भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून इंडिया आघाडीच्या घटकपक्षांत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी इंडिया आघडीतून बाहेर पडत एनडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर आता इंडिया आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे इंडिया आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. असे असतानाच आत उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीनेही मोठा निर्णय घेतला आहे. या पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमुळे आता इंडिया आघाडीत आणखी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या यादीत ११ उमेदवार, डिंपल यादव यांना उमेदवारी

समाजवादी पार्टीने आपल्या पहिल्या यादीत एकूण १६ जागांसाठी उमेदवार दिले आहेत. या पहिल्याच यादीत समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्या पत्नी तथा खासदार डिंपल यादव यांनाही तिकीट देण्यात आले आहे. त्या मैनपुरी या आपल्या मतदारसंघातूनच निवडणूक लढवतील. मैनपुरी हा मतदारसंघ यादव घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. याच जागेवरून अखिलेश यादव यांचे वडील तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी निवडणूक लढवलेली आहे. कित्येक वर्षे मुलायमसिंह यादव यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आता याच मतदारसंघातून डिंपल यादव खासदार असून त्या पुन्हा एकदा याच जागेवरून निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा >> बिहार, पंजाब, बंगालनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही इंडिया आघाडीत खदखद? अखिलेश यादव यांची भूमिका काय?

काँग्रेसच्या परवनगीची आवश्यकता नाही- अखिलेश यादव

आपल्या या निर्णयावर नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली. मला जे योग्य वाटेल तो निर्णय मी घेणार आहे. मला असे निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे अखिलेश यादव म्हणाले आहेत.

काँग्रेस-समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावर चर्चा

समाजवादी पार्टी हा पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात उत्तर प्रदेशसाठी जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप या चर्चेतून सकारात्मक बाब समोर आलेली नाही.

काँग्रेसला हव्यात १५-१६ जागा

सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये १५ ते १६ जागा हव्या आहेत. तर आम्ही काँग्रेसला फक्त ११ जागा देऊ शकतो, अशी अखिलेश यादव यांची भूमिका आहे. समाजवादी पार्टीला मध्य प्रदेशमध्ये एक जागा हवी आहे.ही जागा मिळावी यासाठी समाजवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच आता अखिलेश यादव यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकूण १६ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >>> आधी सडकून टीका, आता थेट नितीश कुमारांसह सत्तेत सहभागी? बिहाचे नवे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी कोण आहेत?

काँग्रेसचा फक्त एका जागेवर विजय

काँग्रेस उत्तर प्रदेशमधील अमेठी, रायबरेली, गाझियाबाद, गौतम बुद्धनगर, बरेली या जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ८० पैकी ६७ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसचा फक्त एका जागेवर विजय झाला होता. काँग्रेसला एकूण ६.३६ टक्के मते मिळाली होती.

२०१९ सालच्या निवडणुकीत काय घडले होते?

२०१९ सालच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने बसपाशी युती केली होती. या युतीमुळे भाजपाला चांगलाच फटका बसला होता. भाजपाच्या जागा ७१ वरून ६२ पर्यंत खाली आल्या होत्या. बसपाने ३८ तर सपाने ३७ जागा लढवल्या होत्या. यापैकी बसपाने १० जागा जिंकत एकूण १९.४३ टक्के मते मिळवली होती, तर सपाने ५ जागा जिंकत १८.११ टक्के मते मिळवली होती.

हेही वाचा >> राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे नाराज असल्याची चर्चा; आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची डोकेदुखी वाढणार?

२०१७ सालच्या निवडणुकीत काय घडले होते?

दरम्यान, याआधी २०१७ साली काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. या निवडणुकीत समाजवादी पार्टीने २९८, तर काँग्रेसने १०५ जागा लढवल्या होत्या. काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. समाजवादी पार्टीचा एकूण ४७ जागांवर, तर काँग्रेसचा फक्त ७ जागांवर विजय झाला होता. काँग्रेसला ६.७५ टक्के, तर समाजवादी पार्टीला २१.८३ टक्के मते मिळाली होती.

बंगाल, पंजाबमध्ये अस्थिरता

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आमचे इंडिया आघाडीशी जागावाटपावर बोलणे चालू नाही, आम्ही लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार असे जाहीर केले. आम आदमी पार्टीचे (आप) नेते तथा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीदेखील आम्ही पंजाबमध्ये लोकसभेची निवडणूक एकट्यानेच लढवणार अशी भूमिका घेतली आहे. तर बिहारमध्ये नितीश कुमारदेखील भाजपाशी केली आहे. त्यामुळे भविष्यात इंडिया आघाडीचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. 

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party chief akhilesh yadav released first candidate list for upcoming lok sabha election 2024 amid seat sharing talks with india alliance congress prd