अरेरे, रामदासजी. तुमची काय अवस्था झाली. वाईट वाटते हो. धड वाटाघाटी करण्याचीसुद्धा तुमची ऐपत राहिलेली नाही. ‘येत्या विधानसभेसाठी आम्ही पाच ते सहा जागा मागितल्या. त्या नाही मिळाल्या तरी महायुतीतून बाहेर पडणार नाही. कारण काय तर मंत्रीपद आहे. त्यामुळे इतर राज्यात पक्षविस्तार करता येतो’ हे तुमचे वक्तव्य. आठवलेसाहेब सत्तेसाठी इतके लाचार कसे झालात हो तुम्ही? अगदी काही दिवसांपूर्वी तुम्ही ‘डोळे बंद’ करून दहा ते बारा जागांची मागणी करत होतात. आता एकदम अर्ध्यावर. डोळे उघडले की काय? दीर्घकाळ युतीत राहून राज्यात तुमचा पक्ष वाढला की आक्रसला? नेमके झाले काय ते स्पष्ट कराल का? अहो, लोकसभेचा एक सदस्य असलेल्या अजितदादांचा पक्षसुद्धा पन्नास जागा मागतो.

मिळाल्या नाही तर सांकेतिक भाषेत इशारा देतो. तुम्ही तर शरणागतीच पत्करली. अशाने कसे होणार तुमच्या रिपाइंचे? अशी आधीच तलवार म्यान केल्यावर तुमच्या मागणीकडे लक्ष तरी कोण देणार? तरीही उदार होत महायुतीने तुम्हाला दिल्या एवढ्या जागा लढण्यासाठी तर उमेदवार तरी आहेत का तुमच्याकडे? जरा शंका वाटली म्हणून हा प्रश्न. तुम्हाला मंत्रीपद हेच तुमच्या पक्षाचे एकमेव ध्येय आहे की काय? मग जे काही थोडे कार्यकर्ते उरलेत तुमच्यासोबत त्यांचा विचार तुम्ही कधी करणार? मंत्रीपद असले की इतर राज्यात पक्ष वाढवता येतो म्हणे! गेल्या दहा वर्षांत किती राज्यात तो वाढला? किती जागा निवडून आल्या याची द्याल का जरा आकडेवारी? राज्यातील जनता उत्सुक आहे हो ऐकायला. एकेकाळी माझ्या कार्यकर्त्याला मंत्रीपद द्या, नाहीतर मी त्याग करतो, त्या पदाचा असे काँग्रेसी विचाराच्या नेत्यांना सुनावणारे तुम्ही होते. हे तुम्ही विसरलात पण राज्याची जनता कशी विसरेल? काही नाही, तुम्हाला दिल्लीची हवा मानवलेली दिसतेय, असा अर्थ काढायला लागलेत लोक. खरे काय ते सांगाल का एकदा किमान शीघ्रकवितेतून तरी!

श्री.फ. टाके