सांंगली : सांगलीच्या आखाड्यात उतरलेले भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात मिरजेतील काही माजी नगरसेवकांनी केलेला उठाव म्हणजे पेल्यातील वादळच ठरण्याची चिन्हे असल्याचे सांगलीत झालेल्या शक्तिप्रदर्शनावेळी दिसून आले. ‘मिरज पॅटर्न’ म्हणून मिरजेतील भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी गेल्या १० वर्षांत भाजपच्या खासदारांनी मिरजेसाठी काही विकास कामे केली नसल्याचा आक्षेप घेत सवती चूल मांडत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासमोरच आम्ही विशाल पाटील यांचेच काम करणार असल्याचे सांगत विधानसभेसाठी मात्र भाऊ आम्ही तुमच्यासोबतच राहू म्हणत उठावाचा प्रयत्न केला. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या उठावाला कोणतेही महत्व न देता उरलेल्या पक्षाच्या नगरसेवकांसोबत मित्र पक्षांना सोबत घेत मिरज पॅटर्नचा डाव मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मिरज पॅटर्न म्हणून महापालिकेच्या राजकारणात गेली दहा वर्षांहून अधिक काळ सत्तेची गणितं मांडली जातात. ज्या ज्या वेळी सत्तेची खुर्ची मिळवण्याचा प्रसंग येतो त्या त्या वेळी पक्षीय ध्येय धोरणे बाजूला ठेवून केवळ मिरजकर म्हणून एकत्र येण्याचा पायंडा दिसून आला आहे. याच धर्तीवर माजी सभापती सुरेश आवटी यांनी काही सहकारी माजी नगरसेवकांना सोबत घेऊन खासदारकीच्या निवडणुकीत सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी सभापती निरंजन आवटी, संदीप आवटी हे दोन बंधू आणि शिवाजी दुर्वे या माजी नगरसेवकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या एका माजी महापौरांसह काँग्रेसच्या माजी नगसेवकांसोबत सवता सुभा मांडत असताना विद्यमान खासदारांना विरोध आणि विशाल पाटील यांना पाठिंबा अशी राजकीय डावपेचाची रचना करण्यात आली. हेही वाचा - “मी अयोध्येत गेलो तर त्यांना सहन झाले असते का?” काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांचा सवाल याची कुणकुण लागताच पालकमंत्री खाडे यांनी मिरजेतील भाजपच्या माजी नगरसेवकांची बैठक कार्यालयात बोलावली. यावेळी नाराजाकडून गेल्या दहा वर्षांत खासदारांनी मिरजेतील विकास कामाना निधी दिला नाही, आमची विचारपूस केली नाही असे सांगत यावेळी वेगळी भूमिका घेत असल्याचे सांगितले. मात्र, याचा परिणाम विधानसभेवेळी तुमच्यावर होऊ देणार नाही, त्यावेळी आम्ही तुमचेच असू असाही खुलासा करण्यात आला. मात्र, यामुळे मतांची टक्केवारी कमी होऊन याचे उत्तर पक्षाला द्यावे लागेल त्याचे काय या मंत्र्यांच्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नव्हते. यातच खासदार पाटील यांनी या मंडळीचे राजकारण म्हणजे धंदा असल्याचे सांगत निवडणुकीनंतर काय ते पाहून घेतो अशी तंबीही दिली. खासदार पाटील यांच्या विरोधात असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यातूनच गुरुवारी झालेल्या शक्तिप्रदर्शनात मिरजेतील उर्वरित नगरसेवक जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासोबत सांगलीच्या कार्यक्रमात उपस्थित राहून बाजूला सवता सुभा मांडणार्यांची ताकद मर्यादित असल्याचे दाखवून दिले. यामुळे खासदार पाटील यांच्या विरोधात एकगठ्ठा होऊ घातलेले राजकारण मोडीत काढण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्या दौर्याने केला असेच मानले जात आहे. हेही वाचा - गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार? आता पालकमंत्री म्हणून खाडे या नाराजांबाबत काय भूमिका घेतात हेही महत्वाचे ठरणार आहे. नाराजांची समजूत काढत असताना खासदारकी जशी महत्वाची आहे तशीच चार-सहा महिन्यांत होत असलेल्या विधानसभेची निवडणूकही महत्वाची आहे. भाजपमधील नाराजांना सांभाळून घेता घेता महायुतीतील घटक पक्ष नाराज होणार नाहीत याचीही खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे.