मुंबई : महिलांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाशिवाय देशाचा संपूर्ण विकास अशक्य आहे. महिलांकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलायला हवा. महिलांना संधी द्या, सहकार्य करा. आज महिला चालत आहेत, पुढे जाऊन त्या धावतील आणि उंच उडी घेत देशाची सेवा करतील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी राष्ट्रकूल संसदीय मंडळ- महाराष्ट्र शाखेतर्फे २०१८ ते २०२४ या सहा वर्षातील ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांनी दोन्ही सभागृहातील ५३ आजी-माजी आमदारांनाचा मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी झालेल्या या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम र्गो़हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.

हेही वाचा >>>कारण राजकारण: विश्वासार्हता, आमदारकी टिकवण्याचे जयकुमार गोरे यांच्यापुढे आव्हान

‘बहुत असोत सुंदर, सम्पन्न की महा, प्रिय अमुचा एक, महाराष्ट्र देश हा’, या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या कविताच्या ओळींनी मुर्मू यांनी आपल्या भाषणास प्रारंभ केला. महाराष्ट्र विधिमंडळाच्या स्थापनेच्या इतिहासाचा धावता आढावा मुर्मू यांनी आपल्या भाषणात घेतला. १०३ वर्षे झालेल्या महाराष्ट्राच्या कायदेमंडळाने राज्यातील नागरिकांच्या आशा-आकांक्षांना अभिव्यक्त केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कायदेमंडळाचे सदस्य होते. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ या कायदेमंडळाला होणे हे सौभाग्य आहे. आपल्या विधान परिषदेचे सभापती वि. स. पागे यांनी ‘मनरेगा’ योजना आणली. महाराष्ट्राच्या समृद्ध विधानपरिषदेने लोकशाही परंपरांना समृद्ध केले आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

हेही वाचा >>>निवडणुकीसाठी राज्यात संघ ‘दक्ष’; मुख्यमंत्रीपद भाजपला मिळविण्याचा निर्धार; प्रत्येक मतदारसंघात भाजप-संघ समन्वयक

महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलणे, त्यात सुधारणा करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर महिलांविषयीचा योग्य दृष्टिकोन विकसित होईल. राजमाता जिजाबाईंची ही भूमी आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिला शिक्षणाचा पाया घातला गेला. महिलांना भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा थांबायलाच हव्यात. महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभा पाटील या मराठी महिलेकडे जातो. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक, मुख्य सचिव, उपसभापती या महिला आहेत. महाराष्ट्राच्या मुली देश आणि राज्याचा गौरव वाढवतील, असा विश्वासही मुर्मू यांनी व्यक्त केला.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा संदर्भ देत ‘महाराज आमच्या हृदयात आहेत’ असे नमूद केले. मतदारसंघातील कामांसाठी आमदार रात्रंदिवस झटत असतात, या पुरस्काराने त्यांच्या कामाचे कौतुक झाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नीलम गोऱ्हे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ‘विधान परिषदेची आवश्यकता आणि महत्त्व’ या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी मुुुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President draupadi murmu appeal to change the attitude towards women print politic news amy