अलिबाग- सलग दुसऱ्यांदा रायगड जिल्ह्यातून शेकापचा एकही उमेदवार विधानसभेवर निवडून येऊ शकलेला नाही. त्यामुळे, पक्षाच्या जनाधाराला ओहोटी लागल्याचे चित्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेकापने अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण मतदारसंघातून आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. मात्र चारही उमेदवार पराभूत झाले. उरणमधून प्रितम म्हात्रे, पनवेलमधून बाळाराम पाटील, पेणमधून अतुल म्हात्रे तर अलिबागमधून चित्रलेखा पाटील यांना पराभवाला सामोर जावं लागले. २०१९ नंतर सलग दुसऱ्यांदा शेकापचा एकही उमेदवार रायगड जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून येऊ शकलेला नाही. काही महिन्यांपूर्वीच शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांना विधान परिषद निवडणुकीत पराभवाला सामोरं जावे लागले होते. त्यामुळे विधान परिषदेतही शेकापचा एकही आमदार राहिलेला नाही.

हेही वाचा – भाजपच्या मावळ्यांनी राखला फडणवीसांचा गड

एकेकाळी रायगड हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, पक्षाचे चार ते पाच आमदार जिल्ह्यातून निवडून जायचे, पक्ष कार्यकर्त्यांचे भक्कम कॅडर संघटनेच्या पाठीशी होते. पण आता गेले ते नेते आणि राहिल्या नुसत्या आठवणी असे म्हणण्याची वेळ पक्षकार्यकर्त्यांवर आली आहे. रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची साथ सोडल्याने पनवेल विधानसभा मतदारसंघात पक्षाची वाताहत सुरू झाली. विवेक पाटील कर्नाळा बँक घोटाळ्यात अडकल्याने उरणमध्ये पक्षाला उतरती कळा लागली. पेण विधानसभा मतदारसंघातून तरुण तडफदार नेते अशी ओळख असलेल्या माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी पक्षाची साथ सोडली. त्यामुळे या मतदारसंघातही पक्षाची वाताहत झाली. पेण विधानसभेच्या निवडणुकीत याचीच प्रचिती आली आहे. शेकापचे अतुल म्हात्रे मतदारांवर प्रभाव पाडण्यात निष्प्रभ ठरले आहेत.

अलिबाग विधानसभा मतदारसंघातही पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही. मुरुडमधून मनोज भगत, अलिबागमधून दिलीप भोईर पक्षाला सोडून गेले. अलिबाग विधानसभेच्या उमेदवारीवरून माजी आमदार सुभाष पाटील, आस्वाद पाटील नाराज झाले. निवडणुकीत ते सक्रिय दिसले नाहीत. याची मोठी किंमत पक्षाला मोजावी लागली. शेकापचे बलस्थान असलेल्या खारेपाट विभागात पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही.

हेही वाचा – पालघर जिल्ह्यात प्रस्थापितांविरुद्ध कौल

पनवेलमध्ये वाढत्या नागरीकरणाचा फटका शेकापला बसला. ग्रामिण भागात पक्षाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले असले तरी शहरी भागात विविध भागातून स्थलांतरीत होणारे लोक शेकापला स्वीकारण्यास फारसे इच्छुक दिसत नाही. त्यामुळ ग्रामीण भागात चांगली मते मिळूनही पक्षाचे उमेदवार निवडून येत नाहीत.

उरण मतदारसंघात शेकापच्या प्रितम म्हात्रे यांनी कडवी झुंज दिली. मात्र अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये भाजपच्या महेश बालदी यांनी मताधिक्य घेत म्हात्रे यांचा पराभव केला. मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि शेकापचे मतविभाजन भाजपच्या पथ्यावर पडले. या चारही मतदारसंघांत झालेल्या पराभवांमधून बोध घेणे गरजेचे आहे. अन्यथा शेकापचे जिल्ह्यातील अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad district shetkari kamgar paksh defeated assembly election results raigad print politics news ssb