छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४६ मतदारसंघापैकी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने लढवलेल्या २६ जागांवर छत्तीसगडमधून कुमक मागविण्यात आली असली तरी अजित पवार यांच्याबरोबरच्या युतीमुळे या वेळी भाजपला पाच जागाचे जागा कमी लढाव्या लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जागा वाटपात अहमदपूर, माजलगाव, आष्टी, उदगीर, परळी या मतदारसंघात भाजप ऐवजी अजित पवार गटांचा दावा असेल. त्यामुळे या जागांवर भाजपचा दावा कमी होईल. या ऐवजी काही जागांची अदलाबदल होऊन लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजप नव्याने दावा करू शकेल, असे सांगण्यात येत आहे. उमेदवारी न मिळाल्याने निवडणूक लढविण्यास इच्छूक असणारे रात्रीतून पक्ष बदलतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदगीर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत होऊन संजय बनसोडे विजयी झाले. आता ही जागा भाजप मागता येणार नाही. त्यामुळे भाजपातील नेते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात दाखल झाले आहेत. यामध्ये सुधाकर भालेराव यांचा समावेश आहे तर गेल्या वेळी भाजपचे उमेदवार अनिल कांबळे यांनीही शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. माजलगाव मतदारसंघात प्रकाश सोळंके यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार रमेश आडसकर यांना संधी कशी मिळेल, असा प्रश्न आहे.

आणखी वाचा-TMC : कोलकाता बलात्कार प्रकरणावरून ममता बॅनर्जी गटाचे खासदार अभिषेक बॅनर्जींशी मतभेद? पक्षात दोन गटांची वेगळी मतं!

अहमदपूरमध्येही अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे आमदार विनायकराव पाटील यांनी आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश घेतला आहे. विनायकराव पाटील हे गेल्या निवडणुमध्ये भाजपचे उमेदवार होते. आष्टीमध्ये भाजपचे सुरेश धस, भीमराव धोंडे यांचा उमेदवारी दावा असला तरी आमदार बाळासाहेब आसबे यांना डावलून महायुतीमध्ये अजित पवार यांचा शब्द या मतदारसंघात अंतिम मानला जाईल का, असाही प्रश्न प्रश्न उपस्थित केला जात आहे.

परळी येथील जागेवर धनंजय मुंडे यांचे उमेदवार नक्की असल्याने या मतदारसंघात कमळ नसेल हे आता स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील या पाच जागांऐवजी भाजप अन्य कोणत्या जागांवर दावा करेल, हे अद्यापि ठरलेले नाही. जागा वाटपाचे सूत्र लवकरच ठरवले जाईल असे भाजप प्रदेशाध्यक्षांनी नुकतेच जाहीर केल्यानंतर तिढ्यातील जागा अजित पवार गटाबरोबर अधिक असतील, असे चित्र दिसून येत आहे.

आणखी वाचा-Ajit Pawar: ‘महायुतीत असलो तरी…’, जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार यांनी मांडली रोखठोक भूमिका

दरम्यान काही शिवसेना शिंदे गटाच्या जागांवर भाजप दावा करेल असे चित्र आहे. यामध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुंबईचा एक उमेदवार उभा करून ही जागा आमदार धीरज देशमुख यांचा विजय व्हावा, अशाच पद्धतीने लढवली होती. परिणामी या मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक ‘ नोटा ’ मते नोंदली गेली होती. या मतदारसंघातून रमेशअप्पा कराड हे भाजपकडून उमेदवारीसाठी दावा करत असल्याने ही जागा भाजप घेईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यामुळे मराठवाड्यात भाजपची लढत असणाऱ्या जागांची संख्या २६ असेल की त्यापेक्षा ते कमी जागांवर लढतील, याचे औत्सुक्य वाढले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possibilities of bjp lose five seats in marathwada because of ajit pawar ncp print politics news mrj
Show comments