काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी (१७ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत पोहोचली. श्री काशी विश्वनाथाच्या दर्शनाने राहुल गांधींनी आपल्या दिवसाची सुरुवात केली. वाराणसीत गोडोलिया क्रॉसिंगवर राहुल गांधी यांची जाहीर सभाही पार पडली. “गंगेसमोर नतमस्तक होऊन आलोय,” असे त्यांनी जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले. यावेळी राहुल गांधींनी गळ्यात रुद्राक्ष परिधान केलेले पाहायला मिळाले. राहुल गांधी सभेला संबोधित करताना म्हणाले, “मी इथे आलो, दर्शन घेतले. मी इथे अहंकार घेऊन आलेलो नाही. मी गंगेसमोर नतमस्तक होऊन आलोय.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्ञानवापी प्रकरणावर मौन

अलीकडेच वाराणसी न्यायालयाने श्री काशी विश्वनाथ मंदिराशेजारील ज्ञानवापी मशीद संकुलाच्या दक्षिणेकडील तळघरात हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली. या विषयावर इंडिया आघाडीतील बहुतेक पक्षांनी मौन बाळगलं. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)मधील नेत्यांनी या विषयावर काहीही बोलणे टाळले. जाहीर सभेत बोलताना राहुल म्हणाले की, देशभक्ती म्हणजेच देशाला एकत्र आणणे. लोक एकत्र काम करतील तेव्हाच हा देश मजबूत होईल. ते पुढे म्हणाले, “या यात्रेदरम्यान मला अनेक लोक भेटायला येतात. मला जेव्हा माझे सहकारी विचारतात, लोक भेटायला आले, तर काय करायचे? तेव्हा मी त्यांना सांगतो की, त्यांना आदरानं भेटायला घेऊन यायचं. या लोकांना ते आपल्याच घरी आपल्या भावाला भेटायला आलोय असं वाटायला हवं.”

राहुल गांधी यांनी राहुल नाव असलेल्याच गर्दीतील एका तरुणाला त्यांच्या जीपमध्ये येण्यास सांगितले. यावेळी त्याच्या वडिलांनी त्याच्या अभ्यासावर खर्च केलेली रक्कम आणि त्याला नोकरी मिळाली आहे का, याबद्दल विचारपूस केली. तरुणाने राहुल यांना सांगितले की, तो मूळचा बिहारचा आहे आणि तो उत्तर प्रदेश येथे पोलिस खात्यात नोकरीकरिता अर्ज करण्यासाठी आला होता. परंतु, अर्ज करणार्‍यांची संख्या मोठी असल्यानं त्याला नोकरी मिळणं अवघड होईल, अशी भीती आहे.

या यात्रेत अपना दल (के)चे नेते, सपा आमदार पल्लवी पटेल आणि पक्षातील नेतेही यात्रेत सामील झाले. वाराणसी येथे राहुल गांधी यांनी १२ किलोमीटरचा ‘रोड शो’देखील केला. काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, पूर्वी ठरलेले वेळापत्रक बदलून यात्रा पश्चिम उत्तर प्रदेशमधून जाणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात यात्रा मुरादाबाद येथून सुरू होऊन अमरोहा, संभल, अलीगड, हाथरस व आग्रा या शहरांमधून जाईल आणि नंतर राजस्थानमध्ये प्रवेश करील. प्रियंका गांधी वाड्रा या रायबरेलीमधून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्याबद्दल काँग्रेस नेत्यांना विचारले असता, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय म्हणाले की, गांधी कुटुंबाचा रायबरेलीशी दीर्घकाळ संबंध राहिला आहे. प्रियंका या त्यांना हवे असल्यास तिथून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊ शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपा प्रमुख अखिलेश यादव २० फेब्रुवारी रोजी राहुल गांधींच्या रायबरेली येथे होणाऱ्या यात्रेत सामील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसने आरोप केला की, राहुल यांच्या श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या भेटीदरम्यान त्यांच्या वैयक्तिक कॅमेऱ्यांची परवानगी शेवटच्या क्षणी नाकारण्यात आली. वाराणसी जिल्हा प्रशासनाचा हा भेदभाव असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्पष्ट शब्दांत काँग्रेस नेत्यांनी आरोप केला, “जिल्हा प्रशासनाने या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केलं की, ते दिल्लीत बसलेल्या कॅमेराजीवींचे कर्मचारी आहेत.”

उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी आरोप केला की, राहुल जेव्हा श्री काशी विश्वनाथ मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत कोणत्याही वैयक्तिक कॅमेऱ्याला परवानगी देण्यात आली नाही. “सर्व भाजपा नेते जेव्हा श्री काशी विश्वनाथ मंदिरात प्रार्थना करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना कॅमेर्‍यांसह प्रवेश दिला जातो. राहुल गांधींसोबत कोणत्याही कॅमेऱ्याला परवानगी देण्यात आली नाही आणि आतापर्यंत प्रशासनाकडून कोणतेही फोटो प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांवरदेखील निशाणा साधला. ते म्हणाले की, ते (प्रसारमाध्यम) फक्त कलाकारांना नाचताना दाखवतील आणि पंतप्रधान मोदींना २४ तास दाखवतील; परंतु मजूर किंवा शेतकऱ्यांच्या समस्या दाखविणार नाहीत. काही निवडक वृत्तवाहिन्यांची नावे घेऊन, त्यांनी संगितले की, या वृत्तवाहिन्या अदानीजी, अंबानीजी यांच्या मालकीच्या आहेत. राहुल यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय)चादेखील उल्लेख केल्यामुळे, संस्थेने दुसर्‍या दिवशी या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “पीटीआय अदानी आणि अंबानी यांच्या मालकीचे आहे, असे राहुल गांधींचे म्हणणे ऐकून धक्का बसला. पीटीआय ही एक स्वतंत्र, नफा नसलेली वृत्तसंस्था आहे. पीटीआय स्वातंत्र्यापासून स्वतंत्र मालकीची संस्था आहे.”

हेही वाचा : कुत्र्याला अमानुष मारहाण; प्राणी संरक्षण कायद्यात बदल होणार? 

राहुल गांधी यांनी आरोप केला की, काही वृत्तसंस्था शेतकरी, मजूर किंवा गरिबांचे प्रश्न दाखविणार नाहीत. कारण- त्यांच्या मालकांनी त्यांना ते दाखविण्याची परवानगी दिली नाही. “ते शेतकरी, मजूर, गरीब कधीच दाखविणार नाही. कारण- देशातील गरिबांबद्दल दाखवू नका, असे त्यांचे मालकच यांना सांगतात.” आपल्या संपूर्ण सभेत राहुल गांधी यांनी विविध विषय मांडले. सत्ताधारी पक्षावर आरोप केले. परंतु, त्यांनी ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा किंवा उल्लेखही आपल्या भाषणात केला नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi bharat jodo nyay yatra in varanasi rac
Show comments