मधु कांबळे
मुंबई : राजकीय सभांसाठी प्रतिष्ठेचे मानल्या गेलेल्या शिवाजी पार्कवरील ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या संविधान सन्मान महासभेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. संपूर्ण मैदान व्यापून टाकणारया उत्साही आणि जोशपूर्ण जनसमुदायाच्या उपस्थिती प्रस्थापित राजकीय पक्षांची शिवाजी पार्कवरील सभांची मक्तेदारी मोडीत काढणारी होती. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकेल, अशा प्रकारे आंबेडकरी शक्तीचे दर्शन घडविणारी आणि प्रकाश आंबेडकर यांचे राजकीय महत्त्व व वजन वाढविणारी ही सभा होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी शिवाजी पार्कवर संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आले होते, त्यामुळे सभेची जोरदार चर्चा सुरु होती. दुपारी चार वाजल्यापासून उत्सूफूर्तपणे लोक शिवाजी पार्कच्या दिशेने येत होते. दोन तासात जवळपास मैदान भरले. उपस्थितांमध्ये तरुणांचा भरणा अधिक होता. १९९० मध्ये रिपब्लिकन ऐक्याची याच शिवाजी पार्कवर विराट सभा झाली होती, त्याची आठवण करुन देणारी एकट्या प्रकाश आंबेडकरांची संविधान सन्मान सभा पार पडली. प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी ही सभा होती.

हेही वाचा… मावळमध्ये विरोधी आघाडीत शिथिलता

आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रीयस्तरावर सत्ताधारी भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची इंडिया आघाडी तयार झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची मोट आधीच बांधण्यात आली आहे. या आघाडीत वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार का, किंवा त्यांना सहभागी करुन घेतले जाणार का, अशा गेल्या अनेक दिवसांपारून चर्चा सुरु आहेत. खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली होती, परंतु प्रामुख्याने काँग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर केले. खरे म्हणजे त्याचीही आघाडीतील पक्षांनी दखल घेतली नाही. मात्र त्याची फिकर न करता आंबेडकर यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली. संविधान सन्मान महासभेचे आयोजन हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जाते.

प्रकाश आंबेडकर यांनी या सभेचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रण देऊन, सभा चर्चेत आणली. राहुल गांधी सभेला उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांनी आंबेडकरांना पत्र पाठवून सभेला शुभेच्छा दिल्या. संविधान मुल्ल्यांवर होत असलेल्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी अशा प्रकारची सभा आयोजित केल्याबद्दल त्यांनी आंबेडकरांचे अभिनंदन केले. या पत्रप्रपंचाचा परिणाम म्हणजे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सभेला हजेरी लावली. त्यांनी भाषणही केले व वंचितच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला. वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची त्यातून जवळिक निर्माण होत असून, महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या दिशने पडणारी ही पावले असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा… राजू शेट्टी यांचा एकाचवेळी अनेकांशी सामना

ही सभा म्हणजे फक्त शक्तीप्रदर्शन नव्हते तर, प्रकाश आंबेडकर यांनी भाजपविरोधातील लढाई केवळ राजकीय नाही तर, ती सामाजिक आणि सांस्कृतिकही आसल्याची मुद्देसूद मांडणी केली. इंडिया किंवा महाविकास आघाडीला त्याचे किती आकलन होते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रवाद भौगोलिक आहे की सांस्कृतिक असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी भाजपला आणि संघालाही कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रात सध्या धुमसत असलेल्या मराठा व ओबीसी आरक्षणाच्या वादावरही सडेतोड भाष्य त्यांनी केले. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱया मनोज जरांगे पाटील यांना आपण कुणी तरी वेगळे आहोत, अशा प्रकारचा लढ्यामध्ये भेदभाव करु नका, त्यातून हातात काहीच पडणार नाही, असा परखड सल्ला दिला. मंडल आयोगाची लढाई आम्ही लढत होतो, तेव्हा ओबीसी समाज कमंडलच्या बाजुने उभा होता, त्यांनीच भाजपला सत्तेवर बसवले, असे खडे बोलही त्यांनी आपल्या भाषणातून ऐकवले. सर्व लढाईमधला रिंग मास्टर नरेंद्र मोदी आहेत, विरोधक एकत्र आले तर आपली सत्ता राहणार नाही, म्हणून ते तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत, याची जाणीव आंबेडकर यांनी विरोधकांना करुन दिली.

प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाजी पार्कवरील शक्तीप्रदर्शनाची महाविकास आघाडीला दखल घ्यावी लागणार आहे. वंचितचा महाविकास आघाडीत सहभाग झाला तर, महाराष्ट्रात महायुतीसमोर ते मोठे राजकीय आव्हान ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Show of power at shivaji park by prakash ambedkar closing towards congress now print politics news asj
Show comments