कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या यशात संविधान बदलण्याचा मुद्दा परिणामकारक ठरला होता. हाच मुद्दा पुन्हा विधानसभा निवडणुकीत वापरण्याची रणनीती काँग्रेस पक्षाची दिसत आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्यात शनिवारी संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा एकदा मतदारांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न होत आहे. याच वेळी महायुतीकडूनही संविधानातील बदल हा खोटा प्रचार असल्याचा मुद्दा पटवून द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात संविधानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान हा मुद्दा प्रचारात प्रचाराचा केंद्रबिंदू राहिला होता. संविधान बदलण्यासाठी लोकसभेत ४०० जागांची आवश्यकता आहे. अशा पद्धतीची मांडणी हिंदुत्ववादी समाज समूहामध्ये प्रभावीपणे मांडली जात होती. आम्हाला पुढच्या सरकारमध्ये काही मोठे निर्णय घ्यायचे आहेत. यासाठी आम्हाला मजबूत बहुमत हवे आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी या विधानाचा अर्थ काँग्रेस आणि विरोधकांनी संविधानात बदल करण्यासाठीच त्यांना बहुमत हवे आहे, अशा प्रकारे लावला होता. हा राज्यघटनेवर हल्ला असल्याची हाकाटी पिटत विरोधकांनी वातावरण निर्मिती केली. भाजपाकडे पाशवी बहुमत आले तर संविधान बदलले जाईल हा मुद्दा त्यांनी मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. याचा मतदारांवरही परिणाम झाला. विशेषतः मागासवर्गीय मतदार काँग्रेसच्या बाजूने ठामपणे राहिल्याचे मतदानानंतर दिसून आले.

हेही वाचा >>>मीरा भाईंदरमध्ये राजकारण्यांची धार्मिक चढाओढ

सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीनंतर हा मुद्दा मान्य करावा लागला. संविधान बदलाच्या चर्चेचा निवडणूक प्रचारात महायुतीला फटका बसल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जाहीरपणे कबूल केले होते. लोकसभा निवडणुकीनंतरही काँग्रेसने संविधानाला ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने संविधान सन्मान संमेलनावर भर देत हा मुद्दा तापवण्यावर भर दिल्याचे दिसते. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशभरातील अशा संमेलनाला आवर्जून उपस्थित राहून देशभरात तीन लाखाहून अधिक संविधान रक्षक कार्यरत ठेवण्याचा इरादा व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी समानता, स्वतंत्रता, बंधुत्व व न्याय या मूलभूत मुद्द्यांचे रक्षण करण्यासाठी संविधान संमेलन अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा >>>अर्चना पाटील चाकूरकरांच्या विरोधात लातूर शहर भाजपातील कार्यकर्त्यांची एकजूट

संविधानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना काँग्रेस संविधानाच्या मुद्द्याला उचलून धरत आहे. नाशिक येथे झालेल्या काँग्रेस निवडणूक आढावा बैठकीवेळी राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथलला यांनी लोकसभेला ४०० जागा जिंकल्या असत्या तर संविधान बदलले असते; परंतु, अजूनही धोका टळलेला नाही, असे म्हणत या मुद्द्याची धग कायम असल्याचे अधोरेखित केले होते. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन काँग्रेसचे परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी केले आहे. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होत आहेत. देश आणि राज्यातून आलेल्या प्रतिनिधींसमोर पुन्हा एकदा संविधान सन्मान संमेलनात पुन्हा एकदा संविधानाचा मुद्दा मांडण्यावर गांधी यांचा भर असणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूकही संविधान बदलाचा मुद्द्याचा राजकीय लाभ उठवण्याची काँग्रेसची रणनीती दिसत आहे.

विरोधक सतर्क

दरम्यान, संविधानाच्या मुद्द्याला उत्तर देण्याची तयारी महायुतीने चालवली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीचे नेते संविधान बदलाचा मुद्दा आमच्या समोर नसल्याचे सांगत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात संविधान सन्मान परिषद आयोजित केली होती. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्र, सूर्य असेपर्यंत संविधान अबाधित राहील. त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही, असा निर्वाळा दिला. दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित विवेक विचार मंचने सामाजिक संवाद मेळाव्याचे कोल्हापुरात आयोजन केले होते. संविधानाने देशाला एकत्र बांधून ठेवले आहे. कोणी काही केले तरी संविधानाच्या मूलभूत गाभ्याला धक्का लावता येणार नाही, असे स्पष्टीकरण प्रमुख वक्ते एडवोकेट विजय गव्हाळे (बारामती) यांनी केले. संविधान उद्देशिका वाचन करून तसेच प्रत्येक तालुक्यात एक संविधान भवन निर्माण करावे अशी मागणी करून संविधानाशी जोडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. या माध्यमातून राष्ट्रीय संघ, भाजप हेही संविधान रक्षणासाठी पुढे येताना दिसू लागले आहेत.