काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी लंडनमधील चॅट्हॅम हाऊस येथील चर्चासत्रात भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचे मत व्यक्त केले. भारतात स्वायत्त संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या भारतात लोकशाहीचे पतन होत आहे. त्याचा परिणाम जागतिक स्तरावर दिसेल, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या याच विधानावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. युरोप, अमेरिकेने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करावी, अशी राहुल गांधी यांची इच्छा आहे. राहुल गांधी विदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> समाजवादी पक्ष ‘अमेठी’ लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार; काँग्रेसशी आघाडीची शक्यता संपुष्टात?

राहुल गांधी नेमके काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये बोलताना भारतीय लोकशाही धोक्यात आहे, असे विधान केले. “भारतीय लोकशाही फक्त भारतापुरतीच मर्यादित नाही. तिचा परिणाम अन्य देशांवरही होतो. मला असे वाटते की, भारतीय लोकशाहीचे पतन झाल्यास त्याचा जगातील लोकशाहीलाही धोका पोहोचेल. त्यामुळे इतर जगाच्या दृष्टीनेही भारतातील लोकशाही फार महत्त्वाची आहे. भारतातील लोकशाहीचे पतन ही फक्त आमचीच समस्या नाही. ही समस्या आम्ही आमच्या पद्धतीने हाताळू. मात्र या समस्येचा जागतिक पातळीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे सध्या भारतात काय सुरू आहे, याची इतर देशांनाही माहिती असली पाहिजे. लोकशाहीवर हल्ला केला जात आहे,” असे राहुल गांधी लंडनमध्ये म्हणाले.

हेही वाचा >> कृषी आणि सेवा क्षेत्रांत राज्याला फटका, दरडोई उत्पन्नात पाचव्या क्रमांकावर

संघ ही मूलतत्त्ववादी, फॅसिस्ट संघटना- राहुल गांधी

त्यांनी याआधीही ब्रिटनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलेली आहे. “२००४ साली मी राजकारणात सक्रिय झालो. तेव्हा राजकीय स्पर्धा ही दोन राजकीय पक्षांमध्ये असायची. मात्र आता चित्र बदलले आहे. हा बदल संघामुळे झालेला आहे. संघ ही मूलतत्त्ववादी, फॅसिस्ट संघटना आहे. या संस्थेने देशातील जवळपास सर्वच संस्थांवर ताबा मिळवलेला आहे. ते लोकशाहीच्या माध्यमातून सर्व संस्था ताब्यात घेत आहेत. संघाला लोकशाही व्यवस्था उलथून लावायची आहे. माध्यमे, न्यायव्यवस्था, संसद, निवडणूक आयोग तसेच इतर सर्व संस्था दबावाखाली आहेत,” असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

हेही वाचा >> भाजपाची २०२४ लोकसभा निवडणुकीची ‘ब्लू प्रिंट’ तयार; मोदींच्या १०० सभा, दक्षिणेतील राज्ये आणि ओडिशा-बंगालवर विशेष लक्ष

देशातील जनता राहुल गांधींचे ऐकणार नाही- रवीशंकर प्रसाद

राहुल गांधी यांच्या याच आरोपांचा भाजपाने समाचार घेतला आहे. “राहुल गांधी यांनी ससंदीय नियम, राजकीय औचित्याचा भंग केला आहे. युरोप आणि अमेरिका यांना भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचे आवाहन करून त्यांनी देशाला लाजवले आहे. देशातील जनता त्यांचे ऐकणार नाही. राहुल गांधी विदेशात जातात आणि भारतात लोकशाही धोक्यात आहेत, असा विलाप करतात. ही फार लाजिरवाणी बाब आहे. राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाही, संसद, भारतातील जनता, न्यायव्यवस्था अशा सर्वांना अपमानित केले आहे,” असा हल्लाबोल भाजपाचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे.

हेही वाचा >> ज दरवाढीने जनता त्रस्त, लोकप्रतिनिधी राजकारणात व्यस्त! विद्युत नियामक आयोगाच्या सुनावणीकडे पाठ

राहुल गांधींनी संघाच्या शिबिरांना हजेरी लावावी- अनुराग ठाकुर

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकुर यांनी राहुल गांधी यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील विधानाचा समाचार घेतला आहे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक स्वयंसेवी संस्था आहे. राष्ट्रीय एकता आणि अखंडतेसाठी ही संस्था काम करते. संघाने देशासाठी योगदान दिले आहे. राहुल गांधी यांनीदेखील संघाच्या शिबिरांना हजेरी लावावी; असे मी आवाहन करतो,” अशी टिप्पणी अनुराग ठाकुर यांनी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi said democracy danger in india bjp criticizes prd