Shrikant Pangarkar : बंगळुरुमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकरने शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनाही उधाण आलं होतं. यावरून अनेकांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला होता. तसेच विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली. सर्व स्थरातून टीका होऊ लागल्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत पांगरकरची शिवसेनेतून हकालपट्टी केली. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत श्रीकांत पांगरकरने शुक्रावारी शिवसेनेत प्रवेश केला होता.

एवढंच नाही तर श्रीकांत पांगरकरची जालना विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती देखील करण्यात आल्याची माहिती सांगितली जात होती. मात्र, नियुक्ती केल्याच्या दोन दिवसांत म्हणजे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने श्रीकांत पांगरकरची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगरकर हा काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला आहे. श्रीकांत पांगरकर हा मूळ जालना जिल्ह्यातील आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर श्रीकांत पांगरकरने दावा केला आहे की, ‘आपण पक्ष कधीही सोडलेला नाही आणि पक्षात अनेक पदांवर काम केलेलं आहे. २०१४ सालापासून मी मला आता सोपवण्यात आलेली भूमिका सांभाळत आहे’, असं श्रीकांत पांगरकरने इंडियन एक्सप्रेसशी प्रतिक्रिया देताना म्हटलं. दरम्यान, २०११ ते २०१८ या काळात श्रीकांत पांगरकर सक्रिय नसले तरी खोतकरांचे समर्थक होते, असं आता सूत्रांनी सांगितलं आहे. पक्षातील अंतर्गत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कर्नाटक एसआयटीने ऑगस्ट २०१८ मध्ये श्रीकांत पांगारकरला अटक केल्यानंतर खोतकर हे त्याच्यापासून बाजूला झाले होते.

हेही वाचा : बबनराव लोणीकर यांना सलग आठव्यांदा उमेदवारी

दरम्यान, माजी नगरसेवक जगन्नाथ यांचे पुत्र श्रीकांत पांगारकरने १९९६ मध्ये राजकीय प्रवास सुरू केला आणि पुढे शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख पदीही काम केलं. २००१ मध्ये पांगारकरने जालन्यातून पहिली निवडणूक जिंकली होती, तसेच २०११ मध्ये हिंदू जनजागृती समिती या संघटनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच जालना शहरातील त्याची मजबूत हिंदुत्ववादी प्रतिमा आणि दबदबा यामुळे शिवसेनेची (शिंदे) मते एकवटण्यास मदत होईल, या आपेक्षने आता निवड करण्यात आली असावी, असं पक्षातील काही सूत्रांनी सांगितलं.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात श्रीकांत पांगारकरवर प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहून बंदुकांची व्यवस्था केल्याचा आरोप आहे. तसेच तो नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातही आरोपी आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) त्याच्यासह इतर ११ जणांवर कट रचल्याचा आरोप आहे. मात्र, हे सर्व आरोप श्रीकांत पांगारकरने फेटाळून लावले आहेत आणि असा दावा केला आहे की, “राजकीय षडयंत्रामुळे आपल्याला फसवण्यात आलं आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणात गेल्या महिन्यात जामीन मंजूर झाला त्यामुळे आता जामिनावर बाहेर आहे. पण जर तुम्ही या प्रकरणातील आरोपपत्र वाचले तर तुमच्या लक्षात येईल की, माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही. सर्व आरोप खोटे आहेत. मी माझ्या आयुष्यातील सहा वर्षे गमावली. मी गुन्हेगार नाही आणि दोन्ही प्रकरणांमध्ये माझी कोणतीही भूमिका नाही. मी फक्त राजकारणात सक्रिय होतो”, असं श्रीकांत पांगारकरने म्हटलं आहे. दरम्यान, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, पांगारकर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असून तेथे हॉटेल आणि रिअल इस्टेट व्यवसाय चालवत आहे.