अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : कधीकाळी नाशिक लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समीर भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यामागे पक्षाचे नेमके काय समीकरण आहे, याचा अंदाज स्थानिक पदाधिकारी आपल्यापरीने बांधत आहेत. महायुतीत नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता नाही की काका छगन भुजबळांनी नाशिकच्या राजकारणातून त्यांचा पत्ता कापला, असे विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.

राष्ट्रवादीने (अजित पवार गट) समीर भुजबळ यांची मुंबईच्या अध्यक्षपदी निवड केली. एकसंघ राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पक्षाकडून देशाच्या आर्थिक राजधानीत सर्वार्थाने सक्षम, तुल्यबळ व्यक्तीचा शोध सुरू होता. अखेर तो भुजबळांच्या कुटुंबापर्यंत येऊन संपला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या पदासाठी समीर यांचे नाव सुचवले. काका भुजबळांवर त्यांना राजी करण्याची गळ घातली. त्यानुसार ही नियुक्ती झाल्याचे सांगितले जाते. पूर्वी एकदा सचिन अहिर यांच्याकडे मुंबईची जबाबदारी होती. तेव्हा समीर हे त्यांच्यासमवेत काम करीत होते. पक्ष दुभंगल्यानंतर मुंबईत प्रभावी संघटना बांधणीसाठी अन्य कुणी योग्य व्यक्ती मिळत नव्हती. त्यावर समीर भुजबळ हे उत्तर शोधण्यात आल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात होत आहे.

हेही वाचा >>> भाजप आमदाराच्या दाव्यानुसार सांगली सुधारेल का?

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये नव्या राजकीय संघर्षाची नांदी झाली. दुसरीकडे पक्षाचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यात प्रारंभापासून मधूर संबंध आहेत. त्यांच्याकडून सामंजस्याने राजकीय मशागतीचे प्रयोग केले जातात. राष्ट्रवादीतून अजितदादा गट वेगळा झाल्यानंतर मुंबईत एमईटीमध्ये पहिला मेळावा पार पडला होता. त्याच्या नियोजनाची जबाबदारी समीर यांच्याकडे होती. अल्पकाळात यशस्वी नियोजन करीत त्यांनी पक्षाच्या नेत्यांचे लक्ष वेधले होते. मुंबईचे अध्यक्षपद हे त्याचे फलित मानले जाते. या नव्या जबाबदारीमुळे नाशिकच्या राजकारणापासून ते दूर झाले आहेत.

हेही वाचा >>> हिंगोली काँग्रेसमधील गटबाजीने अशोक चव्हाण संतापले, राष्ट्रवादीच्या आशा पल्लवित

नाशिक शहरात २००९ मध्ये राष्ट्रवादीचे अधिवेशन झाले होते. तेव्हा समीर यांनी भव्य, दिव्य स्वरुपात त्याचे आयोजन केले होते. याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले होते. लगोलग पक्षाने त्यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. पुढील काळात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हातातून गेला. एकदा काका छगन भुजबळ यांनाही मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. महायुतीत हा मतदारसंघ अजितदादा गटाला मिळण्याची सूतराम शक्यता नाही. शिवसेनेचे (शिंदे गट) हेमंत गोडसे हे सलग दोन वेळा या मतदार संघात निवडून आले आहेत. शिवसेना तडजोड करणार नाही. तर तीन आमदार असल्याने भाजपकडून त्यावर दावा सांगितला जात आहे. बदललेत्या समीकरणात काकांनी पुतण्याची मुंबईत राजकीय पुनर्वसनाची तयारी केल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा >>> भाजपमध्ये दिया कुमारी या वसुंधराराजे यांना पर्याय ठरू शकतील का ?

येवला विधानसभा मतदार संघात काकांनी पुतण्या समीरला निवडणूक वगळता फारसा हस्तक्षेप करू दिला नाही. छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज हे नांदगाव विधानसभा मतदार संघातून दोन वेळा निवडून आले होते. त्यांच्या प्रचाराची धुरा समीर यांनी सांभाळली होती. नंतर समीर यांना नांदगावमधून रिंगणात उतरविण्याची चर्चा सुरू झाली. तोवर हा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) सुहास कांदे यांनी काबीज केला. नाशिकच्या राजकारणात भुजबळ कुटुंबाच्या हाती येवला वगळता कुठलाही मतदारसंघ नाही. खासदारकीच्या काळात विकास कामे करूनही मतदारांनी नाकारल्याचे शल्य समीर यांना असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा विचार त्यांनी सोडून दिल्याचे बोलले जाते. या एकंदर स्थितीत मुंबईत नव्या संधीचा शोध घेतला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer bhujbal out of nashik politics or not print politics news ysh
Show comments