Narendra Mehata vs Geeta Jain in Mira Bhayander Assembly Constituency अलिबाग- आधी उरण आणि आता अलिबाग अशा दोन्ही जागांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. शेकापनेही दोन्ही जागांवर आधीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

जिल्ह्यात पक्षसंघटन चांगले असल्याने शेकापने अलिबाग, पेण, उरण आणि पनवेल या चार मतदारसंघाची महाविकास आघाडीकडून मागणी केली आहे. चारही मतदारसंघातून त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अलिबाग मधून चित्रलेखा पाटील, पेण मधून अतुल म्हात्रे, उरण मधून प्रितम म्हात्रे तर पनवेल मधून बाळाराम पाटील हे शेकापचे उमेदवार असणार आहेत.  शिवसेना ठाकरे गट शेकापशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत नाही.

हेही वाचा >>>मीरा भाईंदरवरून महायुतीत धुसफूस; गीता जैन, नरेंद्र मेहता अपक्षाच्या तयारीत

ठाकरे गटाने आधी उरण मधून माजी आमदार मनोहर भोईर यांना उमेदवारी दिली. २०१४ मध्ये मनोहर भोईर हे शेकापच्या विवेक पाटील यांचा पराभव करत ७०० मतांनी निवडून आले होते. गेल्या निवडणूकीत मनोहर भोईर यांचा भाजपच्या अपक्ष बंडखोर उमेदवार महेश बालदी यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र या निवडणूकीत शिवसेनेच्या भोईर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर शेकापचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे उरण मतदारसंघावर दावा सांगत ठाकरे गटाने मनोहर भोईर यांना निवडणूकीत उतरवले आहे.

अलिबागमधून जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना निवडणूक लढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुरेंद्र म्हात्रे यांना मातोश्रीवर बोलावून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अधिकच वाढण्याची शक्यता आहे. अलिबाग मधून शिवसेनेचे महेंद्र दळवी गेल्या निवडणूकीत शेकाप उमेदवार सुभाष पाटील यांचा पराभव करून निवडून आले होते. त्यामुळे अलिबागची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची मोठीच अडचण झाली आहे.

हेही वाचा >>>Congress Candidate List 2024 : काँग्रेसच्या पहिल्या यादीत जुनेच चेहरे; पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, वडेट्टीवार यांना उमेदवारी

  अलिबाग हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे. काही अपवाद सोडले तर शेकापने कायमच मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राखले आहे. त्यामुळे शेकाप कुठल्याही परिस्थितीत अलिबाग आणि उरणची जागा सोडणार नाही. मात्र ठाकरे गटाने दोन्ही उमेदवार कायम ठेवल्यास, शेतकरी कामगार पक्षाला महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.

पक्षाचे संघटन आणि जनाधाराचा विचार केल्यास महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस या तिनही घटक पक्षांच्या तुलनेत सध्या शेकापची ताकद ही जास्त आहे. अशा परिस्थितीत शेकाप जर महाविकास आघाडीतून दूर झाला तर त्याची मोठी किमंत महाविकास आघाडीला रायगड मध्ये मोजावी लागण्याची शक्यता आहे.  

 पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मला अलिबाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सांगितले आहे. त्यांचा आदेश माझ्यासाठी प्रमाण आहे.  त्यामुळे मी २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. पुर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचा माझा प्रयत्न राहील- सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट