंदे), भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. अगदी अलीकडे शरद पवार यांचीही भेट घेतली होती. शेवटी त्यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला. पांढरा सदरा, पायजमा, गांधी टोपी अशा ग्रामीण पेहरावात वावरणारे खोसकर हे आमदारकीच्या पाच वर्षांत विविध कारणांनी चर्चेत राहिले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसच्या तत्कालीन आमदार निर्मला गावित यांनी एकसंघ शिवसेनेत प्रवेश केला होता. या जागेवर काँग्रेसला योग्य उमेदवार मिळत नसताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या खोसकरांना काँग्रेसमध्ये पाठवून उमेदवारी मिळवून दिली होती. खोसकरांनी शिवसेनेच्या निर्मला गावित यांना ३६ हजार मतांनी पराभूत केले होते.

हेही वाचा – राजेश टोपे यांना शिवसेनेचे आव्हान

कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसणारे खोसकर अल्पावधीत मुरब्बी राजकारणी बनले. पंचायत समितीत ते अपक्ष निवडून आले होते. नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. जिल्हा परिषद सदस्य, समाजकल्याण सभापती पद भूषवले. याच काळात आमदारकीची लॉटरी लागली. खोसकर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले असले तरी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना आपलाच आमदार मानायचे. मुळचे राष्ट्रवादीचे असल्याने खोसकरांना वावगे वाटायचे नाही.

खोसकर संशयाच्या भोवऱ्यात सापडले ते विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्यामुळे. महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाल्याने पक्षाचा आदेश झुगारुन दुसऱ्यांना मतदान करणाऱ्या आमदारांवर कारवाईचे संकेत नाना पटोलेंनी दिल्यानंतर खोसकरांनी थेट त्यांना सुनावले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पाच वर्षांत आमदारांची साधी बैठक घेतली नाही. केवळ निवडणूक आली की, बोलवायचे आणि नंतर वाऱ्यावर साोडून द्यायचे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचे तत्कालीन आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी कोट्यवधी रुपये घेऊनही कामे मंजूर केली नाही आणि पैसेही परत दिले नसल्याचा आरोप खोसकर यांनी केला होता. यामुळे काँग्रेसकडून तिकिटाची शक्यता दुरापास्त झालेली होती. आपण चूक केल्यामुळे पक्ष तिकीट देणार नाही, ही त्यांना भीती होती. त्यामुळे खोसकरांनी पक्षांतर केल्याकडे काँग्रेसकडून लक्ष वेधले जात आहे.

हेही वाचा – प्रकाश सोळंकेंच्या माजलगावमध्ये ‘तुतारी’ चा आवाज वाढला

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे. अलीकडच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधाऱ्यांच्या भेटी घेऊन खोसकरांनी स्वत:च्या पक्षांतराची चर्चा होईल, याची काळजी घेतली. महायुतीत इगतपुरी-त्र्यंबकेश्वरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळेल, याची खात्री झाल्यानंतर ते स्वगृही परतल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांच्याकडे जाताना त्यांनी मराठा समाजातील स्थानिक नेत्यांनाही बरोबर घेत बेरजेचे राजकारण करण्यावर भर दिला. शरद पवार यांच्या शब्दावर काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळाले होते. त्याच खोसकरांनी दुभंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्याऐवजी अजित पवार गटात जाणे पसंत केले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political journey of mla hiraman khoskar from pawar to pawar print politics news ssb