Supreme Court Same-Sex Marriage Judgement : समलैंगिक संबंध आणि समलैंगिक विवाह याच्यावर आज देशभरात चर्चा होत आहे. विविध स्तरांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर या निकालाचे रा. स्व. संघाने स्वागत केले. समलैंगिकतेला विरोध नाही, पण समलिंगी विवाहांना विरोध असल्याचे रा. स्व. संघाने म्हटले आहे. रा. स्व. संघाची भूमिका काय आहे, संघाने समलैंगिकतेला कधी समर्थन दिले आहे का, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रा. स्व. संघाने सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता नाही, या निकालाचे स्वागत केले आहे. समलिंगी संबंध ठेवण्यास आमचा पाठिंबा आहे, पण समलिंगी संबंध ठेवावेसे वाटणे हा मानसिक विकार असू शकतो, असे रा. स्व. संघाने म्हटले आहे. या निकालाचे स्वागत करताना रा. स्व. संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी X (ट्विटर)वर दिलेल्या एका हिंदी संदेशात म्हटले, “समलिंगी विवाहाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत आहे. आपली संसदीय लोकशाही प्रणाली या समस्येच्या सर्व पैलूंचा गांभीर्याने विचार करूनच निकाल देईल,” असे म्हटले आहे.
एलजीबीटीक्यू विषयावर रा. स्व. संघाने अनेक वेळा भाष्य केले आहे. त्यामध्ये त्यांनी बदल केला नाही. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी समलिंगी संबंधांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काही धार्मिक ग्रंथांचा आधार घेतला. समलिंगी आकर्षण वाटणे यात गैर नसल्याचे त्यांनी नमूद केले. संघाच्या काही लोकांनी हे संबंध अनैसर्गिक असल्याचे म्हटले आहे. परंतु, ते स्वीकार्ह असल्याचेही सांगितले आहे.

हेही वाचा : देवभूमी’मधील मद्य धोरण रद्द ! श्रेयावरून वाद

२०१६ मध्ये रा. स्व. संघाचे तत्कालीन सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये समलैंगिकता हा वैयक्तिक मुद्दा असल्याचे मत मांडले होते. समलिंगी संबंधांचा इतर लोकांच्या जीवनावर परिणाम होत नाही तोपर्यंत ती समस्या म्हणता येणार नाही. लैंगिक प्राधान्य कोणाला द्यावे हा सर्वस्वी वैयक्तिक मुद्दा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. काही काळातच त्यांनी समलैंगिकतेसंदर्भात अजून एक ट्विट केले. त्यात समलैंगिकता हा गुन्हा नाही, समाजाच्या दृष्टीने हे अनैतिक कृत्य असू शकते. पण, याकरिता शिक्षा करण्याची आवश्यकता नाही. समलिंगी संबंध ठेवणे हा मानसिक विकार असू शकतो, तो कोणताही अपराध नाही आणि गौरवाचेही कारण नाही. त्यामुळे हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले पाहिजे असं ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१८ मध्ये समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा निकाल दिला. त्याचेही रा. स्व. संघाने स्वागत केले होते. रा. स्व. संघाचे प्रचारप्रमुख अरुण कुमार म्हणाले की, ”समलिंगी संबंध ठेवणे हा गुन्हा नाही. पण, समलिंगी विवाह करणे निसर्गाशी सुसंगत नाही. कारण, हे संबंध नैसर्गिक नियमांना धरून नसतात. त्यामुळे याचे समर्थन करता येत नाही, म्हणून समलिंगी विवाहाला आमचा विरोध आहे.”

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी समलिंगी संबंधांबाबत काही धार्मिक ग्रंथांचा हवाला दिला. ते म्हणाले की, समलिंगी संबंध ठेवू इच्छिणाऱ्या लोकांनाही जगण्याचा अधिकार आहे. तेही समाजाचा अधिकृत भाग आहेत. आपल्या समाजात तृतीयपंथी समुदाय आहे. आपल्याला हा समुदाय कधीही सामाजिक समस्या वाटत नाही. त्यांना त्यांची एक जीवनपद्धती आहे, धारणा आहेत. त्यांना त्यांच्या देवताही आहेत. कुंभमेळ्यामध्ये त्यांचे स्वतःचे महामंडलेश्वर असते. त्यांना विशेष जागा देण्यात येते. तेही दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. तसे समलिंगी संबंध असणाऱ्या लोकांविषयी मानवतावादी दृष्टिकोनातून निर्णय घेता येऊ शकेल, असे डॉ. भागवत यांनी ‘दि ऑर्गनायझर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
धार्मिक ग्रंथांचे उल्लेख करताना राक्षसांचा राजा असणाऱ्या जरासंधची कथा सांगितली. त्याच्याकडे हंसा आणि डिंभक हे दोन सेनापती होते. त्यांच्यात समलैंगिक संबंध असल्याचे सूचित होते. जेव्हा कृष्णाने डिंभकाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवली, तेव्हा हंसाने आत्महत्या केली. अशा प्रकारे कृष्णाने त्यांची समलिंगी संबंधांपासून सुटका केली, असे डॉ. भागवत म्हणाले.
मार्चमध्ये झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या (एबीपीएस) बैठकीच्या पत्रकार परिषदेत रा. स्व. संघाचे सरचिटणीस होसाबळे यांनी समलिंगी विवाहाला विरोध असल्याचे अधोरेखित केले.
विवाह हे भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये होऊ शकतात. तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही व्यक्तींसह राहू शकता, पण विवाहाकरिता भिन्न लिंग असणे आवश्यक आहे. हिंदू तत्त्वज्ञानात विवाह हा एक संस्कार आहे. या संस्कारात दोन व्यक्ती लग्न करतात आणि एकत्र राहतात. ते केवळ एकत्र राहणे नसते, ते कुटुंब तयार करतात. समाजव्यवस्थेमध्ये ते सहभागी होतात. त्यांना स्वतःचे कुटुंब घडवायचे असते म्हणून ते विवाह करतात. विवाह हे केवळ वैयक्तिक, लैंगिक आनंदासाठी नसतात. सामाजिक जबाबदारी असते. त्यामुळे विवाह स्त्री आणि पुरुष यांच्यामध्येच होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
एप्रिलमध्ये रा. स्व. संघातील वरिष्ठ व्यक्तीने समलिंगी विवाह ही राक्षसांमधील प्रथा असल्याचे सांगितले, तसेच धर्मग्रंथांमध्ये याकरिता शिक्षा असल्याचेही ते म्हणाले. भारतीय मजदूर संघ (बीएमएस) रा. स्व. संघ कामगार शाखेचे माजी अध्यक्ष सी के साजी नारायणन यांनी समलिंगी संबंध गुन्हा नाही, या न्यायालयाच्या २०१८ मधील निकालावर ‘दि ऑर्गनायझर’मध्ये टीकात्मक लेख लिहिला.
मे महिन्यात संघाशी संलग्न असलेल्या आणि महिलांच्या आरोग्यावर काम करणाऱ्या विभागाने सर्वेक्षण केले. समलिंगी विवाहावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असताना त्या अहवालाचा आधार घेण्यात आला होता. या अहवालात समलैंगिक संबंध ठेवावेसे वाटणं हा मानसिक विकार असल्याचे म्हटले आहे. या जोडप्यांना वडिलांच्या सहभागाशिवाय मूल होईल, तसेच मुलगे आणि मुली यांच्यामधील लैंगिक भावना आणि क्रियाकलाप नियंत्रित करणे अवघड होईल, असे म्हटले आहे.

रा. स्व. संघाने समलिंगी संबंधांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी समलिंगी विवाहाला मान्यता दिलेली नाही. २०१८ साली ३७७ रद्दबातल केल्यानंतर रा. स्व. संघाने त्याचे स्वागत केले. मात्र, भाजपाने विरोधात भूमिका घेतली. भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह म्हणाले की, जर पक्षाने बैठक बोलावली आणि या विषयाची चर्चा झाली, तर आम्ही कलम ३७७ ला पाठिंबाच देऊ. समलैंगिकता ही अनैसर्गिक कृती आहे, हे आम्ही मानतो. त्यामुळे त्याचे समर्थन करता येत नाही असे सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supports homosexuality but opposes marriage why is the policy of the rss like this vvk
Show comments