काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात असून ती महाराष्ट्रात दाखल झाली आहे. शुक्रवारी या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. निवडणूक रोखे योजना म्हणजे जगातले सर्वात मोठे खंडणी वसूल करणारे रॅंकेट आहे, ते यावेळी म्हणाले. तसेच या योजनेचा वापर विविध राज्यांतील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या मुद्द्यावरून आता देशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – राहुल यांच्या भेटीने गांधी कुटुंब-मालेगाव ऋणानुबंधास उजाळा

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

“निवडणूक रोखे योजना म्हणजे जगातले सर्वात मोठे खंडणी वसूल करणारे रॅकेट आहे. या योजनाचा वापर राजकीय पक्ष फोडण्यासाठी आणि विविध राज्यांमध्ये असलेले काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी करण्यात आला आहे. तसेच ईडी, निवडणूक आयोग, सीबीआय ही भाजपाची शस्त्रे आहेत. जर या संस्थांनी त्यांचे काम व्यवस्थित केले असते, तर त्यांच्यावर अशाप्रकारचे आरोप झाले नसते”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

पुढे बोलताना त्यांनी सत्तेत आल्यास काँग्रेस पक्ष अशाप्रकारे तपास यंत्रणांचा वापर करणार नाही, असे आश्वासनही दिले. “भाजपाने हे लक्षात ठेवावं, की आज नाही तर उद्या केंद्रातील भाजपाचे सरकार बदलेल. त्यानंतर त्यांच्यावरही अशाप्रकारची कारवाई होऊ शकते. मात्र, आम्ही तपास यंत्रणांचा असा गैरवापर करणार नाही, याची मी हमी देतो”, असे ते म्हणाले.

मल्लिकार्जून खरगेंचही भाजपावर टीकास्त्र

तत्पूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजपाच सरकारवर टीकास्र सोडलं. तसेच त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि तोपर्यंत भाजपाच्या बॅंक खाती गोठवण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपाला ज्या लोकांनी देणगी दिली, त्यातील अनेकांविरोधात ईडी सीबीआयची कारवाई सुरू आहे, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांनाही लक्ष्य केलं. पंतप्रधान मोदी म्हणतात, “’ना खाऊंगा ना खाने दुंगा’ मात्र, भाजपाने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कशाप्रकारे पैसे कमावले, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उघड झालं आहे. यामध्यमातून भाजपाला जवळपास ५० टक्के देणग्या मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ ११ टक्के देणग्या मिळाल्या आहेत.”

हेही वाचा – ॲड. प्रकाश आंबेडकरांपुढे खासदार धोत्रे यांच्या पुत्राचे आव्हान

भाजपाला सर्वाधिक देणग्या

दरम्यान निवडणूक आयोगाच्या संकेस्थळावरील माहितीनुसार, भाजपाने १२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ या काळात भाजपने ६०६०.५ कोटी रुपयांचे रोखे वटवले. तर तृणमूल काँग्रेसने १६०९ कोटी रुपयांचे, काँग्रेसने १४२२ कोटी करुपयांचे तर बीआरएस, बीजेडी आणि डीएमके यांनी अनुक्रमे १२१४ कोटी, ७७५ कोटी आणइ ६३९ कोटी रुपयांचे रोखे वटवल्याचे पुढे आलं आहे.

Story img Loader