नितीन पखाले, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीने खेचून आणले. हा निकाल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकजुटीला दिशा देणारा ठरला आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीने एकजूट राखली तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीतील समीकरणे बदलण्याचे संकेत यातून मिळत आहेत.

जिल्हा बँकेत काँग्रेसचे सर्वाधिक नऊ संचालक आहेत, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे तीन आणि शिंदे गट, शरद पवार गट व अजित पवार गटासह अपक्ष असे प्रत्येकी दोन व भाजपचा केवळ एक संचालक आहे. राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार राहिलेले दिवंगत बाळू धानोरकर यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तत्कालीन महाविकास आघाडीचे नेतृत्व केले. बँकेत केवळ एक संचालक असतानाही भाजपने फोडाफोडीचे राजकारण करण्याचा केला. मात्र, धानोरकर यांनी तो प्रयत्न हाणून पाडत आपले समर्थक वणीचे संचालक प्रा. टिकाराम कोंगरे यांना अध्यक्षपदी बसविले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याचा पहिला फटका येथील जिल्हा बँकेच्या सत्तेला बसला. बँकेत पुन्हा सत्तांतर घडविण्याचे मनसुबे भाजप व शिंदे गटाने आखले. परंतु, खा. धानोरकर यांच्यामुळे ते शक्य झाले नाही. दुर्दैवाने खा. धानोरकर यांचे निधन झाले आणि तीच संधी साधत भाजप, शिंदे गटाने इतर संचालकांना विश्वासात घेत धानोरकरांचे समर्थक अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या. याची कुणकुण लागताच राजकीय ‘गॉडफादर’ न उरलेल्या अध्यक्ष प्रा. कोंगरे यांनी या परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी रिंगणातून माघार घेत, अविश्वापूर्वीच राजीनामा दिला.

आणखी वाचा-अक्कलकोटमध्ये घालीन लोटांगण, करीन वंदन..!

त्यामुळे आपण सत्तेत असल्याने काहीही करू शकतो, हा अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप, शिंदे गटाने महाविकास आघाडीपेक्षा कमी संख्याबळ असूनही बँकेच्या अध्यक्षपदी आपला संचालक बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या. साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर करून भाजपकडून काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व अपक्ष संचालकांना फोडण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या संचालकांना सावध केले. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत भाजप, शिंदे गटाचा डाव हाणून पाडण्याची योजना आखली. शिंदे गटाचे संचालक राजुदास जाधव यांना अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरविण्यात आले, तर महाविकास आघाडीने अनुभवी संचालक मनीष पाटील (काँग्रेस) यांना उमेदवारी दिली. मनीष पाटलांच्या तुलनेत राजुदास जाधव राजकीय डावपेचांत कमी पडले. मात्र, सत्तेची साथ आणि लक्ष्मीचे वरदान असल्याने आपला विजय निश्चित होईल, या अतिविश्वासात भाजप, शिंदे गट राहिला. परंतु, महाविकास आघाडीची एकजुट आणि गुप्त मतदान यामुळे भाजप, शिंदे गटाचे पारडे खाली गेले.

महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी अध्यक्षपदासाठी आपल्या संचालकांची चहुबाजूंनी तटबंदी केल्याने शिंदे, भाजप गटाला फोडाफोडी करण्याची संधीच मिळाली नाही. परिणामी महाविकास आघाडीचे उमेदवार मनीष उत्तमराव पाटील विजयी झाले. त्यांना १५, तर प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार राजुदास जाधव यांना केवळ सहा मते मिळाली.

आणखी वाचा-भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर जेडीएसमध्ये खदखद, युती करताना अंधारात ठेवल्याचा बड्या मुस्लीम नेत्याचा आरोप!

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा आहे. त्यांच्या तुलनेत भाजप, शिवसेना कच्चागडी आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे राहणे यास भविष्यातील बदलाची नांदी मानली जाते. जिल्ह्यात महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकजूट राखली तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकीतील समीकरणे बदलून लोकांच्या मनातील सरकार येईल, अशी चर्चा जिल्ह्यात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Result of yavatmal district bank will give direction to the unity of mahavikas aghadi print politics news mrj
Show comments