संसदेच्या अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू होत आहे. २० जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले असले तरी मणिपूरच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांतील वातावरण तापलेले आहे. आज (३१ जुलै) पुन्हा याच विषयावरून विरोधक केंद्र सरकारला मणिपूरच्या परिस्थितीबाबत जाब विचारू शकतात. तर, सरकार विरोधकांवर पलटवार करून संसदेला वेठीस धरल्याचा आरोप करू शकते. मात्र, या गदारोळात सरकारकडून विधेयके मांडण्याचा सपाटाही सुरूच राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरोधकांच्या ‘इंडिया आघाडी’मधील २६ पक्षांच्या शिष्टमंडळाने सुटीच्या दिवशी मणिपूरचा दौरा केला आहे. या दौऱ्याबाबतची माहिती इतर नेत्यांना देण्यासाठी संसदेच्या इमारतीमध्ये सकाळी विरोधकांनी खासदारांची बैठक बोलावली आहे. शिष्टमंडळातील राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते, राज्यसभा खासदार मनोज कुमार झा यांच्याशी ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे पत्रकार मनोज सी. जी. यांनी वार्तालाप केला. झा यांनी या मुलाखतीत सांगितले, “मणिपूरचा संघर्ष थांबवायचा असेल, तर सर्वांत आधी तिथे समस्या आहे हे वास्तव स्वीकारावे लागेल. पण, या बाबतीतच मूळ अडचण निर्माण झाली आहे. केंद्र सरकार समस्या स्वीकारण्यात असमर्थ ठरलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन याचा ढळढळीत पुरावा देते.”

मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय करावे, असा प्रश्न झा यांना विचारला असता, ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी दिल्ली येथील विरोधक आणि मणिपूरमधील विरोधक यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. समस्या कबूल करून त्यावर काम केले पाहिजे. मणिपूरचे मुख्यमंत्री हे या समस्येशी निगडित असल्यामुळे त्यांच्याकडून समस्येचे समाधान होणे कठीण आहे. त्यांना बाजूला सारून विचार केला पाहिजे.”

मणिपूरची पुनर्बांधणी कशी करता येईल यावर झा यांचा अधिक जोर असल्याचे लक्षात आले. “मणिपूरमध्ये अफवांचे पीक आणि द्वेषाची पेरणी होऊ देण्यापेक्षा तिथे सकारात्मक विचार कसा रुजेल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. संवेदनशील भूमिकेतून तुम्ही जेव्हा सकारात्मकता रुजवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा लोकांना या संघर्षाच्या चटक्यातून बाहेर काढता येते. हे केले तरच, दोन समाजांमध्ये बंधुभावाचा दुवा परत निर्माण करणे आणि त्याद्वारे जनजीवन पुन्हा मार्गावर आणणे शक्य होईल”, अशी भावना झा यांनी व्यक्त केली.

मणिपूरच्या विषयावरून संसदेतच नाही, तर पश्चिम बंगालच्या विधानसभेतही गदारोळ सुरू आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाने या हिंसाचाच्या विरोधात ठराव आणला आहे. तृणमूल काँग्रेसचे मुख्य प्रतोद निर्मल घोष यांनी सांगितले की, आम्ही पावसाळी अधिवेशनात ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आलेल्या मानवतेवरील संकटावर चर्चा करणार आहोत. तर, सभागृहात भाजपा या ठरावाला विरोध करणार असल्याचे भाजपाचे नेते सांगत आहेत.

दरम्यान, संसदेत आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा-एनडीए युतीमधील पक्षांच्या खासदारांची बैठक घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीए युतीला आणखी मजबुती देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बैठक १० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. खासदारांचे ११ गट तयार करण्यात आले असून, आजपासून सलग ११ दिवस पंतप्रधान मोदी रोज एका गटाशी संवाद साधणार आहेत.

तर, दुसऱ्या बाजूला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या कस्टम्स टारिफ कायद्यातील पहिल्या भागात केलेल्या सुधारणा लोकसभेत मांडणार आहेत. एलपीजीचे आयात शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव या सुधारणेत करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘जन्म व मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, २०२३’ मंजुरीसाठी मांडणार आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर ‘द सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, २०२३’ हे विधेयक मांडणार आहेत; जे राज्यसभेत याआधीच मंजूर झाले आहे. त्यामुळे लोकसभेतही आता ते मंजूर होईल.

राज्यसभेत विधी व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल ‘द अॅडव्होकेट्स (सुधारणा) विधेयक, २०२३’ (The Advocates (Amendment) Bill) मांडले जाणार आहे. याशिवाय मेघवाल ‘द मिडियशन बिल, २०२१’ (The Mediation Bill, 2021) हे विधेयकदेखील मांडणार आहेत. माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर ‘द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स बिल, २०२३’ (The Press and Registration of Periodicals Bill, 2023) राज्यसभेत मांडणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हे जैविक विविधता (सुधारणा) विधेयक, २०२३ आणि जंगल (संवर्धन) सुधारणा विधेयक, २०२३ मंजुरीसाठी मांडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर शरद पवार माघार घेण्यासाठी तयार नसल्याचे दिसते. पक्षावरील पकड ढिली झाल्यानंतर शरद पवार पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करणार आहेत. मंगळवारी पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. शरद पवार यांना स्वपक्षातील आणि आघाडीतील काही नेत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असा सल्ला दिला आहे. आज महाविकास आघाडीचे एक शिष्टमंडळ शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांची भेट घेणार असून, त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहू नये, याबाबत मन वळविण्याचा प्रयत्न करणार आहे.

तेलंगणा राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळातील काही सदस्यांचे शिष्टमंडळ तयार करण्यात आले असून, ते तेलंगणात जाऊन निरीक्षण करणार आहेत. अमित शाह यांच्या सूचनेनंतर केंद्रीय शिष्टमंडळ तेलंगणासाठी रवाना झाले असल्याचे केंद्रीय मंत्री व तेलंगणा भाजपा प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riot in parliament again today over manipur pm modi will hold a meeting of the nda to prepare for the lok sabha kvg
Show comments