मुंबई : दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत केलेल्या बंडाचे कारण हे केवळ हिंदुत्व आहे असे मराठी माणसाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे -२’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर दोन या चित्रपटात “आनंदी दिघे असते तर” त्यांनी शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर केलेल्या “घरोबा” आणि “हिंदुत्व” यांच्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त केली असती हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे दोन या चित्रपटाचा “प्रीमियर शो” मुंबईतील आईनॉक्स चित्रपटगृहात आयोजित केला गेला होता. या चित्रपटासाठी राजकारण, समाजकारण, चित्रपट, सनदी अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. चित्रपटाच्या सुरुवातीलाच पालघर मधील दोन साधू हत्या घटनेने व्यतीत झालेले तात्कालीन नगर विकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झोपेतून दचकून जागे झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याचवेळी घरातील झोपाळ्यावर आनंद दिघे बसल्याचा त्यांना भास होतो. हिंदुत्वाची भगवी वस्त्रे घातलेल्या साधूंची अशा प्रकारे हत्या होते तरी शिवसैनिक गप्प कसे बसू शकतात, असा सवाल दिघे शिंदेंना विचारतात. तेव्हापासून हिंदुत्वाशी फारकत घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर केलेल्या आघाडीवरून शिंदे अनेक ठिकाणी अस्वस्थ असल्याचे दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा :हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?

अयोध्येतील बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात दिघे कसे आघाडीवर होते. कल्याणच्या मलंगडाचे श्रीमलंगड या नामांतरासाठी दिघे यांनी कसे रक्त सांडले हे एका दृश्यतून दाखवण्यात आले आहे हिंदुत्वासाठी शिवसेना भाजप युतीलाच लोकांनी मतदान केलेले असताना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी कशी करू शकते असा सवाल एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विचारला आहे त्याच कार्यकर्त्याने शिंदे मंत्री असताना त्यांना घरात न घेता उंबरठ्यावरून माघारी पाठवले ही जनभावना दाखवण्यात आली आहे. नक्षलवाद्यांचा धोका असताना शिंदे यांना नाकारण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा, त्यांचा राज्यसभा निवडणुकीच्या वेळी “हू इज एकनाथ शिंदे” म्हणून एका इव्हेंट करणाऱ्या मुलीने केलेला अपमान, केंद्र सरकारने कश्मीर मधील हटवलेले ३७० कलम, तिहेरी तलाकचा मुस्लिम महिलांना झालेला फायदा, आनंद दिघे यांनी एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर ठाण्यात सुरू केलेली सराव परीक्षा, दिघे त्यांच्या मृत्यूनंतर कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात झालेली बेदम मारहाण असे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. सररते शेवटी आनंद दिघे यांच्याबरोबर असलेल्या हिंदुत्वावरून केलेले एक स्वगत आणि आनंद दिघे यांनी त्यावेळी “एका खांद्यावर हिंदुत्व आणि एका खांद्यावर संघटना घेऊन पुढे जा” हा दिलेला संदेशने चित्रपटाचा शेवट करण्यात आलेला आहे. या चित्रपटात एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडा मध्ये सामील झालेले शहाजी बापू पाटील, संजय शिरसाट भरत गोगावले, शंभूराजे देसाई अशी असे अनेक आमदारांची पात्र दाखवण्यात आलेली आहेत हिंदुत्वाच्या या मुद्द्याबरोबरच सावरकरांबद्दल काँग्रेस सरकार त्यावेळी करीत असलेला अपप्रचारला दिघे यांनी कसे उत्त्तर दिले. अभिनेता शरद पोंक्षे यांच्या “मी नथुराम गोडसे बोलतोय” या नाटकासाठी कसं समर्थन दिले हेही दाखवण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकी अगोदर एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर दोन या चित्रपटाच्या माध्यमातून मतदारांवर हिंदुत्व आणि सावरकर प्रेम या दोन्ही गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.