लक्ष्मण राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जालना : काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांचा विरोध असतानाही जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर प्रतिक्रिया उमटू लागली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या आग्रहाखातर महानगरपालिका स्थापन करण्यात येत असून महापालिका स्थापण्याच्या निर्णयावर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी ८ जूनपर्यंत मुदत असली तरी काँग्रेसने या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (शिंदे) यांनी नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना १० ऑक्टोबर २०२२ रोजी दिले आणि त्यानंतर यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिवांना दिले होते. या प्रस्तावानुसार जालना महानगरपालिकेच्या हद्दीतील सध्याची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा अधिक म्हणजे ३ लाख ४० हजार आहे. त्यामुळे कोणतीही हद्दवाढ केल्याशिवाय नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत लोकसंख्येच्या निकषानुसार होऊ शकते. महापालिका झाल्यावर नगरपालिकेतील सध्याची मंजूर पदे ४०५ वरून ६०० होतील. राजपत्रित दर्जाचा आयुक्त, ‘ब’ श्रेणीतील नऊ अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त पदांचा समावेश त्यामध्ये असेल.

हेही वाचा… उदगीरमध्ये पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपचा प्रयत्न

महापालिका स्थापनेनंतर सध्या नगरपालिकेस मिळणारे सहाय्यक अनुदान पाच वर्षे सुरू ठेवावे, जीएसटीमधून अनुदान देताना प्रतिपूर्ती अनुदानासाठी २०१६ हे वर्ष आधारभूत गृहीत धरावे, अशी सूचना या संदर्भातील प्रस्तावात करण्यात आलेली आहे. सध्या नगरपालिकेस मिळणारे जकात अनुदान ३ कोटी ७० लाख रुपयांऐवजी जवळपास सात कोटी रुपये मिळेल, असे प्रस्तावात म्हटले आहे.

हेही वाचा… नांदेडमधील दोन ‘राज’कन्या कोण ?

महापालिकेचे समर्थन करताना अर्जुन खोतकर यांनी सध्याची नगरपालिका वाढत्या शहराच्या मुलभूत सुविधा पूर्ण करण्यास असल्याचे म्हटले आहे. जालना शहरातील जीएसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्या आधारित मिळणारे अनुदानही मोठे असेल. सध्या मिळणाऱ्या जकात अनुदानापेक्षा जीएसटीचे प्रतिपूर्ती अनुदान जवळपास दुप्पट असणारे आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेत पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता, रस्ते, इत्यादी विभागांसाठी प्रमुख म्हणून राज्य शासनाचे अधिकारी असतील. कररचनेमध्ये फारसा फरक पड़णार नाही. नागरिकांना मुलभूत सुविधा अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतील. २०२१ ची जनगणना जरी झालेली नसली तरी २०११ मधील शहराच्या दोन लाख ८५ हजार लोकसंख्येत आता भर पडली आहे. या आधारावर शासनाच्या विविध गणितीय सूत्रानुसार सध्या शहराची लोकसंख्या ३ लाख ४० हजार १८२ आहे. त्यामुळे जालना शहर महानगरपालिकेसाठी पात्र आहे, असे खोतकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… महाविकास आघाडीत दबावतंत्राचा खेळ!

मावळते नगराध्यक्षपद काँग्रेसकडे होते आणि ही निवडणूक थेट जनतेमधून झाली होती. स्थानिक आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रस्तावित महानगरपालिकेच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महानगरपालिकेच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रस्तावातील काही आकड्यांबाबतही त्यांनी काही आक्षेप घेतले असून ते बिनचूक नसल्याचे म्हटले आहे. ‘ड’ वर्ग महापालिका होणार असल्याने आयुक्तपदी आयएएस अधिकारी येणार नाही, महापालिका झाल्यावर शिक्षकांच्या सध्याच्या २० टक्केऐवजी ५० टक्के वाटा द्यावा लागेल, करांची फेररचना होईल, कारभार चालविण्यासाठी जीएसटीमधून मिळणारे अनुदान प्रशासन चालविण्यासाठी आणि मुलभूत सुविधांसाठी आवश्यकतेपेक्षा कमी पडेल, इत्यादी आक्षेप गोरंट्याल यांचे आहेत. सध्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जनतेतून होते आणि ते पक्षासाठी अनुकूल असल्याने आमच्या राजकीय विरोधकांनी महापालिकेचा घाट घातल्याचा रोपही त्यांनी केला.

हेही वाचा… जयदत्त क्षीरसागर यांची राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने ?

रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी मात्र नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत करण्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. या प्रस्तावाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले आहे. या निर्णयाची आवश्यकता होती असे त्यांनी म्हटले आहे. माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे, लोकसंख्येचा निकष पाहता जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत होणे क्रमप्राप्तच आहे. प्रस्तावित महापालिकेत सध्याचेच जवळपास ४०० कर्मचारी असतील आणि काही पदे नव्याने भरले जातील.

काँग्रेसचे जालना शहर अध्यक्ष शेख महेमूद यांनी महापालिकेत रूपांतर करण्यामागे शिवसेना (शिंदे) आणि भाजपच्या नेत्यांचे राजकारण असल्याचा थेट आरोप केला आहे. जालना शहरातील मतदारांची मानसिकता पाहता थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला टिकाव लागणार नाही, याची जाणीव विरोधकांना आहे. त्यामुळेच त्यांनी महानगरपालिकेचा प्रस्ताव आणला आहे. परंतु जरी महापालिका झाली तरी नगरसेवकांतूनही महाविकास आघाडीचा महापौर होईल, असा विश्वास शेख महेमूद यांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics in full swing between congress and shinde group over jalna municipal corporation issue print politics news asj
Show comments