केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपप्रणित केंद्रातील सरकारने देशात लादलेल्या अघोषित आणीबाणीविषयी बोलायला हवं, असे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. देशात लोकशाहीच्या नावाने हुकुमशाही सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे जयप्रकाश नारायण यांची विचारधारा विसरल्याचा हल्लाबोल अमित शाह यांनी केला होता. त्यावर तेजस्वी यादव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“नकला व कलाविष्कार यातील फरक…”, मोदींचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत काँग्रेसचा टोला!

“शाह जे काही म्हणाले ते केवळ बकवास आहे. भाजपाचा जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या विचारधारेबरोबर काहीही संबंध नाही. या हिंदूत्ववादी पक्षाला कार्यक्रमाचे व्यवस्थापन कसे करायचे हे चांगलेच ठाऊक आहे. जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीचा सिताब दियारामध्ये आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम त्यापैकी एक होता. या कार्यक्रमात शाह यांनी हजेरी लावली होती”, असे यादव यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या गावाला ११ ऑक्टोबरला भेट दिली होती. जयप्रकाश नारायण यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले होते. “जयप्रकाश नारायण यांच्या शिष्यांनी त्यांच्या विचारधारेचा त्याग केला आहे. ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत” अशी टीका यावेळी शाह यांनी केली होती.

निवडणूक आयोगाने प्रथा-परंपरा मोडली ; एकाच वेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे टाळले

दरम्यान, आरजेडीचे दोन दिवसीय अधिवेशन नुकतेच दिल्लीत पार पडले. या अधिवेशनात बिहार आरजेडीचे अध्यक्ष जगदनंदा सिंह अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीवर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर तेजस्वी यादव यांनी स्पष्टीकरण दिलं. “तुम्हा लोकांना जगदनंदाजी यांच्याविषयी नीट माहिती नाही. ते पक्षाचे खरे कार्यकर्ते आणि नेते आहेत. त्यांच्यात आणि पक्षात कुठलेही मतभेद नाहीत”, असे यादव यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास बिहार सरकार अपयशी ठरल्यानेच राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, असा आरोप भाजपाने केला आहे. हा आरोप निराधार असल्याची टीका यादव यांनी केली आहे. आधीच्या सरकारमध्ये दीर्घकाळ हा विभाग कोणी सांभाळला? भाजपाने सुशील मोदी, सुरेश शर्मा, तारकिशोर प्रसाद या आपल्याच पक्षातील लोकांना याबाबत विचारावे, असा सल्ला यादव यांनी दिला आहे.