Sharad Pawar and Rahul Gandhi on Maharashtra Assembly Election: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. आता याचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला जा,त असून विरोधकांनी पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष दिले आहे. या भागातील यश महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेच्या चाव्या देऊ शकतो. राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या बैठका घेताना काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त राहुल गांधी सांगली येथे आले होते. लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढविणारे विशाल पाटील निवडून आले आणि नंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा आढावा घेणारा लेख द इंडियन एक्सप्रेसने प्रकाशित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी ४ व ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांनी आयोजिलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्याशी संवाद साधतील. तर, दुसऱ्या दिवशी ते संविधान परिषदेला संबोधित करतील.

हे वाचा >> Rahul Gandhi : राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार, संविधान सन्मान संमेलनाला उपस्थिती

पश्चिम महाराष्ट्राची ताकद किती?

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर असे सहा जिल्हे असून, विधानसभेच्या २८८ जागांपैकी ७० जागा या विभागात आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत येथून काँग्रेस, राष्ट्रवादीला चांगला पाठिंबा मिळाला होता. दोन्ही पक्षांनी मिळून तब्बल ३९ जागांवर विजय मिळविला होता. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७, तर काँग्रेसच्या १२ जागांचा समावेश होता. तर, भाजपाला केवळ २० आणि शिवसेनेला पाच, तर अपक्षांनी सहा जागा जिंकल्या होत्या.

पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारी ही राजकारणावर प्रभाव टाकत आली आहे आणि या कारखानदारीवर आजवर काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेत्यांचे नियंत्रण राहिले आहे. गेल्या काही काळात यापैकी अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर, राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र कुणाच्या बाजूने झुकते, हा प्रश्न आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्रात पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे; जेणेकरून सत्ताप्राप्तीचे यश गाठता येईल.

लोकसभा निवडणुकीत महायुतीने साखर पट्ट्यात केवळ पुणे, सातारा व हातकणंगले तीन ठिकाणी विजय मिळविला आहे. तर, महाविकास आघाडीने कोल्हापूर, सोलापूर, माढा, शिर्डी, अहमदनगर, शिरूर आणि सांगली (अपक्ष सांगली ग्राह्य धरून) अशा सात ठिकाणी विजय मिळविला आहे.

शरद पवारांचे पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष

काँग्रेसशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानेही पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवार हे काही काळापासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. २०१९ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांच्याकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर अनेक बडे नेते त्यांच्याबरोबर गेले. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर आव्हान असले तरी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांवर शरद पवार यांनी काम करण्यास सुरुवात केली आहे.

जुन्या सहकाऱ्यांच्याही भेटीगाठी आणि नव्या नेतृत्वाची सांगड घालत शरद पवार पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात विजय मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. अहमदनगरच्या अकोले (अनुसूचित जमाती) मतदारसंघात तरुण नेता अमित भांगरे, सांगलीच्या तासगावमध्ये माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, बारामतीमध्ये नातू युगेंद्र पवार अशा काही तरुण नेत्यांना संधी दिली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी कोल्हापूर येथे कागल विधानसभा मतदारसंघासाठी समरजित घाटगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. माजी सहकारमहर्षी विक्रमसिंह घाटगे यांचे सुपुत्र असलेले समरजित घाटगे भाजपामधून राष्ट्रवादीत आले. महायुतीमध्ये कागल हा मतदारसंघ अजित पवार गटाच्या हसन मुश्रीफ यांच्याकडे जाणार असल्यामुळे घाटगे यांनी शरद पवार गटाचा मार्ग अवलंबला.

मतभेद विसरून शरद पवारांची वाटचाल

शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीआधीचे मतभेद विसरून जुने संबंध पुन्हा प्रस्थापित केले. माढा लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी असलेले मतभेद बाजूला ठेवत, त्यांचा पुतण्या धैर्यशील मोहिते-पाटील यांना तिकीट दिले आणि त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. हाच कित्ता पुढे गिरविताना मागच्या आठवड्यात सोलापूरच्या अकलूज येथे मोहिते-पाटील यांच्या पुढाकारातून सुशीलकुमार शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित होते. या तीनही नेत्यांनी बदललेल्या परिस्थितीचा वेध घेत, आपापसांतले मतभेद बाजूला सारून एकत्र येण्याची भूमिका घेतली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhis visits sharad pawar tactics how mva is working to win maharashtras sugar belt kvg
Show comments