अलिबाग – लोकसभा निवडणुकीपाठोपाठ कोकणाने विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने कल दिला. भाजपचे निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. तळकोकणातील उमेदवार देण्याची काँग्रेसची खेळी फसली. रमेश कीर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारांवर प्रभाव पाडण्यात सपशेल अपयशी ठरले.

कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एक अपवाद सोडला तर या मतदारसंघातून कायमच भाजपचे उमेदवार निवडून येत राहिले आहेत. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात भाजपची ताकद क्षीण आहे. असे असूनही सातत्याने या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी होत आले आहेत. नियोजन, संघटनात्मक काम यास कारणीभूत ठरत आहेत. याही निवडणुकीत त्याचीच प्रचिती आली.

हेही वाचा – मुंबईवर ठाकरे गटाचेच वर्चस्व कायम

पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा निरंजन डावखरे यांच्यावर विश्वास दाखवला होता. तर काँग्रेसने कोकण म्हाडाचे माजी सभापती आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे रमेश कीर यांना निवडणुकीत उतरवले होते. पण रमेश कीर मतदारांवर प्रभाव पाडण्यात सपशेल अपयशी ठरले. निरंजन डावखरे सलग तिसऱ्यांदा १ लाख ७१९ मते मिळवून विजयी झाले. काँग्रेसच्या रमेश कीर यांना जेमतेम २८ हजार ६८५ मते मिळाली. त्यामुळे त्यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. जिंकून येण्यासाठी ६६ हजार ०३६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. तो डावखरे यांनी सहज पार केला.

या मतदारसंघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. ज्यात ठाणे, आणि रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असतात. त्यामुळे उमेदवार या दोन जिल्ह्यांतील असणे अपेक्षित होते. पण काँग्रेसने तळ कोकणातील उमेदवार दिला. उमेदवारी मिळाल्यावर कीर यांनी ठाणे आणि रायगड जिल्ह्यांवर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. ठाणे आणि रायगडमधील मतदारांपर्यंत पोहोचण्यात सपशेल अपयशी ठरले. मित्र पक्षांकडून अपेक्षित असलेली साथ त्यांना मिळाली नाही. याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला.

हेही वाचा – एकेकाळी दलितांसाठी आशा ठरलेल्या बसपाचा ‘या’ कारणांमुळे जाणार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

भाजपने नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक लढवली. सुरुवातीला मतदार नोंदणीवर भर दिला. त्यानंतर मतदारांपर्यंत संपर्क साधण्यासाठी सर्व यंत्रणा राबविल्या. नियोजन करून प्रचार केला आणि मतदारांना बाहेर काढून मतदान करून घेतले. काँग्रेसकडून अशी यंत्रणा कुठेही राबताना दिसली नाही. त्यामुळे निरंजन डावखरेंची वाटचाल सुकर होत गेली.

११ हजार ०३६ मते अवैध….

मतदारसंघासाठी २ लाख २८ हजार मतदारांनी नोंदणी केली होती. ज्यापैकी १ लाख ४३ हजार २९७ जणांनी मतदान केले होते. मतमोजणी दरम्यान १ लाख ३२ हजार ०७१ मते वैध ठरली. ११ हजार २२६ मते अवैध ठरली. योग्य प्रकारे मतदान न केल्याने सुशिक्षित पदवीधर मतदारांची तब्बल ११ हजार मते बाद झाली. निवडणुकीत प्राधान्यक्रम पद्धतीने मतदान करणे अपेक्षित असते. उमेदवारांना पसंती क्रमानुसार मतदान करायचे असते. आवडत्या उमेदवाराला पसंती क्रम द्यायचा असतो. १ नंबरचा पसंती क्रम देणे बंधनकारक असते. आणि चौकटीत स्पष्ट दिसेल असा मधोमध पसंती क्रम लिहिणे अपेक्षित असते. निवडणूक यंत्रणेनी दिलेल्या पेनचा वापर करूनच मतदान करायचे असते. हे नियम न पाळल्यास मते अवैध ठरतात.