Bollywood Movies and Election भारतीय लोकांच्या जीवनात चित्रपटांचा प्रभाव अधिक आहे. चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर आधारित असतात, काही चित्रपटांतील विषयांचा परिणाम समाजमनावर होताना दिसतो. गेल्या काळात अनेक राजकीय विषयांवर आधारित चित्रपट, वेब मालिका प्रदर्शित झाल्या आहेत; ज्याने संबंधित विषयाला पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोण बदलला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर खोर्‍याला पहिल्यांदा भेट दिली. या भेटीत पंतप्रधानांनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, मला माहित नाही हा चित्रपट नक्की काय आहे? या चित्रपटाबद्दल काल ​​मी टीव्हीवर ऐकले की, कलम ३७० वर एक चित्रपट येत आहे. ही चांगली गोष्ट आहे, कारण लोकांना योग्य माहिती मिळण्यासाठी याचा उपयोग होईल.”

२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रदर्शित झालेले चित्रपट

२०१९ मध्येही भारत सरकारने पाकिस्तानच्या भूमीवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक वर आधारित ‘उरी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. २०१९ च्या निवडणुक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी मुंबईतील भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करताना, या चित्रपटाचा उल्लेख करत, हाउझ द जोश? असे जमावाला विचारले होते.

‘उरी’ आणि ‘३७०’ या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्री यामी गौतमची भूमिका आहे. तर चित्रपट निर्माते धर, यांनी २०१९ मध्ये ‘उरी’चे दिग्दर्शन आणि ‘कलम ३७०’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. २०१९ मध्ये ‘उरी’ चित्रपटाव्यतिरिक्त राजकीय विषयांवर आधारित इतर चित्रपटदेखील प्रदर्शित झाले. यात भारताच्या मार्स ऑर्बिटर मिशनमागील इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘मिशन मंगल’, मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळावर केंद्रीत ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ सारख्या चित्रपटांचा समावेश होता.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय संदेशावर आधारित चित्रपट

पाच वर्षानंतर बॉलीवूड पुन्हा लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय संदेशावर आधारित चित्रपट तयार करत असल्याचे निदर्शनात येत आहे. नक्षलवादावर आधारित ‘बस्तर: एक नक्षल कथा’ चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नक्षलवादी चळवळीत १५,००० नागरिक आणि ७४ सुरक्षा कर्मचारी मारले गेल्याचा उल्लेख आहे. या हत्या झाल्यानंतर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी उत्सव साजरा केल्याचेही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. जेएनयूच्या काही विद्यार्थ्यांनी चित्रपटाच्या टीमवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘बस्तर: एक नक्षल कथा’ चित्रपटासह वीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेते रनदीप हुड्डा मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील त्यांनीच केले आहे. गेल्या वर्षी ‘गांधी गोडसे – एक युद्ध’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता.

२०२३ मध्ये ‘द व्हॅक्सिन वॉर’ ही वेब मालिका प्रदर्शित झाली; ज्याचे दिग्दर्शन ‘द काश्मीर फाइल्स’ चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले. या वेब मालिकेत कोव्हिड संकट काळात स्वदेशी लस आणण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांची कहाणी दाखवण्यात आली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ चित्रपटदेखील प्रदर्शित झाला. यात गोध्रा कांड आणि १९७५ पासून इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारचे कार्य, आणीबाणी सारखे विषय दाखवण्यात आले आहेत. अभिनेत्री कंगना राणौतने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

‘बस्तर: नक्षल कथा’ हा चित्रपट गाजलेल्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या टीमनेच तयार केला आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपट इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर आयसिस कॅम्पमध्ये बंदिवान केलेल्या केरळमधील ३२ हजार तरुणींच्या सत्यकथेवर आधारित असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले होते. तेव्हा केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी टीका करत, या चित्रपटात राज्याला धार्मिक उग्रवादाचे केंद्र म्हणून दाखवण्यात आल्याचा आरोप केला होता. दोन्ही चित्रपटांचे निर्माते विपुल अमृत शाह म्हणतात, ‘बस्तर: एक नक्षल कथा’ चित्रपट २००७-२०१३ दरम्यान घडलेल्या घटनांच्या पुराव्यावर आधारित आहे. नक्षलवाद्यांची संख्या वाढत चालली आहे आणि शहरांमध्ये हा धोका पसरतो आहे, असे अलीकडील अहवालातून समोर आले आहे, ” असे त्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले. चित्रपटातील जेएनयू उललेखाबद्दल विचारले असता शाह म्हणाले, “जेएनयूमध्ये एक मजबूत गट सक्रिय आहे हे नाकारता येत नाही. हा चित्रपट सरकार समर्थक नाही, तर भारत समर्थक आहे.”

३७० चे निर्माते धर यांनी यापूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले होते की, ‘कलम ३७०’ मध्ये दोन महिला मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट महिला सक्षमीकरण आणि एका शुद्ध कथानकावर आधारित आहे.

मोठ्या पडद्यावर राजकीय युद्ध

दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या पडद्यावर राजकीय युद्ध रंगताना दिसत आहे. ८ फेब्रुवारी रोजी ‘यात्रा २’ चित्रपट प्रदर्शित झाला. यात काँग्रेसचे दिवंगत नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या १५०० किमीच्या पदयात्रेला आणि यात्रेमुळे २००४ मध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयाला दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा : काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पत्नीविरोधात ईडीची मोठी कारवाई; कोण आहेत लुईस?

या चित्रपटात विद्यमान मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या राजकीय कारकीर्दीवर आणि त्यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या अपघाती मृत्यूवर प्रकाश टाकण्यात आला आहे. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळताच, अनेकांनी हा मृत्यू नसून आत्महत्या किंवा खून असल्याचे सांगितले. अशांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी, जगन मोहन रेड्डी यांनी ‘ओदारू’ यात्रा काढली होती. ही यात्रादेखील चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि तेलुगु देसम पार्टीचे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू यांनी ही यात्रा थांबवण्याचा कथित प्रयत्न केल्याचेही चित्रपटात दाखवण्यात आले. मध्य प्रदेशमध्ये यांसारखे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहे, ज्यामुळे राजकारण तापले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics oriented movie for upcoming election their impact on voters rac
Show comments