दयानंद लिपारे

शिक्षण, चळवळ, सांस्कृतिक उपक्रम व राजकारण ही प्रा. सुनील शिंत्रे यांच्या कार्यशैलीची चतुःसूत्री. दोन वेळेच्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव असलेले शिंत्रे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील उच्चशिक्षित, धडाडीचे, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून राजकीय पटलावर विकसित होत आहेत.

आजरा तालुक्यात शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या शिंत्रे यांनी कष्टप्रद स्थितीत एम. एससी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक पदावर रुजू झाले. नोकरीत स्थिरावल्यानंतर मनात सुप्तपणे वसलेल्या राजकारण, समाजकारण करण्याच्या विचाराने उचल घेतली. त्या काळात तरुणाईवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचे गारुड होते. शिंत्रे या विचाराने भारावले. नोकरी करीत असल्याने उघडपणे राजकारण करता येणे शक्य नसल्याने मनाचा कोंडमारा सुरू झाला. नोकरीला रामराम ठोकून राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा विचार पक्का झाला.

हेही वाचा: नितीन कुंभलकर : उत्तम नियोजनकार

याचवेळी एका शिक्षण संस्थेची स्थापना करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. सचिव या नात्याने त्यासाठी अपार कष्ट उपसले. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मॅरेथॉन, फुटबॉल, कबड्डी स्पर्धा, झिम्मा फुगडी, नाट्यमहोत्सव, विद्यार्थी -शिक्षक गुणगौरव, गरीब विद्यार्थी दत्तक योजना अशा उपक्रमांनी त्यांना झपाटून टाकले. गडहिंग्लज सारख्या ठिकाणी आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्याचा विषय कौतुकाचा ठरला. गडहिंग्लज रोटरी क्लबचे अध्यक्ष, युनायटेड फुटबॉल क्लबचे अध्यक्ष या पदांवर त्यांनी काम केले.
एकीकडे शिक्षण संस्थेची स्थापना आणि दुसरीकडे शिवसेनेचा विचार रुजवण्यासाठी निर्धारपूर्वक, नियोजनबद्ध काम अशा दुहेरी पातळीवरची वाटचाल सुरू झाली.

गावागावात शिवसेनेच्या शाखा सुरू करण्याचा धडक कार्यक्रम राबवून शिवसैनिकांशी जवळीकतेचे नाते निर्माण केले. दोन वेळच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला; पण यानिमित्ताने गावगाड्यातील प्रश्नांची अत्यंत बारकाईने जाणीव झाली. चंदगड शिवसेना संपर्क प्रमुख असलेले शिंत्रे हे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ सदस्य होते. तालुका, परिसरातील रेंगाळलेले पाटबंधारे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लढा उभारला. पाणी परिषदेचे आयोजन केले. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे सूत्र राबवण्यासाठी तडफेने काम केले. तलाव पुनर्भरणाच्या योजना हाती घेऊन मार्गी लावल्या. आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात सांस्कृतिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पहिले वारकरी संमेलन नुकतेच यशस्वी केले.

हेही वाचा: गिरीश फोंडे – सामान्यांसाठी संघर्ष

अलीकडेच त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आली आहे ती म्हणजे कधी बंद कधी सुरू असणाऱ्या आजरा तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद. कारखान्यावर कर्जाचा मोठा बोजा असल्याने शासकीय, वित्तीय संस्था कर्ज देण्यास तयार नव्हत्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत प्रश्नाचा पाठपुरावा केला. कोठेच मार्ग दिसत नव्हता. सहकार क्षेत्राचा अनुभव नव्हता तरीही संचालकांची चर्चा करून अर्थसहाय उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याचवेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार्याचा मोलाचा हात दिल्याने आर्थिक कोंडी फुटू शकली.

हेही वाचा: सोलापूरात आमदारकीसाठी काही पण….

अध्यक्ष म्हणून कारखान्यासमोरील आर्थिक आव्हाने दूर करताना त्यांनी मुत्सद्दीपणाने केलेले एक काम मैलाचा दगड ठरले. कारखान्यातील कामगारांना पूर्ण पगार देणे शक्य नव्हते. त्यांची बैठक घेऊन चर्चा केली. बिकट आर्थिक आव्हाने समजावून सांगितली. कामगारांनी अर्ध्या पगारावर काम करण्यास मान्यता दिली. साखर कारखानदारीतील हे विरळा उदाहरण ठरले. समाजाचे जिथे भले तिथे आपण ही भूमिका घेत प्रा. सुनील शिंत्रे यांनी दुर्गम भागातील सामाजिक, राजकीय वाट तुडवायला सुरुवात केली आहे.

Story img Loader