लोकसभा निवडणुकीनंतर आंध्र प्रदेश हे राज्य आता सर्वार्थाने महत्त्वाचे ठरले आहे. भाजपाला संपूर्ण बहुमत न मिळाल्याने एनडीएतील घटकपक्षांच्या जोरावर भाजपा केंद्रातील सत्तेत आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणजे एन. चंद्राबाबू नायडू यांचा आंध्र प्रदेशमधील तेलुगु देसम पक्ष होय. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्याही निवडणुका पार पडल्या असून त्यामध्ये सत्ताधारी वायएसआरसीपी पक्षाचा धुव्वा उडवण्यात एनडीए आघाडीला यश आले आहे. टीडीपी आणि भाजपाबरोबरचा एक प्रमुख पक्ष म्हणजे जन सेना पार्टी होय. या पक्षाचा उदय आणि कामगिरी कमालीची ठरली आहे. ५५ वर्षीय अभिनेता पवन कल्याण याच्या या पक्षाने निवडणुकांमध्ये १०० टक्के स्ट्राईक रेट दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत लढवलेल्या सर्व २१ जागांवर आणि लोकसभेच्या लढवलेल्या दोन जागांवर या पक्षाने विजय मिळवला.

पवन कल्याण यांची फिल्मी कारकीर्द जशी सुरुवातीपासूनच कमाल होती, तसे राजकारणात मात्र घडले नाही. या प्रकारचे यश पहायला त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आणि प्रतीक्षाही करावी लागली. १४ मार्च २०१४ रोजी आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर पवन कल्याण यांनी आपल्या नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली होती. त्यांनी लोकांना केलेले आवाहन आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आंध्र प्रदेशच्या राजकारणात एक नवा दमदार पक्ष उदयाला येतो आहे, याची जाणीव तेव्हाच झाली होती. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना पवन कल्याण यांच्या जवळच्या एका सहकाऱ्याने सांगितले की, “कल्याण यांना माहीत होते की नव्या आंध्र प्रदेश राज्यामध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील वायएसआर काँग्रेस हा पक्ष ताकदवान ठरणार आहे, त्यामुळे त्यांनी तातडीने एनडीए आघाडीला पाठिंबा दिला.”

हेही वाचा : सरपंच ते ओडिशाचे पहिले भाजपा मुख्यमंत्री; कोण आहेत मोहन चरण माझी?

खरे तर २०१४ साली पवन कल्याण आणि जेएसपीने निवडणूक न लढवणे पसंत केले होते. त्यांनी एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील टीडीपी पक्षाला पाठिंबा देणे पसंत केले होते. त्यावेळीही टीडीपी एनडीए आघाडीतच होता. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएसपीला तेव्हा टीडीपी पक्षाकडून आदरभाव मिळाला नव्हता, तसेच आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरूनही जेएसपी एनडीएतून बाहेर पडला होता. त्यानंतर याच मुद्द्यावरून फेब्रुवारी २०१८ मध्ये टीडीपीनेही एनडीएची साथ सोडली होती. त्यानंतर २०१९ मध्ये जेएसपीने पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणे पसंत केले. त्यावेळी जेएसपीने बहुजन समाज पार्टी आणि डाव्यांबरोबर युती करत आंध्र प्रदेशमधील विधानसभा आणि लोकसभेच्या समांतरपणे चालणाऱ्या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांनी लढवलेल्या विधानसभेच्या १३७ जागांपैकी फक्त एका जागेवरच त्यांना विजय मिळवता आला; तर लोकसभेच्या लढवलेल्या १८ जागांपैकी एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. स्वत: पवन कल्याणही भीमावरम आणि गजुवाका या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. याहून वाईट गोष्ट म्हणजे विधानसभेमध्ये निवडून गेलेल्या एकमेव उमेदवारानेही वायएसआरसीपी पक्षात जाणे पसंत केले.

मात्र, पक्षाअंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण यांनी जेव्हा पक्षाची निर्मिती केली तेव्हाच त्यांनी १५ वर्षांचे नियोजन आखलेले होते. त्यामुळे या पराभवांनी ते डगमगले नाहीत. “राजकारणात काय करायचे आहे, याबाबत त्यांच्याकडे स्पष्टता होती. पैशाच्या जोरावर निवडणुका न लढताही जिंकता येऊ शकतात, हे त्यांना लोकांना दाखवून द्यायचे होते, त्यामुळे त्यांना आपण हरू की जिंकू अशी फारशी चिंता नव्हती”, असे जेएसपीच्या एका नेत्याने सांगितले. २०१९ मधील पराभवानंतर, कल्याण आपल्या पक्षातील नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद करत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत राहिले. “कार्यकर्ता हा घटक जेएसपीचा कणा असल्याने ते कार्यकर्त्यांशी अधिक संवाद करत राहिले. त्यांनी नेत्यांकडून माहिती घेण्यापेक्षा कार्यकर्त्यांकडून घेणे पसंत केले. एकीकडे कल्याण पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत होते, तर दुसरीकडे पक्षाचे दुसरे नेतृत्व असलेले नादेंडला मनोहर पक्षवाढीसाठी प्रयत्नशील होते”, असे दुसऱ्या एका नेत्याने सांगितले.

जेएसपीच्या सूत्रांनी असाही दावा केला की, जगन मोहन रेड्डी आंध्र प्रदेशच्या राजकारणात फार काळ टिकू शकणार नाहीत, याची कल्पना पवन कल्याण यांना आधीपासूनच होती. एका पक्ष नेत्याने याबाबत बोलताना सांगितले की, “वायएसआरसीपी पक्षाच्या एका वर्षाच्या सत्ताकाळानंतरच कल्याण यांना लक्षात आले की, जगन मोहन रेड्डी राज्यासाठी फार काही चांगली कामे करत नाहीत. त्यामुळे वायएसआरसीपी पक्षाविरोधातील मते फुटू नयेत, असा विचार करून त्यांनी पुन्हा एनडीएमध्ये जाणे पसंत केले.” २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याण यांनी पक्षाच्या प्रचाराची तयारी सुरू केली. ते ‘वराहे यात्रा’ नावाची यात्रा काढून लोकांमध्ये गेले. जेएसपीच्या जिल्हास्तरावरील एका नेत्याने म्हटले की, “त्यांनी जातीपातींच्या पलीकडे जाण्यात यश मिळविले. कठोर असे परिश्रम घेऊन ते घराघरात पोहोचले. कल्याण स्वत: कापू समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांना या जातीचाही पाठिंबा मिळत होताच. त्यापलीकडे जाऊन दलित आणि ओबीसी समाजातील लोकही त्यांच्याकडे नवे नेतृत्व म्हणून आशेने पाहू लागले.”

“जगनपासून राज्याला वाचवा” असे त्यांच्या प्रचारमोहिमेचे घोषवाक्य होते. या माध्यमातून वायएसआरसीपी विरोधी मते आपल्या बाजूने वळवण्यात ते यशस्वी ठरले. टीडीपीबरोबर युती करण्याचे प्रयत्न २०२० पासूनच सुरू झाले होते. त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यातील निवडणूक लढवायला हवी, याबाबत आग्रह धरण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आंध्र प्रदेशमधील भाजपा या युतीच्या विरोधात होती. तरीही कल्याण यांनी कसे प्रयत्न केले, हे सांगताना कल्याण यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने सांगितले की, “आमच्या नेतृत्वाने प्रयत्न केल्यामुळेच हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवू शकले, ही बाब कुणीही नाकारू शकणार नाही. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ही कल्पना भाजपासमोर मांडली, तेव्हा त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले. मात्र, भाजपा नेतृत्वाकडून फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, तरीही कल्याण यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले.”

हेही वाचा : जे. पी. नड्डा यांच्यानंतर दलित वा महिला नेतृत्वाला मिळणार भाजपा अध्यक्षपदाची संधी?

सप्टेंबर २०२३ मध्ये चंद्राबाबू नायडू यांना ‘एपी स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आली. ते ५३ दिवस तुरुंगात होते. कल्याण चंद्राबाबू नायडूंना तुरुंगात जाऊन भेटू इच्छित होते, मात्र जगन सरकारने त्यांना भेटू दिले नाही. यावेळी एक वेगळंच नाट्य आंध्र प्रदेशमध्ये पहायला मिळाले. त्यामुळे जन सेना पार्टी फारच चर्चेत आली होती. त्यावेळी तिथेच जेएसपीने टीडीपीबरोबर युती करण्याची घोषणा केली होती. मात्र, अजूनही भाजपाकडून होकार मिळालेला नव्हता. कल्याण यांचे प्रयत्न सुरूच होते. सरतेशेवटी मार्च महिन्यामध्ये भाजपाला राजी करण्यात जेएसपीला यश मिळाले. सत्ताधारी वायएसआरसीपी पक्षासमोर मजबूत अशा एनडीए आघाडीने आकार घेतला.

एनडीएच्या या युतीमध्ये कल्याण यांनी पडती बाजू घेत कमी जागांवर निवडणूक लढवणे पसंत केले. यामुळे जेएसपीचे काही नेते आणि कार्यकर्ते नाराजही झाले होते. या निवडणुकीमध्ये टीडीपी-जेएसपी-भाजपा युतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दमदार यश मिळवले. कल्याण यांचा पिठापुरम विधानसभा मतदारसंघातून तब्बल ७० हजार मतांनी विजय झाला. बुधवारी चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर कल्याण यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.