1999 to 2024 NCP Congress Journey: ३१ जानेवारी २०२४ हा दिवस कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतिहासात एक पक्ष म्हणून तितकाच महत्त्वाचा असेल जितका १५ मे १९९९ हा दिवस! २ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधलं सर्वात मोठं बंड करत पक्षाच्या ४० आमदारांसह सत्ताधारी भाजपा-शिंदे गट युतीत प्रवेश केला आणि तिची ‘महायुती’ केली. पण ही कृती वैध की अवैध? याचा निर्णय ३१ जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत. पण दुसरी तारीख ही थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माशीच निगडित आहे. कारण पक्षाचा जन्म जरी १७ जून १९९९ रोजी झालेला असला, तरी शरद पवारांचं ज्या पत्रामुळे अंतिमत: काँग्रेसमधून निलंबन झालं, त्या पत्रावर तारीख होती १५ मे १९९९!

सोनिया गांधींना अध्यक्षपदासाठी विनंती करण्यापासून ते त्यांनाच पंतप्रधानपदी बसू नये अशी मागणी करणारं पत्र पाठवेपर्यंतच्या काळात नेमकं काय काय घडलं, याचा सविस्तर उल्लेख खुद्द शरद पवारांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती.. राजकीय आत्मकथा’ या पुस्तकात केला आहे. त्या काळातील घडामोडींच्या तारखांचा मेळ घातल्यास या उल्लेखांची खातरजमा अगदी सहज करता यावी. सोनिया गांधींनी पक्षाध्यक्ष व्हावं, असा प्रस्ताव घेऊन १०, जनपथवर जाणाऱ्यांमध्ये शरद पवारांचाही समावेश होताच. कारकिर्दीची मधली काही वर्षं सोडली, तर शरद पवार व काँग्रेस हे अतूट समीकरण होतं. पण मग सोनिया गांधींनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर वर्षभरात असं काय घडलं ज्यामुळे काँग्रेसशी असलेलं हे समीकरण मोडून शरद पवारांनी वेगळा सवतासुभा केला?

sharad pawar
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी महायुतीच्या नेत्यांची रीघ
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram join sharad pawar NCP
गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…
bjp haryana
हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?

नव्वदचं दशक देशाच्या राजकारणासाठी प्रचंड घडामोडींचं ठरलं. जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण आणि त्याचे पडसाद यापासून या घडामोडींना सुरुवात झाली. भाजपाचे तत्कालीन प्रमुख नेते लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा, त्यापाठोपाठ बाबरी मशीद पाडण्याची घटना, मुंबईतील बॉम्बस्फोट, राजीव गांधींची हत्या, काँग्रेसच्या अध्यक्षपदी सीताराम केसरींची निवड, पी. व्ही. नरसिंहराव सरकारची ढासळती विश्वासार्हता, १९९६च्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव अशा अनेक घटनांनी या दशकाचा पूर्वार्ध गाजला. उत्तरार्ध तर आणखी नाट्यमय ठरला. अटल बिहारी वाजपेयींचं अत्यल्पकाळ चाललेलं सरकार, एका मतानं पाडाव, एच. डी. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांच्या पंतप्रधानपदाचा अल्पकाळ, काँग्रेसची सरकारला पाठिंबा देण्याबाबतची धरसोड वृत्ती या अनेक घटनांमुळे राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण ढवळून निघालं होतं. दिल्लीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं.

समाजवादी पार्टीला मोठा धक्का, मोठे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार!

याच काळात राजकीय घडामोडींनी गाजलेल्या दशकाची सांगताही तितक्याच नाट्यमयरीत्या झाली नसती तरच नवल! सोनिया गांधींचा राजकारणात प्रवेश, काँग्रेस अध्यक्षपदावर निवड आणि अध्यक्ष म्हणून पहिलं मोठं आव्हान… शरद पवार! ज्यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी गळ घातली, त्याच शरद पवारांनी विरोधात शड्डू ठोकून वेगळीच मोहीम उघडल्यामुळे सोनिया गांधींसमोर पक्षाची पत आणि जनतेचं मत पुन्हा काँग्रेसच्या बाजूने वळवण्यासोबतच पक्षांतर्गत निर्माण झालेलं आव्हान पेलण्याचा पेच निर्माण झाला. अवघ्या काही दिवसांत घडामोडी घडल्या आणि त्यांची सांगता शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोषणा करण्यात झाली!

काँग्रेसचा पराभव आणि ज्येष्ठांना चिंता!

सीताराम केसरींच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या १९९६ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला. अवघ्या १४० जागा पक्षाच्या पदरात पडल्या. भाजपा पहिल्यांदाच देशातला सर्वात मोठा पक्ष ठरला. पण भाजपालाही पूर्ण बहुमत नसल्यामुळे वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार १३ दिवसांत गडगडलं. त्यामुळे भाजपाविरोधी संयुक्त आघाडीचा प्रयोग राबवला गेला. आधी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा आणि नंतर इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधान म्हणून काँग्रेसनं पाठिंबा दिला. काँग्रेसनं पाठिंबा काढल्यामुळे गुजराल सरकार कोसळलं आणि देशात मुदतपूर्व निवडणुका लागल्या.

एकीकडे राष्ट्रीय पातळीवर स्थिर सरकार देण्यात सर्वच पक्षांना अडचणी येत असताना दुसरीकडे काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्थिरता निर्माण झाली. सीताराम केसरींच्या धरसोड वृत्तीला कंटाळून काँग्रेसमधील काही ज्येष्ठांनी सोनिया गांधींना अध्यक्षपद स्वीकारण्याची गळ घातली. त्यात ए. के. अँटनी, गुलाम नबी आझाद आणि खुद्द शरद पवार यांचा समावेश होता. त्यापाठोपाठ पक्षातील इतरही अनेक नेत्यांनी हीच मागणी केली. अखेर तामिळनाडूत ज्या ठिकाणी राजीव गांधींची हत्या झाली, त्या श्रीपेरमबुदूरला भेट देऊन सोनिया गांधींनी राजकीय प्रवेशाची घोषणा केली. तर १४ मार्च १९९८ रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सीताराम केसरींना हटवून सोनिया गांधींची अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य काय ?

सोनिया गांधींशी वितुष्ट का वाढलं?

ज्या सोनिया गांधींना आग्रहानं पक्षाचं अध्यक्ष केलं, त्यांच्याशीच संबंध का बिघडले? यावर शरद पवारांनी आपल्या आत्मकथेमध्ये भूमिका मांडली आहे. हे संबंध बिघडायला त्यांनी १४ मार्च १९९८ ते १५ मे १९९९ या जवळपास १ वर्षात घडलेल्या काही ठळक घडामोडी अधोरेखित केल्या. त्यांच्यामते सोनिया गांधींच्या कारकिर्दीत काँग्रेसमध्ये राज्यातल्या नेतृत्वाला हायकमांडकडून आदराचं, बरोबरीचं स्थान मिळालं नाही. याशिवाय सोनिया गांधींच्या जवळच्या वर्तुळातील काही नेतेमंडळींनी आपल्याविरोधात सोनिया गांधींचे कान भरल्याचाही आरोप शरद पवारांनी केला आहे.

“इंदिरा गांधींचं मत डावलून शरद पवारांनी महाराष्ट्रात ‘पुलोद’ची स्थापना केली, राजीव गांधीही शरद पवारांवर नाराज होते, त्यामुळेच त्यांनी शरद पवारांविरोधात महाराष्ट्रातील आमदारांना बंड करायला सांगितलं होतं (मुख्यमंत्रीपदाचा काळ) असं हे नेते सोनिया गांधींना सांगत असतं. त्यामुळे आमच्यात दरी वाढत गेली” असं पवारांनी पुस्तकात म्हटलं आहे. पण त्यापुढे त्यांनी काही अशा प्रसंगांचा उल्लेख केला, जे या बिघडलेल्या संबंधांना थेट कारणीभूत ठरले.

१९९८ची लोकसभा निवडणूक आणि पवारांची ‘नियुक्ती’

१९९८च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसनं आपल्या घटनेत बदल करत निवडून न आलेल्या व्यक्तीचा (अर्थात सोनिया गांधी) संसदीय पक्षनेतेपदी निवडीचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर सोनिया गांधींनी शरद पवारांची लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी, तर डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. “लोकसभेत पक्षाच्या बहुसंख्य खासदारांचा कौल माझ्या बाजूने असताना कुणीतरी माझी ‘नियुक्ती’ करणं मला झोंबणारं होतं. जे साहजिक होतं, त्यासाठी कुणीतरी नियुक्ती करण्याची गरज काय” असा मुद्दा पवारांनी उपस्थित केला.

संसदीय समित्यांची यादी..दुसरा खटका उडाला!

यानंतर संसदीय समित्यांसाठी पक्षातील सदस्यांच्या यादीवरून सोनिया गांधींशी मतभेद झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. “सोनिया गांधींच्या मान्यतेनंतरच मी ठरलेली यादी लोकसभा अध्यक्षांकडे सोपवली. पण दुसऱ्याच दिवशी पक्षाचे व्हीप थॉमस कुरियन यांनी आणखी एक यादी दिल्याचं त्यांनी मला सांगितलं. याबद्दल मी सोनिया गांधींकडे विचारणा केली असता त्यांनी मलाच मी दिलेली यादी मागे घ्यायला सांगितलं. हे माझ्यासाठी प्रचंड धक्कादायक होतं”, असं पवारांनी पुस्तकात सांगितलं आहे. तिथेच काँग्रेसमध्ये आपल्याला भवितव्य नसल्याची खूणगाठ मनाशी पक्की केल्याचंही पवारांनी नमूद केलं आहे.

मोदी – पटेल भेटीने २०१९ च्या प्रचार सभेतील मोदींच्या पटेलांवरील टीकेची आठवण

सोनिया गांधींचा सरकार स्थापनेचा दावा!

शरद पवारांनी आपल्या पुस्तकात अटल बिहारी वाजपेयींचं सरकार कोसळल्यानंतरचा घटनाक्रम विशद केला आहे. “वाजपेयींचं सरकार कोसळल्यानंतर अर्जुन सिंह यांनी सोनिया गांधींना सरकार स्थापनेचा दावा करण्यास भरीस पाडलं. त्यांनी राष्ट्रपती के. आर. नारायणन् यांच्याकडे आपल्याला २७२ खासदारांचा पाठिंबा असल्याचं सांगत सरकार स्थापनेचा दावा करण्याची तयारी केली होती. पण सपाचे मुलायमसिंह यादव यांनी सोनिया गांधींच्या विदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या पंतप्रधानपदाला आपला विरोध असल्याचं जाहीर केलं आणि हा प्रयत्न बारगळला”, असं पवारांनी म्हटलं आहे.

१५ मे १९९९ ची कार्यकारणीची बैठक आणि ‘ती’ चर्चा!

एव्हाना दोघांमधले संबंध प्रचंड ताणले गेले असतानाच १५ मे १९९९ रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधींनी तोपर्यंत पक्षाबाहेर दबक्या आवाजात चाललेल्या विदेशी जन्माच्या मुद्द्याला हात घातला. “आगामी निवडणुकीत माझ्या विदेशी असण्याचा मुद्दा विरोधकांकडून उचलला जाण्याची शक्यता आहे. त्यावर सदस्यांनी आपली भूमिका मांडावी असं सोनिया गांधींनी सांगितल्यानंतर सर्वात आधी अर्जुनसिंहांनी सोनिया गांधींवर निष्ठा व्यक्त करत त्यांच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा दर्शवला. त्यापाठोपाठ ए. के. अँटनी, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद यांनीही तशीच भूमिका मांडली. पण नंतर सोनिया गांधींचे तेव्हाचे विश्वासू पी. ए. संगमांनी सोनिया गांधींच्या विदेशी असण्याचा मुद्दा विरोधकांकडून उचलला जाणारच, त्याला आपण कसं मोडून काढायचं, याचा विचार करायला हवा अशी भूमिका मांडली”, असं शरद पवारांनी पुस्तकात म्हटलं आहे.

संगमा यांच्यापाठोपाठ तारीक अन्वर यांनीही तीच भूमिका मांडल्यानंतर खुद्द शरद पवारांनीही या भूमिकेला आपलं समर्थन दिलं. “विरोधकांच्या प्रचाराला आपण प्रत्युत्तर देऊ शकू, पण सोनिया गांधींच्या विदेशी असण्याच्या मुद्द्याचा प्रचार केला जाणारच नाही, असं मानणं म्हणजे दिशाभूल करणारं ठरेल”, असं म्हणत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“लोक संतापलेत, तुम्हाला मारहाण करतील”

शरद पवार त्या दिवशी दिल्लीहून पुण्यात परतेपर्यंत सोनिया गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दिल्लीत शरद पवार, तारीक अन्वर व पी. ए. संगमा यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. “तुम्ही या भागात पाऊलही टाकू नका, लोक संतप्त असल्यामुळे तुम्हाला मारहाण करतील” असा इशारा पोलिसांनी आपल्याला दिल्याचं शरद पवारांनी तेव्हाची स्थिती वर्णन करताना म्हटलं आहे.

जातनिहाय जनगणनेवर भाजपची सा‌वध भूमिका

पत्र दिल्लीला पोहोचलं आणि निलंबनाचे आदेश निघाले!

हा सगळा गोंधळ चालू असताना शरद पवारांनी त्याच दिवशी पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांच्यासोबत बसून एका पत्राचा मसुदा तयार केला. विरोधी पक्षांकडून सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दा कशा प्रकारे उपस्थित केला जाऊ शकतो, त्यामुळे काँग्रेससमोर कसं आव्हान निर्माण होऊ शकतं, भारतीयत्वाच्या भावनेसाठी, एकसंघ यशासाठी जन्माने भारतीय असणारी व्यक्ती पंतप्रधानपदी येणं कसं आवश्यक आहे यावर आधारित मुद्दे या पत्रात नमूद करण्यात आले होते. हे पत्र दिल्लीला सोनिया गांधींकडे पोहोचलं आणि त्याच दिवशी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यानंतर शरद पवारांनी या दोघांसह मिळून महिन्याभराच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्याची घोषणा केली!