मुंबई : ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील महानिर्मिती कंपनी, महावितरण, महापारेषण या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली. वीज बिलांची थकबाकी वाढल्याने महावितरण आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे.
या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी वेतनवाढीची माहिती दिली. यावेळी फडणवीस म्हणाले, तीनही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात मध्ये १९ टक्के व सर्व भत्त्यामध्ये २५ टक्के वाढ देण्याचे मान्य केले आहे. तसेच साहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधीकरिता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा ५०० रुपयांचा भत्ता एक हजार रुपये इतका करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>नवीन पर्यटन धोरणात विविध सवलती कर परताव्यात वाढ, जमीन नोंदणी कमी
७४ हजार कोटींची थकबाकी
वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली असली तरी वीज देयकांची थकबाकी वाढतच चालली आहे. महावितरणकडे कृषी, घरगुती, वाणिज्यिक आणि व्यावसायिक आदी विविध संवर्गातील ग्राहकांची ७४ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून त्यापैकी ४५-४६ हजार कोटी रुपये थकबाकी कृषी ग्राहकांची आहे.
© The Indian Express (P) Ltd