पालघर : विधानसभा निवडणुकीची घोषणा समिप आली असून महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहेत. पालघर जिल्ह्यात पालघर, बोईसर, नालासोपारा या विधानसभा क्षेत्रांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीय असून जागा वाटपातील सूत्रानुसार इच्छुकांचे भवितव्य ठरणार आहे. उमेदवारीच्या आशेवर पक्षांतर केलेल्या राजकीय नेत्यांचा जीव टांगणीला पडला असून इतर काही मंडळी उमेदवारी मिळाल्यास पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत.

सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने वसई, नालासोपारा व बोईसर, शिवसेनेने पालघर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डहाणू तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विक्रमगड विधानसभा क्षेत्रावर विजय प्राप्त केला होता. दरम्यानच्या कालावधीत शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये फूट झाल्याने राजकीय परिस्थिती बदललेली आहे.

हेही वाचा – तासगाव नगराध्यक्षाच्या निवडीवरून आबा-काका गटातील संघर्ष तीव्र

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील जागा वाटपाचे समीकरण जवळपास निश्चित झाले असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पालघर, बोईसर, वसई व नालासोपारा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डहाणू, राष्ट्रवादी शरद पवार गटाने विक्रमगड व पालघर तर काँग्रेस पक्षाने वसई व नालासोपारा जागा मिळण्याबाबत प्रबळ दावा केला आहे. यापैकी नालासोपारा व्यतिरिक्त इतर जागांवर निश्चिती जवळपास झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

महायुतीचे ज्या ठिकाणी विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी त्या पक्षांना पुन्हा संधी देण्याचे सूत्र विचाराधीन असल्याने पालघर येथे शिवसेना, विक्रमगड येथे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे दावा करण्यात आला आहे. भाजपाने जिल्ह्यातील सर्व सहा जागांवर दावा केला असून पालघरची जागा आपल्याला मिळावी व बदल्यात शिवसेनेला इतरत्र संधी मिळावी असा प्रस्ताव ठेवल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचे सूत्र अंतीम होईपर्यंत संबंधित विधानसभा क्षेत्रांमध्ये उमेदवार निश्चिती करणे कठीण झाले असून पालघर, बोईसर, नालासोपारा येथे प्रत्येक पक्षातून अनेक उमेदवार इच्छुक असल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिनिधित्व करणाऱ्या बहुजन विकास आघाडीतर्फे वसई, नालासोपारा व बोईसर या तीनही ठिकाणी उमेदवारी देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू ठेवल्या असून उर्वरित तीन मतदारसंघांमध्ये पक्षाची भूमिका इतर उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पक्षांतर केलेले इच्छुक उमेदवारीच्या प्रतीक्षेत

सुमारे दीड वर्षांपूर्वी माजी आमदार विलास तरे व अमित घोडा यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला होता. विलास तरे यांनी बोईसर तर अमित घोडा यांनी डहाणू मतदारसंघात उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून तिकीट नाकारल्यानंतर तत्कालीन खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेतून भाजपामध्ये पक्षांतर केले होते. राजेंद्र गावित हे पालघर विधानसभा मतदारसंघामधून इच्छुक आहेत. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर काही काळाने कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. ते बोईसर विधानसभा क्षेत्रामधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत तर शिवसेनेतील फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ तुफान बॅनरबाजी करणारे डॉ. विश्वास वळवी यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला असून ते बोईसर जागेवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

हेही वाचा – नांदेडची पोटनिवडणूक कधी ?

लोकप्रतिनिधी उमेदवारीच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यातील सर्व विद्यमान आमदार आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपले नशीब आजमावू पाहत असून आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आगामी निवडणूक लढवणार की नाही याबाबत अधिकृत वक्तव्य केलेले नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविणारे प्रकाश निकम तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी यापूर्वी राहिलेल्या सुरेखा थेतले, भारती कामडी व वैदेही वाढाण यांच्यासह माजी राज्यमंत्री व विद्यमान समाज कल्याण सभापती मनीषा निमकर, वसई विरार महानगरपालिकेची प्रथम महापौर राजीव पाटील हे देखील उमेदवारीच्या चर्चेत आहेत. या इच्छुकांसह प्रत्येक पक्षातून अनेक तरुण, होतकरू नेते निवडणूक लढवण्याच्या तयारीत लागले असून जागा वाटपाचे सूत्र व अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या इच्छुकांपैकी बंडखोरी करण्याचे धारिष्ट्य कोण दाखवणार याबद्दल देखील सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.