नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून राज्यातील महायुती सरकारने आणि विशेषत: भाजपने हिंदुत्वाचा नारा बुलंद करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केल्याचे दिसून आले. शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचे नवी मुंबईकडील टोक असलेल्या चिर्ले नाक्यावर भाजपने जागोजागी श्री रामाचा नारा देणारे होर्डिग, बॅनर उभारून राम मंदिर उभारणीबद्दल पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी विशेष आखणी केल्याचे दिसून आले. सागरी सेतूसारख्या मोठ्या प्रकल्पाचे लोकार्पण होत असताना ठाणे, रायगड, नवी मुंबई पट्ट्यात पद्धतशीरपणे वातावरण निर्मिती करत हिंदुत्वाची पेरणी करण्याची रणनिती यानिमीत्ताने आखण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे आणि रायगड पट्ट्यातील शिवसेना भाजप महायुतीच्या नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केल्याचे दिसून आले. या कार्यक्रमासाठी ठाणे, रायगड तसेच आसपासच्या भागातून सव्वालाख स्त्री पुरुषांची गर्दी जमविण्याचे नियोजन करण्यात आले होते. ठाणे, पनवेल, नवी मुंबई तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक, कर्मचारी यांना पंतप्रधानांच्या सभेपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. हे करत असताना भाजपचे पनवेल आणि उरणचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांच्याकडे पंतप्रधानांच्या स्वागताची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली होती. हे स्वागत करताना हा कार्यक्रम केवळ विकास प्रकल्पांपुरता मर्यादित रहाणार नाही याची पुरेपूर खबरदारी महायुतीच्या नेत्यांनी घेतल्याचे पहायला मिळाले.

हेही वाचा – पुण्यातील महायुती मेळाव्यात अजित पवार भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणता सल्ला देणार ?

रामाचा नारा, मंदिराबद्दल अभिवादन

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे एक टोक असलेल्या उलवेलगतच्या चिर्ले भागात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. चिर्ले ते नवी मुंबई विमानतळ या साडेपाच किलोमीटर अंतराच्या मार्गावर पंतप्रधानांचा रोड शो केला गेला. हे करत असताना रस्त्याच्या दुर्तफा त्यांचे आगरी कोळी पारंपारिक पद्धतीने स्वागताचे नियोजन करण्यात आले होते. दुपारी एक वाजल्यापासूनच उरण, पनवेल पट्ट्यातील आगरी-कोळी समाजातील महिला, पुरुष तसेच ढोल, ताशांची पथके याठिकाणी तैनात करण्यात आली होती. या रोड शो दरम्यान हिंदुत्वाची घोषणा अधिक ठसविण्यासाठी जागोजागी जय श्री रामाची घोषणा असलेले फलक, होर्डिग उभारण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाला येत्या २२ तारखेला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाचा साज चढविण्याचा प्रयत्नही महायुतीकडून पद्धतशीरपणे करण्यात आला.

अटल सेतूच्या पायथ्यापासून नवी मुंबई विमानतळाच्या मार्गापर्यंत जागोजागी जय श्री रामाचा नारा देणारे फलक आणि पंतप्रधान यांची छबी असलेले बॅनर लावण्यात आले होते. काही ठिकाणी विकासाच्या वाटेवर समर्थ भारताचे पुनरुत्थान असा संदेश देणारे फलकही उभारण्यात आले होते. अटल सेतूच्या दोन्ही बाजूस समुद्रात मोठ्या संख्येने बोटी तैनात करण्यात आल्या होत्या. या बोटीतून दीडशे फूट उंचीचे जय श्रीराम गोंदविलेले फुगे सोडण्यात आले होते.

हेही वाचा – मोदी यांच्या राज्यातील दौऱ्यातून राजकीय प्रचाराचा शुभारंभ!

अटल सेतूमुळे नवी मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहेच शिवाय या विकासाला अध्यात्मिक पाया असल्याने पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आम्ही राम मंदिराचे बॅनर सर्वत्र उभारले होते. राम मंदिराचे इतक्या वर्षांचे स्वप्न ज्यांच्यामुळे पूर्ण झाले त्यांचे आभार मानण्याचा हा प्रयत्न होता. – महेश बालदी, आमदार उरण

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shri ram slogan at the inauguration of atal setu spreading of hindutva by mahayuti through development projects print politics news ssb
Show comments