अलिबाग – कोकणात काँग्रेसला एकही जागा न मिळाल्याने रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर यांनी आधी श्रीवर्धन आणि नंतर अलिबाग अशा दोन मतदारंसघातून बंडखोरी केली. गेल्या निवडणुकीतही त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसची पाटी कोरी राहिली. पक्षाला जागा वाटपात एकही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. तिन्ही जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी आपली नाराजी पक्षश्रेष्ठींकडे जाहीरपणे व्यक्त केली आहे. यानंतर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कोकणातील १२ जिल्हाध्यक्षांशी थेट संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रोखायचे असेल तर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीही काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातून काँगेसच्या अविनाश लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर श्रीवर्धन आणि अलिबागमधून काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे.

हेही वाचा – धनगर समाजाच्या पदरी निराशा

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन आणि उरण या तीन जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला मिळाव्यात अशी जिल्हा कमिटीची इच्छा होती. उरणमधून जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, अलिबागमधून प्रदेश सचिव प्रविण ठाकूर, तर श्रीवर्धनमधून त्यांचेच बंधू राजेंद्र ठाकूर यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र जागा वाटपात एकही मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला नाही. उमेदवारी नाकारल्याबाबत पक्षाने इच्छुकांना कळवले देखील नाही. त्यामुळे नाराज झालेल्या राजेंद्र ठाकूर यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून आधी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. नंतर अलिबागमधून प्रविण ठाकूर यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करणार नसल्याचे जाहीर करताच, राजेंद्र ठाकूर यांनी शेवटच्या क्षणी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज केला आहे.

राजेंद्र ठाकूर यांच्याकडून पक्षाविरोधात बंडखोरी करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. या निर्णयविरोधात जाऊन राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. श्रद्धा ठाकूर आणि राजेंद्र ठाकूर मतदारांवर प्रभाव पाडण्यात सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे पक्षाच्या मतांचे विभाजन होऊन दोन्ही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली होती.

हेही वाचा – तीन दिवस मुक्काम पोस्ट बारामती : औचित्य दिवाळी; उद्दिष्ट प्रचार!

राजेंद्र ठाकूर यांच्या बंडखोरीकडे दुर्लक्ष करून त्यांना पक्षात वरिष्ठ उपजिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते. पक्ष संघटनेसाठी काम करण्याचे निर्देश दिले होते. मात्र निवडणूक येताच पुन्हा एकदा ठाकूर यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात जाऊन बंडखोरीचे शस्त्र उचलले आहे. शेकापमधील असंतुष्ट गटाशी जवळीक साधून त्यांनी निवडणुकीत वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकूर कुटुंब आणि बंडखोरी

काँग्रेस हा पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर चालणारा पक्ष असला तरी अलिबाग पक्षाचे राजकारण गेली तीन दशके ठाकूर कुटुंब केंद्रित राहिले आहे. याचा फटका पक्षाला वेळोवेळी बसला आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रविण ठाकूर यांनी बंडखोरी केली होती. प्रविण ठाकूर यांना या निवडणुकीत ३९ हजार मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेल्या ए. आर अंतुले यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकूर कुटुंबातील तिघांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने श्रद्धा ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. मात्र या निर्णयाला आव्हान देत बंडखोरी करत राजेंद्र ठाकूर यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. आता २०२४ विधानसभा निवडणुकीत ते पक्षनिर्णयाला आव्हान देत निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad vidhan sabha constituency rajendra thakur shreevardhan alibagh assembly election 2024 congress in konkan region print politics news ssb