Bharat Jodo Nyay Yatra In Gujarat लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. एकीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसमधून एक एक नेता बाहेर पडत आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा गुजरातमध्ये प्रवेश होताच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बुधवारी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला, माणावदरमधील काँग्रेसचे आमदार अरविंद लडाणी यांनी विधानसभेचा राजीनामा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते अर्जुन मोधवाडिया यांच्यासह काँग्रेसच्या दोन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली; ज्यांनी आता सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अर्जुन मोधवाडिया यांनी गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून तसेच पक्षाचे राज्यप्रमुख म्हणून काम केले. ते पोरबंदरचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. अर्जुन मोधवाडिया यांना गमावणे हा काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का आहे. मोधवाडिया यांनी राजीनामा दिल्यानंतर एका दिवसातच भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह राजुलाचे माजी आमदार अंबरीश डेर तसेच पीसीसीचे कार्याध्यक्ष मुलू कंडोरिया यांनीही भाजपात प्रवेश केला.

भारत जोडो यात्रेचा फायदा किती?

आगामी लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये या यात्रेमुळे काँग्रेसला फारसा फायदा होणार नाही, असे चित्र आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने लोकसभेच्या सर्व २६ जागा जिंकल्या आहेत. सौराष्ट्र-कच्छ प्रदेशात भाजपात सामील झालेले मोधवाडिया आणि लडाणी हे काँग्रेसचे मजबूत नेतृत्व होते. आता या भागात सोमनाथचे आमदार विमल चुडासमा हे पक्षाचे एकमेव प्रबळ नेतृत्व आहेत.

१९९५ पर्यंत वर्चस्व असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी २०२२ च्या विधानसभेच्या निकालात दिसली. आता काँग्रेसमधून तीन नेत्यांच्या आणि आम आदमी पक्षामधून (आप) एका नेत्याच्या पक्षांतरानंतर रिक्त झालेल्या चार जागांसाठी पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणूक एकाच वेळी घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघांवर टिकून राहणे काँग्रेससाठी आव्हान असणार आहे. गुजरातच्या राज्यसभेतदेखील काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. राज्यसभेच्या दोन जागा काँग्रेसने गमावल्या आहेत. वरिष्ठ सभागृहात सध्या गुजरात प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल हे एकमेव खासदार राहिले आहेत.

यापूर्वी कुंवरजी बावलिया, राघवजी पटेल, जसा बरड, नरहरी अमीन आणि बलवंतसिंह राजपूत यांसारख्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. बावलिया आणि पटेल दोघेही आता राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत.

राहुल गांधी तीन दिवस गुजरातमध्ये असणार आहेत. आज संध्याकाळी राजस्थान-गुजरात सीमेवरील दाहोद जिल्ह्यातील झालोद येथून यात्रा सुरू झाली असून ते राज्यात ४०० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. दरम्यान, यात्रा पंचमहालच्या शहरी भागांसह गोध्रा आणि कलोल, आदिवासी जिल्हा छोटा उदेपूर, राजपिपला, नेत्रंग, मांडवी आणि बारडोली या भागांनादेखील कव्हर करेल. १० मार्चला यात्रा महाराष्ट्रातील नंदूरबारमध्ये प्रवेश करेल.

पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “यात्रेला संपूर्ण गुजरातमध्ये जाणं शक्य होणार नाही. न्याय यात्रा प्रामुख्याने राज्यांतील आदिवासी पट्ट्यांसाठी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यभर प्रचार करतील आणि त्यासाठी राहुलजी पुन्हा भेट देऊ शकतात”, असे त्यांनी सांगितले. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात गुजरात राज्य वगळल्यामुळे काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला होता.

काँग्रेसवरील पक्षांतराचे संकट टळले का?

गुजरातमध्ये यात्रेची तयारी गोहिल, मुकूल वासनिक, जगदीश ठाकोर आणि मधुसुदन मिस्त्री हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करत आहेत. पक्षांतरामुळे मनोबल ढासळू देऊ नका, असे पक्ष कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, “कार्यकर्ते उत्साही आहेत, राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळावी यासाठी कार्यकर्ते कठोर परिश्रम घेत आहेत.”

परंतु, काँग्रेसवरील पक्षांतराचे संकट अद्याप टळले नाही. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, मोधवाडिया पक्षाचा राजीनामा देण्याच्या एक दिवस आधी, यात्रेच्या तयारीसाठी गोहिल यांच्यासोबत गोध्रा येथे होते. राजकोटमधील धोराजी मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार आणि सौराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेले ललित वसोया म्हणाले, “अर्जुन मोधवाडिया हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी राजीनामा दिल्याने पक्षात पोकळी निर्माण झाली आहे.”

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भरत बोघरा म्हणाले, “आम्हाला इतर पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांची गरज आहे असे नाही, पण जर काही नेते त्यांच्याच पक्षापासून निराश असतील आणि भारताला विकसित देश बनवण्यासाठी आमच्या विचारसरणी आणि कार्यशैलीशी जुळवून घेऊ इच्छित असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू.” पुढे ते म्हणाले, “भाजपामध्ये पक्ष संघटना महत्त्वाची आहे. भाजपा एका कुटुंबाप्रमाणे काम करते. भाजपामध्ये कोणी सामील झाले की ते कुटुंबाचाच एक भाग होतात आणि त्यानुसार काम करू लागतात.”

कार्यकर्त्यांना संधी…

ललित वसोया यांनी हे मान्य केले की, काँग्रेस आता तीन दशकांपासून सत्तेबाहेर असल्याने पक्षाला एकत्र ठेवणे कठीण आहे. राजकीय पक्षासाठी सत्ता महत्त्वाची असते, असे त्यांनी सांगितले. “निवडणूक लढवताना सकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी प्रत्येक पक्ष तत्त्वांबद्दल बोलतात. पण, जे राजकारणात असतात ते शेवटी सत्तेकडे जातात”, असे त्यांनी सांगितले.

वसोया म्हणाले की, त्यांना आशा आहे की, वरिष्ठ नेत्यांच्या बाहेर पडल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी मिळेल. “आमच्या पक्षातील तेच नेते वर्षानुवर्षे एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवत राहिले. उदाहरणार्थ, मोधवाडिया हे २५ वर्षांपासून निवडणुकांसाठी पोरबंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. ते तीन निवडणुकांमध्ये विजयी झाले, तर दोन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला. आता ते भाजपामध्ये गेले आहेत. त्यामुळे पोरबंदर काँग्रेसचे अध्यक्ष राम ओडेद्रा यांना या जागेवर संधी मिळू शकते”, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसमधील तरुण नेतृत्व पक्षाला मजबूत करू शकतात, असा वसोया यांचा विश्वास आहे.

हेही वाचा : इंडिया आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटेना; आसाममध्ये तृणमूलचे स्वतंत्र उमेदवार

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाला वसोया यांनी आम आदमी पक्षाला कारणीभूत ठरवले. या निवडणुकीत भाजपाला एकूण मतांपैकी ५३.३३% मते मिळाली होती, तर काँग्रेस आणि आपने मिळून जवळ जवळ ४०% मते मिळवली होती. योगायोगाने, दोन्ही पक्ष यंदा इंडिया आघाडी युतीचे भागीदार आहेत. दोन्ही पक्षांनी गुजरातसाठी एक करार केला आहे; त्यानुसार आप गुजरात लोकसभेच्या दोन जागा लढवणार आहे. गुजरातमध्ये आप राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi bharat jodo nyay yatra enters gujarat rac
Show comments